Get it on Google Play
Download on the App Store

त्रिगर्त युद्धानंतर


विराट व पांडव यांनी त्रिगर्त राजाचा पूर्ण पराभव केला व ते दुसरे दिवशी सकाळी राजधानीला परतले. मात्र सकाळीच कौरवांचा उत्तरेकडून हल्ला आला तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुमारवयाच्या राजपुत्र उत्तराला जावे लागले. त्याचे सारथ्य करण्यासाठी बृहन्नडावेषातील अर्जुन द्रौपदीच्या आग्रहावरून गेला. अर्जुन व द्रौपदी दोघानाही माहीत होते की कौरवांपुढे उत्तराचा मुळीच निभाव लागणार नाही व अर्जुनालाच लढावे लागणार आहे व तो लगेचच ओळखला जाईल. दोघानीहि त्याची पर्वा केली नाही. सौरमानाने तेरा वर्षे आज सकाळीच पुरी झालेली आहेत अशी त्यांची खात्री असली पाहिजे. मग कौरवांचा समाचार घेण्याची संधि अर्जुन कशाला सोडील? अपेक्षेप्रमाणेच उत्तराची जागा अर्जुनाला घ्यावी लागली व जरी तो बृहन्नडा वेषांत होता तरी कौरवांनी त्याला लगेचच ओळखले. दुर्योधनाने ताबडतोब सांगून टाकले की हा अर्जुन ओळखला गेला आहे व अद्न्यातवासाची मुदत पुरी झालेली नाही. तेव्हा त्यांना राज्य देण्याचा प्रष्नच उद्भवत नाही, त्यानी पुन्हा बारा वर्षे वनात जावे. (विराटपर्व अ. १ श्लोक १-७).

अर्जुनाला ओळखून भीष्म द्रोण व इतर कौरववीरहि चकित झाले. द्रोण व दुर्योधन यांनी विचारल्यावरून यावेळी भीष्माने प्रथमच सौरवर्षाचा विचार करून अधिकमासांचे गणित मांडले. त्यांनी म्हटले की बारा चांद्रमासांचे चांद्रवर्ष व सौरवर्ष यांतील फरकामुळे पांच चांद्रवर्षांमध्ये दोन अधिकमास धरावे लागतात (५८ + २ = ६०). या हिशेबाने तेरा चांद्र्वर्षांचे वर (१५६ चांद्रमासांचे वर) पांच महिने व बारा रात्री एवढा अधिक काळ मोजावा लागेल. द्यूताच्या दिवशीच्या संध्याकाळ्पासून आज सकाळपर्यंत हा काळ पुरा झाला आहे! भीष्माने बारा दिवस न म्हणतां बारा रात्री असे कां म्हटले? कारण वनवास द्यूत संपल्याबरोबर संध्याकाळी लगेच सुरू झाला व ती रात्र व कालची रात्र देखील विचारात घेऊन बारा रात्री पुऱ्या झाल्या होत्या व अद्न्यातवास सौरमानाने जेमतेम पुरा झाला होता! दुर्योधनाने हे गणित साफ धुडकावून लावले व मी पांडवांना राज्य मुळीच देणार नाही असे साफ सांगितले. भीष्म, द्रोण वा इतर कुणीहि यावर काही मतप्रदर्शन केले नाही.
सौरवर्ष व चांद्रवर्ष यांतील फरक जुळवून घेण्यासाठी भीष्माने सांगितलेली व सध्या प्रचलित असलेली पद्धति यांत थोडा फरक आहे. साधारणपणे दरेक चांद्रमासामध्ये सूर्य कोणत्यातरी दिवशी एका राशीतून पुढील राशीत प्रवेश करतो. त्या राशिनामावरून त्या महिन्याचे नाव ठरते. मात्र ज्या महिन्यामध्ये असे राशिसंक्रमण होत नाही तो महिना बिननावाचा, अधिक महिना होतो. साधारणपणे दर २८-२९ चांद्रमासांनंतर असा अधिक महिना येतो. महाभारतकाळी आपल्याकडे राशी नव्हत्या. नक्षत्रे होती. आप्ली महिन्यांची नावे नक्षत्रांवर आहेत. राशी पुष्कळ मागाहून, वराहमिहिराच्या काळी आल्या. सूर्याच्या भ्रमणमार्गाचे बारा समान भाग म्हणजे राशि. सूक्ष्म वेधाशिवाय राशिसंक्रमण निश्चित करणे पूर्वी शक्य नव्हते त्यामुळे आताची पद्धतहि शक्य नव्हती. राशि ग्रीकांकडून आल्या असे म्हणतात. आपली व परदेशीयांची राशिनामेहि त्यामुळे एकच आहेत. पूर्वी ५८ महिन्यांनंतर महिने व ऋतु यांचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाई व मग दोन महिने एकदम अधिक घेऊन ते पुन्हा जुळवले जात होते (एकेक ऋतु दोन महिन्यांचा असतो) असा तर्क करणे सयुक्तिक वाटते. वनवास-अद्न्यातवासाच्या तेरा वर्षांच्या काळात १५६ चांद्र्मासांचेवर २ अधिक महिने तीन वेळा आले असले पाहिजेत. दोनच वेळां आले असते तर तेरा चांद्रवर्षे सौरवर्षांपेक्षा लवकर संपली असती व काही प्रष्नच उभा राहिला नसता ! पांडवांना सहा अधिक महिने मोजायचे होते. कीचकाचा वध करावा लागला नसता तर युधिष्ठिराने तसेच केले असते! शेवटचे दोन अघिक महिने पूर्वीच येऊन गेलेले असते तर इलाज नव्हता. पण त्रिगर्त-कौरवांच्या आक्रमणामुळे उघडकीला येण्याची पाळी आली. विराटाची बाजू घेणे भागच होते कारण त्याने वर्षभर आश्रय दिला होता. यावेळी बहुधा सहावा अधिकमास चालू होता. त्यामुळे तेरा सौरवर्षे सकाळी पुरी झाली आणि अर्जुन खुशाल प्रगट झाला! मात्र पांच महिने-बारा रात्री व सहा महिने यांतील फरक, १८-१९ दिवस कमी पडले हे नक्की!