Get it on Google Play
Download on the App Store

किष्किंधा कांड - भाग १

राम-लक्ष्मण सुग्रीवाला भेटण्याच्या हेतूने मतंगवनाच्या परिसरात पोचले. ऋष्यमूक पर्वतावर आसरा घेतलेल्या सुग्रीव, हनुमान व इतरांनी त्याना पाहिले व हे कोण असतील हे त्याना कळेना. हे तरुण, सुदृढ व धनुष्यबाण धारण करणारे मानव आपल्याला मारण्यासाठी वालीकडून आले असावे अशी सुग्रीवाला भीती वाटली कारण तो सदैव वालीच्या भीतीने ग्रस्त होता व जीव मुठीत धरून या भागात वावरत होता. त्याने हनुमानाला सांगितले कीं तू नीट शोध घे कीं हे कोण व काय हेतूने येथे आले आहेत. त्याने हनुमानाला मार्मिक सूचना केली कीं त्यांच्याशी बोलताना अशी काळजी घे कीं तुझे मुख माझ्या दिशेला असेल म्हणजे मला लांबूनहि कळेल कीं हे मित्र कीं शत्रु! हनुमान राम-लक्ष्मणांपाशी आला. त्याने आपला व सुग्रीवाचा परिचय करून दिला व तुम्ही कोण अशी विचारणा केली. त्यावर रामाने खुलासा केला कीं आम्ही सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून त्याला भेटण्यास आलो आहोत. मग हनुमानाने सुग्रीवास आश्वासन देऊन राम-सुग्रीव भेट घडवून आणली. परस्परांनी आपली हकीगत व मदतीची अपेक्षा एकमेकांस सांगितली तेव्हां सहजच दिसून आले कीं दोघांनाहि एकमेकांची गरज आहे. सुग्रीव-वाली यांचेमधील कलहाची हकीगत ऐकल्यावर वालीची बाजू ऐकण्याची वाट न पाहतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं मी तुझ्यासाठी वालीला मारीन! सुग्रीवानेहि वचन दिले कीं सीतेच्या शोधामध्ये मी व माझे सर्व अनुचर संपूर्ण सहकार्य़ करूं सीतेने वानरांकडे फेकलेलीं वस्त्रे-आभूषणे समोर ठेवलीं गेलीं व तीं ओळखून रामाने अपार शोक केला. परस्परांनी वारंवार मदतीच्या आणाभाका घेतल्या. हनुमानाने मध्यस्थाचे काम उत्तम पार पाडले व येथून पुढे प्रत्येक प्रसंगात सुग्रीवाचे व रामाचे हित सारख्याच तत्परतेने सांभाळले. रामाने प्रथमच कळलेल्या वाली-सुग्रीव कलहात, न्याय-अन्याय ठरवण्यात वा वालीला भेटण्यात वेळ न घालवता, सरळ एकतर्फी सुग्रीवाची बाजू घेतली, असे कां केले याचा थोडा उहापोह पुढील भागात करूं.