Get it on Google Play
Download on the App Store

किष्किंधाकांड भाग २

वाली व सुग्रीव यांचेमधील कलहाबद्दल रामाला पूर्वीची काहीहि माहिती नव्हती. वानर हा समुदाय पशूंचा खासच नव्हता कारण त्यांचा व मानवांचा खुलासेवार वाद आणि संवाद होऊं शकत होता. मात्र उत्तर भारतातील ज्या मानवसमूहातून राम आला होता त्यांचा व वानरकुळांचा संबंध आलेला नव्हता. उलट रावणाचा व वाली-सुग्रीवांच्या वानरसमाजाचा संबंध व विग्रह होता असे वर्णनावरून स्पष्ट दिसते. या समाजाचे रीतिरिवाज रामाला अपरिचित होते. वाली व सुग्रीवांचा कलह ही रामायणातील वर्णनावरून एक दुर्दैवी घटना होती. वालीचा सुग्रीवावर राग होण्यास त्याच्या दृष्टीने सबळ कारण घडले होते कारण वालीची वाट पहात न बसतां त्याने राज्य स्वीकारले होते. मात्र तरीहि वालीने सुग्रीवाला ठार मारले नव्हते तर राज्याबाहेर घालवले होते. राज्यावर वालीचाच अधिकार होता. सुग्रीवाची पत्नी वालीने बळकावली होती हा त्याच्यावर प्रमुख आरोप होता. मात्र पूर्वी वाली गुहेत अडकला असताना व (लोकाग्रहास्तव) राज्य चालवताना व वालीवधानंतर सर्वाधिकारी झाल्यावर सुग्रीवानेहि वालीची पत्नी तारा हिला (तिच्या इच्छेने कीं इच्छेविरुद्ध?) पत्नीपद दिलेच. अर्थ इतकाच घेतला पाहिजे कीं वानरसमाजात पतिपत्नी नाते काहीसे ढिलेच होते! त्यामुळे वालीचा अपराध वधाची शिक्षा देण्याएवढा घोर नक्कीच म्हणतां येत नाही आणि रामाला वालीला मारण्याचा काही खास नैतिक अधिकार होता असा दावा करता येत नाही. रामाने सुग्रीवाला वचन दिले त्याचे कारण वेगळे शोधले पाहिजे.
रामाला स्पष्ट दिसत होते कीं सीतेच्या शोधासाठी व रावणावर स्वारी करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार होते. ते अयोध्येहून मिळवतां आले असते पण फार वेळ गेला असता. त्यापेक्षा जवळचा मार्ग म्हणजे दक्षिण भारतातील या प्रबळ वानरसमाजाला आपल्याकडे वळवणे. वालीकडेच मदत मागितली असती तर कदाचित त्यानेहि दिली असती. पुढे वालीने मरणापूर्वी तसे रामाला म्हटले देखील. पण ’गरजू’ म्हणून वालीपुढे जाण्यापेक्षा ’उपकारकर्ता’ म्हणून सुग्रीवाचे साहाय्य घेणे जास्त सन्मानाचे! त्यामुळे वाली-सुग्रीवांच्या कलहाची कथा ऐकल्यावर, योग्यायोग्य, नैतिक-अनैतिकतेचा घोळ घालत न बसतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं ’मी तुझ्या वतीने वालीचा वध करीन’ व त्या बदल्यात सुग्रीवाकडून सीतेचा शोध व सुटका यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन मिळवले.