Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय १५

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा ।

तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥

राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें ।

तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥

आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला ।

आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥

या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार ।

देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥

एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता ।

पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥

अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।

कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥

शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा ।

देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥

देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें ।

आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥

तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार ।

मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥

टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर ।

दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥

निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी ।

ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥

करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य ।

सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥

वाक्‌चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें ।

धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥

कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।

ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥

तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला ।

लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥

झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची ।

मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥

दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान्‌ बडेबडे ।

जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥

अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे ।

नांव ऐकतां टिळकांचें । वर्‍हाड सारें आनंदलें ॥१८॥

शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं ।

झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥

शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती ।

ती वर्‍हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥

त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला ।

वर्‍हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥

माता होती वर्‍हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी ।

अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥

आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा ।

आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥

आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी ।

ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥

अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले ।

तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥

या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला ।

श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥

शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा ।

समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥

टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्‍न ।

त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥

ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें ।

ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥

तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां ।

तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥

फिरेल नागवा सभेंत । "गिण गिण गणांत" ऐसा म्हणत ।

मारील वाटे कदाचित्‌ । तो लोकमान्याला ॥३१॥

कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें ।

गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥

त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेडयाकारण ।

जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥

खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक ।

तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥

खर्‍याखोटयाची परीक्षा । साधूच हे करिती देखा ।

म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥

ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली ।

आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥

येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी ।

आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥

वेडयापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं ।

सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥

करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर ।

याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥

स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा ।

शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥

त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास ।

तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥

पाहा पाहा कोल्हटकरा । वर्‍हाडप्रांताचा ज्ञानहिरा ।

यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥

यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें ।

खर्‍या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥

बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास ।

तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥

मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला ।

चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥

खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार ।

आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥

वर्‍हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें ।

कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥

शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।

वर्‍हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥

सण अक्षय्यतृतीयेचा । वर्‍हाडप्रांतीं महत्त्वाचा ।

परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥

तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण ।

लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥

शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी ।

ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥

मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला ।

म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥

परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं ।

साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥

सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी ।

गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥

सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा ।

त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥

श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान ।

खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥

दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई ।

सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥

आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार ।

त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥

सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला ।

मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥

"दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन ।

स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥

त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची ।

जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥

त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला ।

म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥

तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले ।

श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥

म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी ।

अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥

स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।

स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥

यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्‍न ।

ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥

ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती ।

तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?" ॥६७॥

ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले ।

गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥

आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत ।

जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥

त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला ।

आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥

अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत ।

ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥

सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली ।

खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥

भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला ।

दोर्‍या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥

राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें ।

वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥

प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची ।

त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥

दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे ।

ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥

अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं ।

बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥

तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी ।

सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥

मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें ।

तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥

लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त ।

येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥

तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते ।

तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित्‌ ॥८१॥

कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं ।

जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥

कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची ।

कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥

जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड ।

ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥

चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले ।

तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥

अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला ।

होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥

सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।

कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥

ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर ।

टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥

या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी ।

जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥

ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर ।

समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥

ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला ।

वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥

तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत ।

स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥

यश तुमच्या प्रयत्‍नासी । नाहीं निश्चयेंसी ।

आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥

जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो ।

हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥

माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी ।

ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥

भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन ।

आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥

प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी ।

दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥

झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास ।

तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥

हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी ।

मान जगत्‌-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥

या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।

त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥

बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी ।

केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥

कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर ।

कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥

हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी ।

या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥

येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर ।

कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥

स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते ।

पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥

त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥

गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई ।

आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥

यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर ।

चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥

असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्‌पावन जातीचा ।

श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥

तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत ।

आंग्‍लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥

पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला ।

म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥

तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र ।

तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥

आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला ।

उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥

टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून ।

अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥

तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें ।

ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥

द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत ।

घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥

तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्‍यासी ।

जो मन्‍रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥

त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला ।

तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥

मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें ।

दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥

चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला ।

त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥

दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त ।

उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥

पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं ।

आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥

दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत ।

बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥

मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा ।

म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेडया करुं नको ॥२४॥

अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत ।

सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥

त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं ।

कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥

ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे ।

बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥

तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती ।

याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥

ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी ।

हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥

अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन ।

या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥

तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला ।

योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥

तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई ।

ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥

पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला ।

विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥

एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन ।

कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥

महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही ।

कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥

जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत ।

तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥

श्रीधर बी.ए.एम्‌.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें ।

शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥

संत साक्षात्‌ ईश्वर । चालते बोलते भूमीवर ।

त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥

पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला ।

म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥

हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें ।

वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