Get it on Google Play
Download on the App Store

नलदमयंती कथा - भाग १

काय लिहावे असा विचार करताना नल-दमयंतीची कथा नजरेसमोर आली. या कथेत अद्भुत भाग पुष्कळ आहे मात्र तरीहि काही नवीन दृषिकोनातून लिहिता येईल असे वाटल्यामुळे सुरवात करीत आहे.
महाभारतातील हे एक अप्रतिम उपाख्यान आहे. यातील अद्भुत भाग सोडून जर कोणी पटकथा लिहिली तर एक सुंदर सिनेमा बनेल. अद्याप माझ्या माहितीप्रमाणे कोणी केलेला नाही.
पांडव द्यूतात हरून बारा वर्षांच्या वनवासात गेल्यावर कौरवांवर सूड उगवण्यासाठी द्रौपदी व भीम उतावळे झाले होते. तेरा वर्षे फुकट न घालवतां लगेच कौरवांवर चाल करावी असा त्यांचा आग्रह होता. द्यूताचा कैफ उतरल्यावर युधिष्ठिराला मात्र परिस्थितीचे उत्तम भान होते. भीम, द्रौपदी, कृष्ण, यादव, पांचाल यांनी कितीहि भरीस घातले तरी १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास हा पण मोडून ताबडतोब युद्धाला उभे राहण्यास तो मुळीच तयार नव्हता. मात्र वचन मोडावयाचे नाही या विचाराबरोबरच दुसरे मुख्य कारण म्हणजे लगेच युद्ध उभे केले तर भीष्म-द्रोण पूर्ण ताकदीने कौरवांची बाजू घेतील, इतर अनेक महावीर (त्यांत प्रमुख कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा) दुर्योधनाच्या मदतीला आहेत व विजय सहजीं मिळणार नाही हे तो जाणून होता. आरण्यकपर्वातील अध्याय ३६ मध्ये श्लोक १ ते २० मध्ये त्याने हे भीमाच्या गळीं उतरवले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे. आपली बाजू बळकट करण्यासाठी, व्यासांच्या सांगण्याप्रमाणे, अर्जुनाला अस्त्रविद्येतील पुढील शिक्षणासाठी व तपाचरण करून देवांना संतुष्ट करण्यासाठी त्याने दूर पाठवले व ’तुझ्यावर आमचा सर्व भार आहे आणि भीष्म-द्रोणांच्यापेक्षा जास्त अस्त्रज्ञान तुझ्यापाशी आल्याशिवाय आपला विजय होणार नाही’ याची त्याला स्पष्ट कल्पना दिली. अर्जुनाने प्रत्यक्ष महादेव व इंद्र यांचकडून नवीन अस्त्रविद्या संपादन केली. (माझ्या मतें त्याने ती वनातील अनार्य - किरात - योद्ध्यांकडून मिळवली! मात्र युद्धाचे प्रारंभीं ’माझ्यापाशीं जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान भीष्माला वा द्रोणालाहि नाहीं’ असें तो अभिमानाने त्यामुळेच म्हणूं शकला.) नंतर तो स्वर्गात इंद्रापाशी आहे असे व्यासांकडून पांडवांना कळले व ते त्याच्या परत येण्याची वाट पाहात होते. अशा काळात एकदां बृहदश्व नावाचे एक ऋषि पाडवांकडे आले. त्यांनी नल-दमयंतीची कथा पांडवांना ऐकवली. ती पुढील भागांत पाहूं.