Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण बाविसावे

"मग पुढे काय झाले?" रामने प्रचंड कुतुहलाने विचारले.

तरीसुद्धा बराच वेळ नेमीनाथ शांत होते. थोड्यावेळाने आकाशात शून्यात बघत म्हणाले.  

“वैजयंतीने अगदी योग्य आणि शास्त्रोक्त गोष्टी सांगितल्या होत्या. आदिशक्तीचा आरंभिक विकास किंवा मुख्य विकास हा मदनासाठी म्हणजेच आनंदासाठी आहे हे खरे आहे. ही जगाची वासना आहे. जोपर्यंत उदात्त तात्विक दृष्टीने सर्व बाबतीत कालक्रमाचा अंतर्भाव होत नाही तोपर्यंत सांसारिक जीवन नैसर्गिक प्राचीन पद्धतीनुसार 'भूक' आणि 'काम' यांद्वारेच चालवले जाईल.

क्षुधेला खूप महत्त्व आहे.पण तो आपला प्रांत नाही. तो सामन्यांसाठीचा मार्ग म्हणजेच कामवासना तृप्तीचा मार्ग आहे. आजवर जगात लढलेली सर्व युद्धे केवळ प्रेमासाठी लढली गेली आहेत आहारासाठी नाही.
अस्तित्वासाठी जे काही संघर्ष आणि लढाया झाल्या ते सर्व जीवनासाठीच होते.

तुम्हाला हे माहित असले पाहिजे की विश्वाची उत्पत्ती ‘मीपणा’ या प्रकारच्या अस्तित्वाच्या इच्छेतून नाही तर आनंदातून आहे. जन्मात सुद्धा आनंद असतो. जीवनात जसा आनंद आहे तसाच मृत्यूमध्येही आनंद आहे. आनंद सर्वस्व आहे. इतर सर्व गोष्टी आनंदाची साधने आहेत.

म्हणूनच त्यातून साथीदाराची इच्छा निर्माण झाली. ही पहिली इच्छा म्हणजे आदि प्रवृत्ती, ज्याच्या मुळाशी रमणाची इच्छा होती. आदि जीवाला त्याच्या एकाकीपणाची जाणीव होती. जर हि समज नसती तर मूळ इच्छा, मूळ प्रवृत्ती आणि आनंदाची सुरुवात उदयास आलीच नसती.

हेच ते ठिकाण आहे जिथून साधनेचा जन्म होतो आणि उदय होतो, तांत्रिक साधना. मूळ प्राण्याची मूळ प्रवृत्ती किंवा मूळ "इच्छा" हीच मूळ शक्ती आहे. तंत्रामध्ये यालाच परमशक्ती म्हणतात. हा देखील मूळ स्वभाव आहे. मूळ प्राण्याला जेव्हा स्वतःशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व अनुभवायला मिळाते, तेव्हाच त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते.या संयुक्त भावनेची कल्पना तंत्रात अर्ध-नारीश्वराच्या रूपात करण्यात आली आहे.”

नेमीनाथ बाबांना तंत्रशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांचे सखोल ज्ञान होते. ते अगदी सोप्या पद्धतीने समजावत होते.

“भाषा, विज्ञान या क्षेत्रात पहिली धारणा ‘आम्ही’ आणि दुसरी धारणा ‘तुम्ही’ म्हणून दिसून येते. तत्त्ववेत्त्यांच्या शब्दात सांगायचे तर, हे 'अहं आणि एतत्' आहेत, ‘अहं आणि एतत्’ अहंकार आणि अस्तित्व यांच्यामध्ये आकर्षण-विकर्षण आहे, ज्याच्या मुळाशी वासना आहे आणि त्या वासनेच्या मुळाशी ‘काम’ आहे म्हणूनच भारतीय संस्कृतीत 'कामा'ला आदिदेव ही संज्ञा प्राप्त झाली आहे.

ध्यानाचे अनेक मार्ग आहेत, परंतु त्यापैकी फक्त दोन मार्ग महत्त्वाचे आहेत. पहिला शैव मार्ग आहे, ज्यामध्ये शिव मुख्य आणि शक्ती गौण आहे. दुसरा शक्ती मार्ग आहे, ज्यामध्ये शक्ती प्रधान आहे आणि शिव दुय्यम आहे.

या दोन उपासना मार्गांचे अनुयायी संपूर्ण जगाच्या मुळाशी असलेल्या शिव-शक्तीचा संबंध सांगतात. त्याच्या दृष्टीने संपूर्ण सृष्टी ही मिथुनात्मक आहे. वरचा ओठ शिव आहे आणि खालचा ओठ शक्ती आहे. या दोन्हीच्या संयोगातून शब्दनिर्मिती होते. तांत्रिक दृष्टिकोनातून, भूत, वर्तमान, भविष्य हे सर्व कामानेच प्रेरित आहेत. हे काम स्त्री आणि पुरुष यांच्याशी संबंधित आहे.”

थोड्यावेळाने नेमीनाथ बाबांनी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे बघितले आणि गंभीरपणे म्हणाले,

“डामरनाथ याला संन्यासी तंत्राची ही सर्व खोल रहस्य आणि त्यांचे अर्थ समजले नव्हते. त्याने फक्त ध्यानधारणा केली. पण साधनेच्या वस्तुस्थितीशी तो अपरिचित होता आणि त्यामुळेच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.”

"हो, मग काय झालं पुढे...." रामने विचारले

"काय होणार? अशा परिस्थितीत जे व्हायला नको होते तेच घडले. वैजयंतीच्या त्या सर्व शब्दांचा डामरनाथावर काही एक परिणाम झाला नाही. त्यावेळी त्याची मानसिक स्थिती अस्थिर होती. तो विक्षिप्तपणे वागत होता. वैजयंतीला बाजूला सारून तो उभा राहिला आणि पंचवटीचे व्यासपीठ सोडून तो मंदिरात गेला.

"आई! मला मार्ग दाखव, मला शक्ती दे, आई."

दोन्ही हातांनी देवीचे पाय धरून डामरनाथ ढसाढसा रडू लागला.

"आई मला निर्देश दे, आई! आता याच क्षणी मी हे राज्य सोडून देऊन माझ्या मठात जाईन. मी आयुष्यभर तपश्चर्या करून सप्त विभूतींचे विसर्जन करेन. मी तुझ्यासमोर बलिदान देईन."

त्याने क्षणभर महामायेच्या कोमल, शांत आणि तेजस्वी चेहऱ्याकडे टक लावून पाहिलं आणि मग अचानक बलिदानाची कट्यार उचलली. इतक्यात दुनाली बंदुकीच्या बाराने वातावरणाची शांतता भंग केली. झाडावरील घरट्यातील पक्षी घाबरून उडत सुटले. देवी समोरच्या नंदादीपाची वात अचानक विझली.

कलिका धावत धावत मंदिरात शिरली आणि व्याकूळ स्वरात म्हणाली,

"महाराज! त्वरा करा. वैजयंती पंचमुंडी आसनावर तडफडत पडल्या आहेत आणि अखेरच्या घटिका मोजत आहेत."

क्रमश: