Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण अकरावे

राम लगेचच बाबा नेमीनाथ यांच्या समोर बसला.

“ हि एका अकाली वैधव्य आलेल्या तरुण स्त्रीच्या झालेल्या घुसमटीची करुण हकीकत आहे जिची इतिहासाने कधीच दखल घेतली नाही कि बखरकारांनी तिची कुठेही साधी एका ओळीत नोंददेखील केली नाही. त्यांचीही अशी फारशी इच्छा नव्हती कि इतिहासात या गोष्टीची नोंद घेतली जावी. याचे कारण असे की ही हकीकत इतक्या महान हेब्बार घराण्यावरील एक बट्टा आहे. कलंक आहे.”

“कलंक?” राम

“ होय, कलंकच! आणखी काय म्हणू शकतो. उच्च कुळातील तरुण विधवा सून आणि तरुण संन्यासी यांच्या उत्कट प्रेम  कथेला आणखी काय नाव देऊ शकतो?”

रामच्या जिज्ञासेने भरलेल्या चेहऱ्याकडे बाबा नेमीनाथ यांनी पहिले आणि समोर बोट दाखवत ते म्हणाले,

“हरिद्रेच हे पात्र पाहतोयस न? किती स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे हे या पवित्र नदीचं! या नदीत बऱ्याच प्रकारचे मासे आहेत. गोऱ्यांची राजवट होती. त्याकाळी मोठमोठे अधिकारी, कमिश्नर साहेब गळ टाकून इथे मासे पकडायला येत असत. इथून वर डोंगरात सात आठ मैल वर देवकुंड आहे. तिथूनच उगम पावते हि नदी..”

“अच्छा...

“हं तर साधारण त्या काळात व्यंकटअप्पय्या चूडामणी हेब्बार आणि कमिशनर साहेब यांची मैत्री होती. परंतु ती मैत्री खरी नव्हती नुसतीच तोंडदेखली होती. इंग्रज कमिशनर व्यंकटअपय्या चूडामणी हेब्बर सरकारांवर मनातल्या मनात जळत असे.”

“ का बरं...?”

“ कारण असं कि व्यंकटअपय्या चूडामणी हेब्बार यांचे छोटे बंधू बंकटअपय्या चूडामणी हेब्बार त्या काळचे ज्युडो कराटेचे वर्ल्ड चैम्पियन होते. त्यांचे गुरु एक चीनी कराटे मास्तर होते. त्यांनी येथे एक विनामुल्य ज्युडो कराटे प्रशिक्षण संस्था सुरु केली होती. ज्या अंतर्गत ते तरुणांना मोफत कराटे शिकवत आणि इंग्रजाविरुद्ध त्यांची माथी भडकवण्याची कामं करत असत.
एक दिवस कमिश्नर साहेब शिकारीला आले होते. हत्तीवर स्वार होऊन नदीच्या पलीकडच्या जंगलातील वाघाची शिकार ते करणार होते. बंकटअपय्या यांनाही शिकारीचा शौक होता. इंग्रजी साहेबाबरोबर ते सुद्धा शिकारीला जात असत. सर्वजण त्याला शिकारीला जाण्यास मनाई करत होते.

“ बंकट भाउजी तुमचे तर नुकतेच लग्न झाले आहे तुम्ही शिकारीला जाणे योग्य नाही.” मोठ्या वहिनी सरकार पुष्पलतादेवी

परंतु बंकटअप्पय्या फारच हटवादी माणूस होता तो शिकारीला जाणार म्हणून अडूनच बसला. कोणाचे काही म्हणून ऐकले नाही. व्यंकटअप्पय्या सरकारांनी त्याला खूप समजावलं पण त्यांनी आजीबात ऐकले नाही आणि त्या गोऱ्या कमिशनर बरोबर हत्तीवर स्वार होऊन निघून गेलाच.

पूर्ण दिवस संपला. रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशीही शिकारीला गेलेले दल परतले नाही तेव्हा सर्वजण चिंतीत झाले. दुपारचे जेवण झाल्यावर व्यंकटअप्पय्या सरकार त्यांची चंची घेऊन बसले झोपाळ्यावर होते इतक्यात घोडेस्वार दौलत आला आणि त्याने सरकारांना वाकून नमस्कार केला,

“ काय खबर आहे, दौलत? बंकटचा काही पत्ता लागला का? ते सर्वजण शिकार करून परत का आले नाहीत?”

“ क्षमा करा सरकार!” दौलत ने मान खाली झुकवली.

“ अरे काय झालं? काही बोलशील कि नाही? गप्प का झालास?” व्यंकटअप्पय्या अस्वस्थपणे म्हणाले.

“ सरकार...माफ करा सरकार! छोटे सरकार आता आपल्यात नाहीत...”

क्रमश: