Get it on Google Play
Download on the App Store

धर्मनिरपेक्षता: एक पुनर्विचार !!

'धर्म हि एक अफूची गोळी आहे', अस म्हणणाऱ्या मार्क्स ला जर कुणी विचारल असत कि खरच धर्मनिरपेक्षतेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे का? तर कदाचित अस उत्तर मिळाल असत कि, मुळात जिथे धर्मच अस्तित्वात नसावा तिथ धर्मनिरपेक्षता कशासाठी.? आणि मग धर्मनिरपेक्षतेचा विचारच जर नाहीये तर पुनर्विचार कशासाठी?

परंतु स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे, मनुष्याला जगण्यासाठी आणि नुसतच जगण्यासाठी नाही तर सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी धर्माची गरज आहे. याच विचारधारेतून डॉ.आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेची बीजे भारतीय संविधानात रोवली.

'कुठलाही धर्म उच्च नाही कि नीच नाही, कुठलाही धर्म राष्ट्रीय नाही, कायद्यासमोर सर्व धर्म समान आहेत. परस्परांच्या धर्माविषयी आदरभाव राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.' अशा या वरवर प्रगल्भ वाटणाऱ्या धर्मनिरपेक्षतेविषयी पुनर्विचार करण्याची गरज पडावी यातूनच एक विचार सहज मनात येतो कि, महापुरुषांकडून मिळालेल्या, मानवी वारसा असणाऱ्या श्रेष्ठ विचारांवर देखील व्यक्तीसापेक्षता व कालसापेक्षतेच्या मर्यादा पडू शकतात.

भारताच्या बाबतीत म्हणले जाते कि, जिथे विविधतेमध्ये एकता नांदते तो सुजलाम सुफलाम देश म्हणजे भारत!! हि विविधतेत एकता.... एकदा निट समजून घेतली पाहिजे.

भारतात विविध जाती, धर्माचे, पंथांचे लोक राहतात, आणि ते परस्परांच्या भावनांचा आदर करून एकोप्याने राहतात अस या विधानातून दिसून येत.

पण मुळात जिथ इतक्या प्रकारचे जात, धर्म, पर्यायाने विचार, श्रद्धा, अस्तित्वात आहेत तिथ एकोपा, वास्तविकतेत व दृश्य स्वरुपात येणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट वाटते.

एका व्यक्तीसाठी असलेली श्रद्धा जर दुसऱ्यासाठी अंधश्रद्धा ठरत असेल तर या दोन व्यक्तींमध्ये दिसणारा एकोपा हा वरवरचा आहे हे स्पष्ट होत. मुळात या दोन व्यक्तींचे धर्म म्हणजेच जीवन जगण्याच्या कलाच जर वेगवेगळ्या असतील तर तत्वांना मुरड घालून स्वत:ला फसवण्यात काय अर्थ आहे. परीट व कोळसेविक्या कितीही जिवलग मित्र असले तरीही वास्तव जीवनात हि मैत्री त्यांना हानिकारकच ठरते. (इसापनीती)

प्रत्यक्षात गरज आहे ती या धर्मांना चिकित्सक वृत्तीने अभ्यासण्याची, वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची. या चाचण्यांमधून जो धर्म वा धर्माचा भाग उत्तीर्ण होईल तोच धर्म अन फक्त तोच धर्म आपणा सर्वांना खरा न्याय देऊ शकेल, धर्मनिरपेक्षतेचा!!

पण जिथे धर्माची कृतीशील चिकीत्साच अमान्य करण श्रद्धा बनली असेल तिथे सद्सद्विवेकबुद्धीचा आग्रह करण अवघड होत. आपला धर्म आपली संस्कृती यावर असलेला श्रद्धेचा निखारा अंधश्रद्धेच्या राखेखाली जातोय याची जाणीवच बोथट होतेय, कसल्या संस्कृती अन कसल्या रुढी परंपरांच माथेर घेऊन फिरतोय आपण.. तीच संस्कृती जिथे माणसाला माणसासारख जगण्याचा अधिकार नाकारला जात होता? माणसानं माणसाशी माणसासारख वागाव हे जिथे हजारो वर्षे पाप मानले जात होते. त्याच भारताविषयी आपण म्हणतो कि, "इथ विविधतेत एकता नांदते, आम्हाला आमच्या या संस्कृतीचा अभिमान आहे, आमच्या रुढी परंपरा आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या आहेत, त्या बरोबरच आहेत अन राहणार आहेत". अशा प्रकारचे तुंबून बसलेले विचार जोपर्यंत मोकळे होत नाहीत तोपर्यंत खरी धर्मनिरपेक्षता दिसून येणे शक्य नाही. कारण एका समुहाची अभिमानास्पद गोष्ट इथे दुसऱ्या समूहासाठी अपमानास्पद इतिहासाची कहाणी आहे.

