Get it on Google Play
Download on the App Store

पेशवाईच्या त्रोटक हकीकतीचा पोवाडा

श्रीमंत ईश्वरी अंश, धन्य तो वंश, परम पुरुषार्थी ।

बरोबरी तयांची कोण करील पहातार्थी ॥ध्रुवपद॥

राजाधिराज महाराज, गरीब नवाज, धनी श्रीमंत ।

भासती सदैव देव आमचे हेच भगवन्त ॥

पाषाण धातुच्या मूर्ती, धरत्रीवरती, आहेत अनंत ।

त्या पूज्य परंतु नाहीत प्रगट जीवित ॥

तसे नव्हेत हे तर देव, कलिमध्ये भूदेव, ब्राह्मण संत ।

त्या वंशी पेशवे झाले सबळ बळिवंत ॥चाल॥

योग्यतेस आणिले पंत, होऊनिया कृपावंत, त्या राजांनी ।

ह्यामुळेच चढती कमान, धरुनी अभिमान.... ।

मग बहिरोपंत सोडवून, बिडी तोडवून, प्रभुच्या पणज्यांनी ॥चाल पहिली॥

पुढे प्रधानपद मिळवून, वैरी पळवून मारिल्या शर्थी ॥श्रीमंत०॥१॥

राव बाजी पुण्यामध्ये येऊन, हातावर घेऊन, निघाले शीर ।

प्रारंभी पाहिले जनस्थान रघुवीर ।

नेमाड माळवा मुलूख, करुन सरसलूख, मोडिले वीर ।

मेवाडचे राजे न धरती धीर ॥

गढमंडळ बुंदेलखंड, डंघईत अखंड, राहून थंड, सही केले ।

प्रतापे करून या जगात नाग मिळविले ॥चाल॥

बुडवूनि या बहाद्दरास, आणिली घरास, माषुक मस्तानी ।

दरवर्षी धौंशा घालून, जावे चालून अघाडीस मस्तानी ॥

शह दिला नगर थेट पास, खु...... । ........॥चाल पहिली॥

उपरात नर्मदाकाठी, सार्थकासाठी, मोक्ष कार्यार्थी ।

देह समर्पिला त्या स्थानी याच भावार्थी ॥ श्रीमंत ॥२॥

तेची दुनियेमाजी धन्य, न मानी अन्य, वंदिती स्वामी ।

जीव खर्च कराया सिद्ध धन्याच्या कामी ॥

तीन वर्षे राज्य वसवून, मोर्चे बसवून सभोवते धमामी ।

सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी ॥

हल्ल्यांत उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी ।

नऊ लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामी ॥चाल॥

बक्षीस दिले कडी तोडे, पालख्या घोडे, वाजे चौघडे, जमीदार्‍या ।

ठायी ठायी दिसती भरभरून, आख ठरवून,

सजीवल्या सरदार्‍या परशत्रू होईना खाक, वाटुनी परख, तशाच हवलदार्‍या ॥चाल पहिली॥

खूब केली तुम्ही तरवार, नावनिशीवार, म्हणून किती प्रार्थी ।

यशस्वी होता तो संवत्सर सिद्धार्थी ॥श्रीमंत॥३॥

बाळाजी बाजीराव प्रधान, केवळ निधान, होते प्राणी ।

आणिले पुण्यात जपानी नळाचे पाणी ॥

युद्धात जिंकुन नबाब, बसविली बाब, करून धुळदाणी ।

त्या सालीच बंगाल्यत घातली ठाणी ॥चाल॥

लागलेच केले कूच, स्वारी दरकूच, परतली सगळ्यांची ।

लष्करात केवढा गजर, होई नित्य नजर, मोती मणि पोवळ्यांची ।

वाटून खिचडी रमण्यात, आनंदे पुण्यात, मोहरापुतळ्यांची ॥चाल पहिली॥

खुष केले शास्त्री पंडित, विद्यामंडित, विप्र विद्यार्थी ।

गेले कीर्त गात ते ब्राह्मण तीर्थोतीर्थी ॥श्रीमंत०॥४॥

शत्रूस न जाती शरण, आल्या जरी मरण, न देती पाठ ।

दादाही गणावा त्यात, बाण भात्यात, भातांचे ताट ॥

भलत्याच ठिकाणी घाली रिपुशी गाठ ।

तिन्ही काळ निरंतर साधी, जातीने बांधी, हत्यारे आठ ॥चाल॥

फेडून नवस, माहेरास, गेले लाहोरास, जिंकित शेंडे ।

अरे जपानी सहज अटकेत, पाव घटकेत, लाविले झेंडे ।

सरदार पदरचे कसे, कोणी सिंह जसे, कोणी शार्दूल गेंडे ॥चाल पहिली॥

पुढे चाले वीरांचा भार, घेती करभार, स्वामी कार्यार्थी ।

हे पुरुष म्हणावे श्रेष्ठ बंधुचे स्वार्थी॥श्रीमंत०॥५॥

भाऊसाहेब योद्धा थोर, आंगामध्ये जोर, पुरा धैर्याचा ।

विश्वासरावही तो तसाच शौर्याचा ॥

दोहो बाजूस भाला दाट, पलिटेना वाट, अशा पर्याचा ।

किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ॥

दृष्टांत किती कवि भरील, काय स्तव करील, ऐश्वर्याचा ।

शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ॥चाल॥

कितीकांची बसली घरेच, हे तर खरेच, ईश्वरी कृत्य ।

शोकार्णवी नाना पडून, नित्य रडरडून, पावले मृत्यु ।

कवि गंगु हैबती दीन, पदांबुजी लीन, कृपेतील भृत्य ॥चाल पहिली॥

महादेव प्रभाकर ध्यायी, सदा गुण गाई, यथा साह्यार्थी ।

श्रीमंत प्रभूची कीर्त जशी भागीरथी ॥श्रीमंत०॥६॥