Get it on Google Play
Download on the App Store

श्री जटेश्वर महादेव

श्री जटेश्वर महादेवाची कहाणी ही एकदा विरधन्व आणि त्याच्याकडून वनात केल्या गेलेल्या दोषांचे निवारण यांच्याशी निगडीत आहे. ही कथा ऋषी मुनींची महती दर्शवतात. मुनींनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यावरच राजाला शांती प्राप्त झाली.


पौराणिक कथांनुसार पुर्वूच्या काळी एक वीरधन्व नावाचा राजा होऊन गेला. तो धर्मात्मा आणि यशस्वी असून पृथ्वीवर विख्यात होता. एकदा राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला. तिथे त्याने एक हरीण रुपी आकृती पाहून बाण मारला. जिथे त्याने बाण मारले तिथे प्रत्यक्षात संवर्त ब्राम्हणाचे ५ पुत्र होते जे हरीण रुपात विहार करत होते. एका शापाच्या प्रभावामुळे त्यांना हे मृगाचे रूप मिळाले होते. त्या कथेनुसार, एकदा या ५ ब्राम्हण पुत्रांकडून हरिणाच्या ५ पिल्लांचा मृत्यू झाला होता. घरी गेल्यावर पुत्रांनी ब्राम्हणाच्या कानावर सारा वृत्तांत घातला आणि त्यांना प्रायश्चित्त घेण्याचा मार्ग विचारला. तेवढ्यात तिथे भृगु ऋषी, अत्रि ऋषी आणि अन्य ऋषी आले. त्यांनी सर्व वृत्तांत ऐकल्यावर पुत्रांना सांगितले की प्रायश्चित्त घेण्यासाठी तुम्ही पुढची ५ वर्ष हरीणाचे कातडे पांघरून जंगलात राहा. अशा प्रकारे ते वनात फिरत होते. आणि एक वर्षानंतर राजाने बाण मारून त्यांना मारून टाकले.
जेव्हा राजाला समजले की ते ब्राम्हण पुत्र होते तेव्हा त्याला फार दुःख झाले. भयाने कापत तो देवरात मुनींकडे गेला आणि त्यांना सारा वृत्तांत सांगितला. देवरात मुनींनी त्यालाल शांत राहायला सांगितले आणि म्हणाले की जनार्दनाच्या कृपेने तुझे पाप दूर होईल. ऋषींची ही थंड प्रतिक्रिया पाहून राजाला राग आला आणि त्याने तलवार काढून ऋषींना मारून टाकले. या हत्येनंतर तो आणखीनच चिडला, आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडून तो वनात भटकू लागला. इथे त्याने गालव ऋषींची गाय कपिल हिचा देखील वध केला. बधीर बुद्धीने तो विचारहीन आणि दिशाहीन भटकत राहिला.
राजाला तसे फिरताना एकदा ऋषी वामदेव यांनी पहिले. राजाला पाहूनच त्यांना सर्व काही लक्षात आले. राजा त्यांना म्हणाला की मी ब्राम्हण हत्या केली आहे, गो हत्या केली आहे. या दोषामुळे मी अत्यंत दुःखी आहे. तेव्हा मुनी म्हणाले की पूर्वीच्या काही कर्मांमुळे तुझी माती भ्रष्ट झाली आहे आणि म्हणूनच या हत्या तू केल्या आहेस. तू त्वरेने महाकाल वनात जा. तिथे अनरकेश्वर महादेवाच्या उत्तरेला असलेल्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन पूजन कर. तसे केलेस तरच तुझा उद्धार होईल. त्यांच्या सांगण्या प्रमाणे राजा महाकाल वनात गेला आणि मुनींनी सांगितलेल्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन पूजन केले. त्याच्या पूजनाचे फळ म्हणून त्या लिंगातून जटाधारी शंकर प्रकट झाले आणि राजाला पापातून मुक्त करून त्याची बुद्धी निर्मल होण्याचे वरदान केले. तेव्हापासून हे शिवलिंग जटेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
मान्यता आहे की जटेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याने पाप दोष नष्ट होतात. भ्रष्ट बुद्धीच्या मनुष्याची स्थिती सुधारते. असे मानले जाते की श्राद्ध कर्माच्या वेळी जे कोणी जटेश्वर महादेवाची कथा वाचतात त्याचे श्राद्ध कर्म पितरांना प्रसन्न करते. उज्जैन मधील ८४ महादेव मंदिरांपैकी एक असलेले जटेश्वर महादेव मंदिर गया कोठा मध्ये रावण दहन स्थानावर वसलेले आहे.