Get it on Google Play
Download on the App Store

रामायण बालकांड - भाग ३

दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टि यज्ञ केला अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात त्याने अश्वमेध केला. यावेळी दशरथाचे वय काय असावे? पुढे विश्वामित्राच्या आगमनाचे वेळी ’आपण साठ वर्षांचे आहोत व राम जेमेतेम सोळा वर्षांचा आहे’ असे तो म्हणाला. यावरून यज्ञाचे वेळी तो साधारण ४२-४३ वर्षांचा होता. म्हणजे अपत्ये होण्याचें त्याचें वय गेलेलें नव्हतें. मात्र तीन विवाह करूनहि पुत्रप्राप्ति झाली नव्हती. पुढे उल्लेख अहे कीं तीन राण्यांशिवाय त्याचा इतरहि बराच राणीवसा होताच! थोर असे वसिष्ट ऋषि राजाचे दरबारात असूनहि अश्वमेधाची जबाबदारी त्यानी स्वीकारली नाही! त्यासाठी ऋष्यशृंग ऋषीना बोलावून घ्यावे असा त्यानी दशरथाला सल्ला दिला. त्यानी असे कां केले असावे? दशरथाचा यज्ञ नेहमींचा अश्वमेध नव्हता. पुत्रप्राप्ति हा हेतु होता. पुत्रप्राप्तीच्या हेतूने करावयाच्या यज्ञामध्ये काही गौणत्व मानले जात होते काय? महाभारतातहि, द्रुपदाचा यज्ञ करण्यास कोणी ब्राह्मण / ऋषि तयार नव्हता असे म्हटले आहे. कदाचित या गौणत्वामुळेच वसिष्ठाने स्वत: यज्ञ चालवला नसावा.
या ऋश्यशृंगाची कथा मजेदार आहे. जन्मापासून तो वनात पिता व इतर ऋषिमुनि यांच्याच सहवासात वाढला होता. त्यामुळे त्याला स्त्रीरूप माहीतच नव्हते! रोमपाद नावाच्या राजाच्या राज्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता व ’ऋष्यशृंग तुझ्या राज्यात रहावयास आला तर त्याच्या पुण्याईने पाऊस पडेल’ असे त्याला सांगण्यात आले. त्याला मोहात पाडून घेऊन येण्याची कामगिरी वेश्यांकडे सोपवली गेली. त्यांना पाहून, या स्त्रिया हे न कळल्यामुळे हे कोणी वेगळ्याच प्रकारचे मुनि आहेत असे त्याला वाटले! मात्र रोमपादाच्या इच्छेप्रमाणे ऋष्यशृंग त्याच्या राज्यात आला व मग त्याच्या पुण्याईने रोमपादाचे पाप नष्ट होऊन पाऊस पडला! रोमपादाने आपली कन्या शांता त्याला दिली व ऋश्यशृंग त्याचेपाशी राहिला. दशरथाने आमंत्रण दिले त्याचा मान ठेवून रोमपादाने ऋश्यशृंगाला त्याचेकडे पाठवले. पूर्ण एक वर्षभर तयारी चालून मग दशरथाचा अश्वमेध झाला. त्याची कथा पुढील भागात पाहूं.