Get it on Google Play
Download on the App Store

लग्न आणि प्रेम

लग्न आणि प्रेम

 

एकदा लग्न आणि प्रेम यांच्यात

कडाक्याचं भांडण झालं

लग्न म्हणाले मीच महान

प्रेम म्हणाले मीच महान

 

वाद काही संपेना

कोणी कोणाला जुमानेना

मग त्यांनी ठरवलं

त्रयस्थाला विचारावं

 

मान-अपमान समोर दिसले

सगळं  ऐकून घेउन मान-अपमान म्हणाले

आम्ही दोघे सावत्र भाऊ

मान ठेवणारा आणि अपमान करणारा

उगाच आमच्यात शत्रुत्व निर्माण करतात

प्रेमात अपमान बहुधा होत असतो

लग्नात मान ठेवला जात नाही

म्हणूम मी तुमच्यात काही बोलणार नाही

 

पुढे दोघांना दुःख दिसले, धडधाकट-सुदृढ

दोघांचे ऐकून ते म्हणाले,

जगात माझी सारखी मागणी वाढत आहे.

प्रेमात दुःख सहन करणारे सापडत नाहीत

आणि लग्नात दुःख देणारे भरपूर

म्हणून मी काही निर्णय देणार नाही

 

पुढे दोघांना दिसले सुख, निपचित पडलेले

कृश आणि अशक्त, कमकुवतपणे म्हणाले

माझी जगात फार कमतरता आहे

लोकांमध्ये राहण्याची माझी फार ईच्छा असते

पण राहता येत नाही आणि प्रेमात मला दिलं जात नाही

 तर लग्नात नेहमीच  ओरबडला जातो

म्हणून मी काही निर्णय देत नाही

 

पुढं दोघांना आदर आप्पा दिसले,

स्वच्छ टापटीप सगळं ऐकून आप्पा म्हणाले

मी असतो जीवनसत्वांसारखा,

 कमी पडलो तर आजारी करतो

आणि प्रेमात कोणी मला ठेवत नाही

आणि लग्नात गृहित धरल्याने मी राखला जात नाही

म्हणून तुमचं तुम्ही निस्तरा

 

पुढं समाधानराव समाधी लावून बसलेले असतात ऐकून एकच बोलले

प्रेमात समाधानापेक्षा इतर सुखात रमता

लग्नात हव्यासापोटी समाधानी राहता येत नाही

 म्हणून मी काही निकाल सांगणार नाही

 

पुढे गेल्यावर त्याग गंभीर मुद्रेत बसलेले दिसले,

चिंतन करत ऐकून म्हणाले निर्वाणीनं

प्रेमात हल्ली मी नाहीसा झालोय

आणि लग्नात त्याज्य पदार्थांना जखडलं जातं

मी काय तुमचा निर्णय देणार?

 

पुढं गेल्यावर सहवासकाका दिसले

सगळं ऐकून म्हणाले प्रेमात मी अती होतो

नंतर लग्नात मी पूर्णपणे संपून जातो

मी काय निर्णय देणार?

 

पुढे दोघांना संशयतात्या दिसतात

बेरकीपणे दोघांकडे पाहून म्हणतात

मला तुमच्यात आणू नका मी आलो की होत्याचं नव्हतं होतं

आणि सगळं पाप माझ्या माथी मारलं जातं

प्रेमात मी मनोमनी खदखदत असतो

लग्नात मात्र बिनसण्यासाठी मीच कारणीभूत ठरतो

 

समोर समजुतदारपणा एकाकी बसलेला असतो

सगळं ऐकतो आणि म्हणतो प्रेमात मला दूर ठेवलं जातं

लग्नात असूनही दूर्लक्षित केला जातो

मी तर नेहमीच एकाकी असतो आधारासाठी वाट पाहत

मी काय देणार निर्णय?

 

पुढं इर्शा-राग-कपट-चिंता-निंदा-नालस्ती 

टक लावून पाहत असतात ऐकून म्हणतात

प्रेमात लग्नात आम्ही असतोच मनामनात

ताबा   ठेवल्याने आमची वाढ होते

म्हणून जगात आमची नाचक्की होते

आम्ही काही निर्णय देणार नाही

 

हताश होऊन दोघे पुढे जातात आणि पाहतात तर

 ब्रेक-अप आणि घटस्फोट भांडत असतात

दोघांपैकी नीच कोण?

मग काय कोण महान कोण नीच यावर जोरात रणकंदण

अखेरीस चौघांना पुढे विश्वासमामा दिसतात

मिश्कीलपणे हसतात आश्वासकपणे ऐकून निर्णय देतात

प्रेमात मी नसल्याने ब्रेक-अप होतात

लग्नात मी आस्तित्वहिन झाल्याने घटस्फोट होतात

उगाच महान कोण नीच कोण यात पडता

प्रेमाने ब्रेक-अप होउ नये म्हणून काळजी घ्यावी

तर लग्नाने घटस्फोट होऊ नयेत याची

जो यात यशस्वी होतो तो महान

कारण असं झालं नाही तर मन भावनाशून्य होते निर्दयी होतं हल्लीच्या शब्दात प्रॅक्टीकल होतं

म्हणून प्रेमात निभवावं लागतं आणि लग्न टिकवावं लागतं तरच जग सूरळीत चालतं

---भूषण वर्धेकर, दौंड.