सर्वत्र केल जात, सर्वकाळ केल गेल आहे म्हणून ते बरोबरच अस कस ठरू शकत? गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक व्यसनही करतात म्हणून त्यांना का आपण चांगली गोष्ट म्हणणार? एक धर्म सांगतोय जत्रेत कोंबडी कापा, गायी गुरे कसायाच्या हाती द्या अन एखादा धर्म सांगतोय हिंसा करू नका, अहिंसा पाळा तर मग ऐकावं कुणाच आणि यांनि सोबत कस राहावं? कि हि असली धर्मनिरपेक्षता जागवत उघड्या डोळ्यांनी सर्व सोसत स्वमनाची हिंसा चालू द्यावी.?

हि परस्परविरोधी कृत्ये आपला घात करत असताना, आपल्या श्रद्धांवर तत्वांवर कुऱ्हाड पडत असताना, आपल्या अंतर्मनावर होणारे आघात सहन करत हातावर हात ठेऊन जे होत आहे ते पाहत राहणे म्हणजे जर धर्मनिरपेक्षता असेल तर काय कामाची ती धर्मनिरपेक्षता? मुळात ज्या गोष्टी आदर्श मानवी वर्तन असतात, ज्या व्यक्ती वा कालसापेक्ष परिघात बंदिस्त नाहीत, अशा गोष्टींवर श्रद्धा ठेऊन अशा तत्वांना धर्म मानून जर आपण वागलो तर आपण खरच मनुष्यात्वाच्या व्याखेत बसू.

'सर्व धर्म सारखे आहेत, सर्वांच ध्येय एकाच आहे' अस म्हणनं म्हणजे त्या सर्व धर्मांचाही अवमान आहे ज्यांच्या मूळ तत्वावरच हे वाक्य घाला घालत असत. एक धर्म सांगतो मारा आणि एक धर्म सांगतो वाचवा आणि आपण म्हणतो हे दोन्ही धर्म एकाच निर्मिकाकडे जातात...हे कस शक्य आहे?

एकेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, निरीश्वरवाद यात आपली मान अडकली असताना धर्मनिरपेक्षतेच्या वरवरच्या 'इंडिया शायनिंग' सारख्या पोकळ गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत द्रुष्ट, जाचक समजुतींना मुठमाती देऊन विज्ञानाची कास धरून स्वताला जे पटेल, जे जनहितार्थ असेल ते आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत आपण आपली अन पर्यायाने समाजाची उन्नती साधू शकत नाही.

धर्म मानसासाठी आहे कि माणूस धर्मासाठी, हा विचार करताना धर्मच ईश्वरनिर्मित आहेत अस मानणारे आपण हे कस मान्य करू कि धर्मातील ज्या भ्रामक समजुती  मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत, कारण जे धर्मात आहे ते स्वयंभू आहे, परिपूर्ण आहे, ईश्वरेच्छा आहे याच श्रद्धेला(?) आव्हान देण्यास आपली मन धजत नाहीत.

प्रथम पसंती धर्म - रुढींना द्यावी कि मानवी जीवन व जीवनमूल्यांना द्यावी या प्रश्नावर जर मनात गोंधळ निर्माण होत असेल तर खरच एका विचार परिवर्तनाची गरज आहे अस म्हणल तर वावग ठरू नये.

मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूळ तत्वे, जीवनमूल्ये जर प्रत्येक मानवासाठी सारखी असतील तर एक दिवस असा का येऊ नये कि सर्व जाती-धर्मातील लोक एकाच विचाराचे असतील. त्या विचारांच्या, मूल्यांच्या एकत्रीकरनाला मग भलेही कुठल्याही धर्माचे नाव असो. आज मूळ गाभ्यातील गोष्टींना मूठमाती देऊन आपण वरवरच्या नावासारख्या गोष्टींवरच भांडत बसतो. आज धर्मांच्या गोष्टी सापेक्ष होत आहेत, या गोष्टीचा विचार करण्याची खरी गरज आहे. वरच्या फांद्या छाटत बसण्यापेक्षा समस्यांच्या मुळावर हल्ला करणे श्रेयस्कर आहे, पण या सर्व गोष्टी आपण तेव्हा मनावर घेऊ जेव्हा खरच म्हणू कि यापेक्षा अजून 'चांगल' असू शकत, याला 'चालवून घ्यायची' गरज नाही आहे. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेऊन आपण सर्व मानवजातीचा विचार करू तेव्हा या समस्या, समस्या राहणार नाहीत.

आता गरज आहे ती विचारमंथनाची, परिवर्तनाची, मूळ मानवी मूल्यांसाठी झगडण्याची आणि हे करण्यासाठी लागेल नकार अन् स्वीकाराचा स्वीकार करण्याची वृत्ती, संवेदनशीलता, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती तेव्हाच आपण असा मानव म्हणवू ज्याचा धर्म फक्त आणि फक्त 'मानवता' आहे.

लेखं- प्रफुल्ल वडमारे , (आंबेजोगाई)
भ्रमणध्वनी- 9405867947