Get it on Google Play
Download on the App Store

परशुराम कथा

महाभारतांतील परशुरामकथा ही देखील आपल्या समजुतीपेक्षा थोडी निराळी आहे.
परशुरामाचा पिता जमदग्नि. हा भृगुचा नातू व ऋचीकाचा पुत्र. तो वेदवेत्ता व सर्व शास्त्रांचा व शस्त्रांचाहि जाणकार होता. मात्र जमदग्नि म्हणजे शीघ्रकोपि अशी आपली समजूत असते तसा तो नव्हता! परशुरामाची माता रेणुका ही राजा प्रसेनजित याची कन्या म्हणजे क्षत्रियकन्या. रेणुका व जमदग्नि यांचे चार पुत्र, त्यांत परशुराम सर्वात लहान. स्नानासाठी नदीवर गेलेली असताना जलक्रीडा करीत असलेल्या राजा चित्ररथावर, ( कार्तवीर्यावर नव्हे!) क्षणभरासाठी कां होईना, रेणुकेचे मन गेले. त्या मानसिक व्यभिचाराने रेणुका निश्चेष्ट होऊन पाण्यात पडली. आश्रमात परत आली तेव्हां तिची अवस्था जमदग्नीने ओळखली व तिचा धि:कार केला. चारही पुत्र क्रमाने आश्रमांत आले तसतसे जमदग्नीने प्रत्येकाला आईला मारून टाकावयास सांगितले. मोठ्या तिघांनीहि नकार दिला. त्यांना पित्याने रागाने शाप दिले. चौथ्या परशुरामाने मात्र आज्ञेप्रमाणे परशूने आईचे मस्तक तोडले. जमदग्नीचा क्रोध एकदम शमला व त्याने परशुरामाला ’वर माग’ असे म्हटले. परशुरामाने मागितलेले वर लक्षणीय आहेत. ’आई जिवंत व्हावी, मी मारल्याची तिला स्मृति राहूं नये, मानसिक पापाचा स्पर्श तिला न व्हावा, भावांचे शाप परत घ्यावे, आणि स्वत: युद्धात अजिंक्य व दीर्घायुषी व्हावे’ असे ते वर होते. व ते सर्व पित्याने त्याला दिले.
जमदग्नीचे सर्व पुत्र आश्रमाबाहेर गेले असताना एकदां राजा कार्तवीर्य सहस्रार्जुन आश्रमांत आला. रेणुकेने त्याचे योग्य ते स्वागत केले तरीहि त्याने आश्रमाचा विध्वंस केला. (जमदग्नीला मारले नाही!) परशुरामाने परत आल्यावर ते पाहून रागावून कार्तवीर्यावर चाल करून त्याचा वध केला. पुढे एकदा परशुराम आश्रमात नसताना पुन्हा कार्तवीर्याच्या पुत्रांनी आश्रमांत येऊन, जमदग्नीवर हल्ला करून त्याला मारून टाकले. परशुराम परत आल्यावर पितृहत्या पाहून त्याने फार विलाप केला व युद्ध करून त्याने सर्व कार्तवीर्य पुत्राना व त्यांच्या मदतनीस सर्व क्षत्रिय राजाना मारले. वारंवार झालेल्या युद्धांमुळे एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय झाली. नंतर यज्ञ करून परशुरामाने सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली. कश्यपाने त्याला आपल्याला दान केलेल्या भूमीवर वसती करण्यास मनाई केली. त्यामुळे परशुराम महेद्रपर्वतावर वसती करूं लागला. परशुरामाने नवीन वसवलेल्या कोकण भूप्रदेशात हा महेंद्रपर्वत असल्याचे मानले जाते. नंतर कधीहि परशुराम रात्री इतर कोठे राहत नसे. याचा इतरत्रहि उल्लेख आहे. रामाने शिवधनुष्य तोडले तेव्हां व भीष्माने अंबेचा स्वीकार करण्याचे नाकारले तेव्हां त्याने त्या दोघांना शिक्षा करण्याचा त्याने प्रयत्न केला पण दोन्ही प्रसंगी तो हरला. त्याचे बळ संपले होते व क्षत्रिय राजे पुन्हा प्रबळ झाले होते. या कथेप्रमाणे जमदग्नीच्या वधाचा दोष कार्तवीर्याला नव्हे तर त्याच्या पुत्रांना दिलेला आहे. तेव्हां ’सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला’ हे दशावतार आरतीतील वर्णन बरोबर नाही!