Get it on Google Play
Download on the App Store

जयद्रथवध - भाग १

आजपासून नवीन विषयाला सुरवात करीत आहे. जयद्रथवध हे महाभारत युद्धातील एक अतिशय वेधक असे प्रकरण आहे. सर्व अठरा दिवसांच्या युद्धाचे खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. त्यातील संख्यात्मक अतिशयोक्ति व अद्भुत असे अस्त्रवापराचे वर्णन सोडून दिले तर युद्धहेतु, डावपेच, असेहि बरेच वाचण्यासारखे आहे. जयद्रथवधाच्या दिवशीचे डावपेच, दोन्ही पक्षांच्या प्रमुख योद्ध्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व कौशल्य, या दिवसाच्या घोर युद्धाचा दोन्ही पक्षांच्या तौलनिक बळांवर झालेला निर्णायक परिणाम, कृष्ण व अर्जुन दोघानीहि अनेक अडचणींवर दिवसभर धैर्याने व युक्तीने मात करून अखेर मिळवलेले यश या सर्वांमुळे हे एक अतिशय रंगतदार युद्धप्रकरण ठरते.
भीष्माच्या आधिपत्याखाली दहा दिवस युद्ध चालले तोवर दोन्ही पक्षांनी थोडाफार संयम राखला होता व अनुचित प्रकार झाले नाहीत. भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला, तसेच दहा दिवस युद्धापासून अलिप्त राहिलेला कर्णहि युद्धात उतरला. त्यानंतर डावपेचांचे युद्ध सुरू झाले! दुर्योधनाच्या सूचनेवरून द्रोणाने युद्धहेतु ठरवला कीं रणात युधिष्ठिराला पकडावयाचे व पुन्हा द्यूत खेळावयास लावून व हरवून वनांत पाठवावयाचे! युद्ध संपवण्याचा कौरवांनी ठरवलेला तो मार्ग होता. द्रोणाने या हेतूसाठी अट घातली की अर्जुनाला दूर ठेवू शकलात तरच हे जमेल, त्याच्या उपस्थितीत नाही! हा बेत साधला तर पांडवाना मारण्याची गरज उरणार नाही हे जाणून द्रोणाने तो मान्य केला असावा. पांडवपक्षाला हा बेत कळल्यामुळे द्रोण जिवंत असेपर्यंतच्या पांच दिवसांच्या युद्धात त्यांनी या बेताचा निकराने प्रतिकार केला. इंद्राकडून कर्णाला मिळालेली अमोघ शक्ति नष्ट होईपर्यंत कृष्णालाहि त्याचा व अर्जुनाचा निर्णायक युद्धप्रसंग टाळावयाचा होता. युधिष्ठिराला पकडण्याच्या बेताचा दुर्योधनाने बराच गाजावाजा केला होता, त्यामुळे आपला शब्द पाळण्याचे द्रोणावरहि दडपण होते.
द्रोणाच्या आधिपत्याखाली पहिल्या दिवशी (युद्धाच्या अकराव्या दिवशी) दोन्ही पक्षांच्या वीरांची घनघोर युद्धे झाली. अर्जुन उपस्थित असल्यामुळे द्रोणाचा बेत सफळ झाला नाही. दिवस अखेर पांडवांचीच सरशी राहिली. द्रोणानी पुन्हा म्हटले कीं अर्जुनाला इतरत्र गुंतवलेत तरच मला काही करतां येईल. तेव्हा त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा व त्याचे भाऊ यानी हे कार्य पत्करले. त्यानी अर्जुनाला अडवण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे बाराव्या दिवशी सुरवातीलाच त्यानी अर्जुनाला आव्हान दिले. युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम द्रुपदपुत्र सत्यजित याच्यावर सोपवून अर्जुन त्रिगर्तांकडे वळला. या दिवशी अर्जुनाने अद्भुत पराक्रम करून त्रिगर्त सेनेला धूळ चारली. मात्र इकडे द्रोणापुढे मात्रा न चालून सत्यजित मारला गेला. युधिष्ठिराला धृष्टद्युम्न व इतरानी वाचवले. पाठोपाठ राजा भगदत्ताने पांडवांवर जोराचा हल्ला केला व द्रोण बाजूलाच राहून भगदत्तच पांडवाना भारी पडू लागला तेव्हा त्रिगर्तांचा प्रतिकार मोडून काढून अर्जुन परतला व त्याने भगदत्ताला मारले. दिवसभर निकराचे प्रयत्न करूनहि दुर्योधन-द्रोणांचा बेत सफळ झाला नाही. दुर्योधनाने यासाठी द्रोणाला दोष दिला तेव्हा त्याने पुन्हा तेच म्हटले की अर्जुन असताना काही जमत नाही. त्यामुळे तेराव्या दिवसाचा युद्धबेत पुन्हा तोच ठरला की त्रिगर्तानी अर्जुनाला अडवावयाचे. द्रोणाने आश्वासन दिले की हे जमले तर आज मी पाडवपक्षाच्या एकातरी महान वीराला मारीन. युधिष्ठिराला पकडण्याबद्दल मात्र त्याने काही म्हटले नाही. हा दिवस अभिमन्यूचा व जयद्रथाचा ठरला व अभिमन्यु मारला गेल्यामुळे अर्जुनाने जयद्रथवधाची प्रतिज्ञा केली. त्याबद्दल सविस्तर पुढील भागात वाचा.