Get it on Google Play
Download on the App Store

नलदमयंतीकथा भाग ४

दमयंतीच्या रूपगुणांचे वर्णन ऐकून चार देव तिच्या प्रेमांत पडून तिच्या स्वयंवराला चालले होते ते नलाला वाटेत भेटले. मानव स्त्रीच्या प्राप्तीसाठी प्रत्यक्ष देवच स्पर्धेत उतरले होते ही मोठी रमणीय कल्पना आहे. इंद्र, अग्नि, यम व वरुण हे ते चार देव. नलाला पाहून त्याचे रूप व गुण लक्षात आल्यावर आपल्याला काही चान्स नाही असेंच त्याना वाटले! मात्र प्रयत्न न सोडतां त्यांनी एक डाव टाकला! त्यांनी खुद्द नलालाच आपला दूत बनवलें व सांगितलें कीं तूं दमयंतीला निरोप दे कीं आम्ही चौघे स्वयंवराला येणार आहों व आमच्या पैकींच एकाला तूं पसंत कर! देवांची आज्ञा त्यामुळे नलाला हे एक धर्मसंकट उभें राहिलें राहिलें! आपल्यापरीने त्याने ते टाळण्यासाठी सबब सांगितली कीं दमयंतीला मी एकांतात कसा भेटणार व निरोप सांगणार तेव्हां माफ करा. पण देवांना त्याची परीक्षाच पहावयाची होती. त्यांनी म्हटलें कीं आमच्या प्रभावाने तुला तिला भेटतां येईल. नाइलाजाने नलाला कबूल करावें लागलें. त्याप्रमाणे नल नगरांत गेल्यावर दमयंतीला भेटला व त्याने मन घट्ट करून देवांचा निरोप तिला सांगितला. दमयंती म्हणाली कीं मी तुम्हालाच वरण्याचा निश्चय केला आहे. नलाने पुन्हा म्हटलें कीं प्रत्यक्ष देवांना सोडून तूं एका य:कश्चित मानवाला कसें वरण्याची इच्छा करतेस? दमयंतीने सांगितलें कीं मी तुमच्या रूपगुणांवर लुब्ध होऊन तुम्हाला वरण्यासाठीच स्वयंवर मांडले आहे. नल पुन्हा म्हणाला कीं मी देवांच्या आज्ञेवरून दूत म्हणून तुला भेटतो आहें तेव्हां मला यश देण्यासाठीं तूं त्यांच्या इच्छेप्रमाणे कर. त्यांची अवकृपा न होतां तूं मला कसें वरणार? दमयंती म्हणाली कीं हे स्वयंवर आहे आणि मंडपात देवांच्या उपस्थितीतच मी तुम्हाला माळ घालीन म्हणजे तुम्हाला दोष येणार नाहीं. नल परत गेला व 'मी तुमचा निरोप दमयंतीला दिला पण तिने मलाच वरण्याचे ठरवले आहे! तेव्हा माझा नाइलाज झाला’ असें त्यांना म्हणाला.देवांनी दोघांचीहि परीक्षाच पहायचे ठरवले होते त्यामुळे त्यांनी नलाला माफ केले पण स्वयंवर मंडपात एक नवीनच युक्ति केली. ती पुढल्या भागात.