Get it on Google Play
Download on the App Store

अभिमन्युवध - भाग ४

संजयाने सर्व १८ दिवसांच्या युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकविले हे सर्व ज्ञात आहे. त्याचेसाठी कृष्णाने त्याला दिव्यदृष्टि दिली होती, तो सर्ववेळ धृतराष्ट्रापाशी बसून युद्धाचा ’आंखों देखा हाल’ त्याला ऐकवत होता, अशी एक भोळसट हरदासी समजूत आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. संजय प्रत्यक्ष युद्धभूमीवरच उपस्थित होता असे अनेक उल्लेख युद्धवर्णनात आहेत. शेवटच्या दिवशी तर त्याने स्वत: युद्धातहि भाग घेतला! मात्र त्याचे आधी, त्याला युद्धभूमीवर कोठेहि फिरण्यास आडकाठी करू नये असे दोन्ही पक्षानी मान्य केले असावे. आजहि वृत्तपत्रे वा रेडिओ-टीव्ही याना असे स्वातंत्र्य असते. त्याने, भीष्म पडल्यावर, द्रोण मारला गेल्यावर, कर्णाचा मृत्यु झाल्यावर व अखेरच्या दिवशी, अशा चार टप्प्यात युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला प्रथम संक्षिप्त व पुन्हा खुलासेवार असे ऐकवले असे महाभारतच म्हणते! पण कृष्णाला देवाचा अवतार बनवणाराना कोण आवरणार?
या दिवसाचे युद्धवर्णनहि व्यासानी संजयाच्या तोंडून धृतराष्ट्राला ऐकवले आहे. युद्धाला तोंड लागले तेव्हां चक्रव्यूहाच्या पुढे द्रोण स्वत:, जयद्रथ, अश्वत्थामा, शकुनि, शल्य व भूरिश्रवा हे पांडवांना सन्मुख सज्ज होते. द्रोणाने युधिष्ठिरावर आक्रमण करण्यापूर्वीच पांडवांच्या प्रमुख वीरांनी द्रोणावरच हल्ला केला. मदतनिसांच्या सहाय्याने द्रोणाने त्याना यशस्वीपणे तोंड दिले. आता आपल्या वीरांची परवा न करतां द्रोण आपल्यावरच कोसळेल असे दिसल्यामुळे (अर्जुन अर्थातच जवळ नव्हताच), नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यूला द्रोणावर आक्रमण करण्यास सोडले. हा वेळ पर्यंत चक्रव्यूह मागे तसाच होता. तो तोडण्यासाठी कोण पुढे येतो हे द्रोण पहात होता. तोंच द्रोणावर आक्रमण करून अभिमन्यूने अचानक, द्रोणाचीहि पर्वा न करतां, मुख्य चक्रव्यूहावरच आक्रमण केले. चक्रव्यूह तोडून आत घुसून त्याने अनन्वित संहार आरंभला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी दुर्योधन स्वत; पुढे झाला. अभिमन्यु हा महारथी असल्यामुळे दुर्योधनाचा पाड लागणार नाही हे जाणून द्रोणाने त्याच्या मदतीला दु:सह, दु:शासन, कृप, विविंशति, यांचे बरोबरच, स्वत:जवळ असलेल्या अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य, शकुनि यानाहि पाठवले व मग काही वेळाने तो स्वत:हि तिकडेच धावला. यामुळे युधिष्ठिरावर हल्ला करण्याचा बेत बाजूलाच पडला. युधिष्ठिराचा हेतु त्या वेळेपुरता सफळ झाला पण त्याची फार भयानक किंमत पांडवांना मोजावी लागली.