Get it on Google Play
Download on the App Store

जयद्रथवध भाग - ३

अर्जुनापासून जयद्रथाला एक दिवसभर वांचवण्यासाठी द्रोणाने सर्व कौशल्य पणाला लावून व्यूहरचना केली. सर्व सैन्याच्या व्यूहाच्या मागे दूरवर जयद्रथाला ठेवून त्याच्या रक्षणासाठी खुद्द जयद्रथाचेच मोठे सैन्य ठेवले. शिवाय कर्ण, अश्वत्थामा, शल्य, कृप, भूरिश्रवा, कर्णपुत्र वृषसेन या सहा महावीरांना मोकळे ठेवून त्याना अर्जुनाचा प्रतिकार करण्याचेच काम दिले. मुख्य सैन्याचा चक्रशकट नावाचा व्यूह रचून त्याचे प्रमुखपदी दु:शसन, दुर्मर्ष व विकर्ण याना नेमून व्यूहाच्या अग्रभागी द्रोण स्वत: होता. पाठीमागील कौरव सैन्याचा पद्मव्यूह रचून त्याचे प्रमुखपद कृतवर्म्याकडे दिले होते. हा सर्व व्यूह तोडून व सहा महावीरांचा प्रतिकार मोडून काढल्यावरच अर्जुनाला जयद्रथ दिसणार होता व मग त्याच्याशी अंतिम युद्ध करावयाचे होते! सहा महावीराना मोकळे ठेवण्याचा हेतु त्यानी दिवसभर अर्जुनाला पाळीपाळीने अडवावयाचे असा होता. हा एक Dynamic Defense चा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. अर्जुन हा व्यूह तोडण्यात व सहांशी लढण्यात दिवसभर मग्न असताना द्रोणाच्या हाताखालील वीरांचा मुख्य रोख युधिष्ठिरावर राहणार होता. त्याला पकडण्याची या दिवशी चांगली संधि होती. पांडवांनाहि याची जाणीव होती त्यामुळे या दिवशी मात्र व्यूहात शिरण्यापूर्वी अर्जुनाने युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी महारथी सात्यकीवर टाकली होती. या दिवशीच्या युद्धाचे फार निर्णायक परिणाम झाले त्याचे वर्णन महाभारतात फार सुंदर व खुलासेवार केले आहे. ते आता पुढील भागात वाचा.