Get it on Google Play
Download on the App Store

धनिष्ठादि ......

 ‘अभिजितचे पतन’ यावर मी विस्तृतपणे लिहिले आहे. त्यातील इंद्राचे वचन ‘धनिष्ठादि तदा कालो ब्रह्मणा परिनिर्मितः ’ हे खूप विचार करावयास लावणारे आहे. त्या निमित्ताने काही विचार आपल्यासमोर ठेवीत आहे.
श्री. ओक आणि डॉ. प. वि. वर्तक यानी या वचनाचा असा अर्थ लावला आहे कीं ब्रह्मदेवाने कालगणना करण्याची पद्धत घालून दिली तेव्हा सूर्याच्या भ्रमणमार्गावरील चार बिंदु, उत्तरायण, दक्षिणायन, वसंतसंपात व शरदसंपात यांतील कोणतातरी एक बिंदु सूर्य धनिष्ठा नक्षत्रात असताना येत असला पाहिजे. या विषयात थोडे कुतूहल वाटणार्‍या माझ्यासारख्या सामान्य वाचकालाहि हे मत पटण्यासारखे आहे. आपणाला हेहि माहीत आहे कीं २६००० वर्षांमध्ये हे चारहि बिंदु नक्षत्रमालेतून मागे मागे सरकत एक फेरी पुरी करतील!
हे चार बिंदु आणि ऋतु यांचे निश्चित नाते आहे. आपल्या पूर्वजानी वर्षातील या चार घटनांची बर्‍याच जुन्या काळी नोंद घेतली असणार. सूर्य दक्षिणायन बिंदूत पोचला कीं उन्हाळा संपत येतो व पावसाळा सुरू होतो हा ठोकताळा त्यानी बांधला असणारच. सूर्य-चंद्र, तारे एका विषिष्ट मार्गानेच जातात हे ओळखल्यावर त्या मार्गावरील २७ तारकापुंज ठरवून त्याना नक्षत्रे म्हणून त्यांची नावे ठरवणे, ती निवडताना भ्रमणमार्गावर तीं साधारणपणे सारख्याच अंतरावर ठरवणे हे सर्व त्यानी केले. २७ कां तर चंद्र २७ दिवसात एक फेरी करतो तेव्हा दर रात्रीला त्याचे नवे घर अशी छान योजना केली. हे सर्व कधी झाले हे निश्चित माहीत आहे काय? त्याचेहि पूर्वी, जी संख्यांची गणना आपल्याला नैसर्गिक वाटते ती निर्मिली गेली असायला हवी!
ही सर्व प्रचंड आणि आश्चर्यकारक पूर्वतयारी झाल्यानंतरच ब्रह्मदेवाने आपली कालगणनेची पद्धत ठरवून जाहीर केली असली पाहिजे कीं ‘लोकहो, सूर्याचा दक्षिणायन बिंदु सूर्य धनिष्ठा नक्षत्रात पोचला कीं येतो. तेव्हाच उन्हाळा संपून पावसाला सुरवात होते. तेव्हां या दिवसापासून एक नवीन वर्ष सुरू होते हे जाणून घ्या. इंद्रानेहि, सूर्य धनिष्ठात पोचला कीं पाऊस पाडण्याचे आपले काम सुरू करावे!’
इंद्राच्या ‘धनिष्ठादि तदा ....’ या वचनाचा असा अर्थ मला वाटतो. सूर्याचा दक्षिणायन बिंदु धनिष्ठा नक्षत्रात असण्याचा काळ हा साधारणपणे १४,५०० BCE एवढा आहे. म्हणजे ब्रह्मदेवाची ही घोषणा तितकी जुनी आहे! त्याचेहि पूर्वी किती पूर्वतयारी झालेली असायला हवी ते विचारात घेतले तर आपल्या पूर्वजांच्या आश्चर्यकारक प्रगतीबद्दल आपणाला रास्त अभिमान बाळगण्यास काहीच हरकत नाही!
ब्रह्मदेवाने ही योजना केली त्याबरोबरच १,२,३,४, अशी वर्षगणना करण्याची योजनाहि केली असती, एक ‘ब्रह्मा शक’ सुरू केला असता, तर किती छान झाले असते? तसे झाले असते तर रामायण-महाभारतात वाल्मिकि-व्यासानी जागोजागी ‘ब्रह्मावर्ष ‘अमुक’ असताना असे घडले’ असे लिहून ठेवले असते! दुर्दैवाने असे झाले नाही, त्यामुळे संशोधकाना आता ‘कालनिर्णय’ करावा लागतो आहे! आणि वादविवादाना भरपूर स्थान आहे.