Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय १९

भीमराजाची कथा

(गीति)

व्यासें विनीत वचनें, पुशिलें कमलोद्‌भवास गणपतिचें ।

मजला महात्म्य सांगें, ऐकुन कथिलें प्रसन्नशा वाचें ॥१॥

पूर्वीं विदर्भदेशीं, नगर असे एक नाम कौण्डिन्य ।

तेथिल राजा होता, अभिधानें भीमराज जगमान्य ॥२॥

त्याची भार्या सुंदर, नाम असे चारुहासिनी व्यासा ।

कथितों कथा तयांची, सुरस असे ऐकतां रमे मनसा ॥३॥

राजा पराक्रमी तो, धर्मार्थी दानशूर बहुसाळ ।

आश्रित ब्राह्मन होते, सुविद्य सद्‌गुणि सुजाण तेजाळ ॥४॥

त्याला बहूत राजे, देती करभार नेमिल्या वेळीं ।

हय गज सैनिक संख्या, दशकोटी ती असे तयाजवळी ॥५॥

त्याची भार्या होती, आज्ञांकित ती पतिव्रता मोठी ।

देवद्विजांस पूजी, बहुगुण आणी सुभाग्यशी मोठी ॥६॥

सारें सौख्य असूनी, संतानाचे सुखास दंपत्य ।

मानस दुःखित होतें, अंतरलें त्या सुखास हें सत्य ॥७॥

एके दिवशीं भूपति, पत्‍नीला बोलिला सुतारहित ।

राज्य कशाला व्हावें, सेवूं कांतार हें असे उचित ॥८॥

ज्याला पुत्र नसे तो, त्याला स्वर्गी नसेच जागा ती ।

पुत्रावांचुन हव्या, देव तसे पितर कव्यही त्यजिती ॥९॥

उत्तम कुल हें आणिक, उत्तम गृह तें नको मला कांते ।

तैसें सु-राज्य मातें, भोगायाला उदास हें दिसतें ॥१०॥

एकंदरींत अपुला, जन्महि झाला फुका असा गेला ।

यास्तव अरण्य सेवूं, दुःखानें पत्‍निला असें वदला ॥११॥

ऐसें बोलुन सतिला, पाचारुन आणिलें प्रधानांस ।

प्रातःकाळीं भूपें, मनरंजन आणखी सुमंतास ॥१२॥

बुद्धीनें, नीतीनें, युक्त तसे राज्यरक्षणी निपुण ।

होते प्रधान त्याचे, रक्षाया राज्य दीधलें जाण ॥१३॥

जेव्हां परतुन येऊं, उपभोगूं राज्य आमुचें आम्ही ।

नाहिं तरी दोघांनीं, समभागा करुन भोगणें तुम्हीं ॥१४॥

(वसंततिलका)

एणेंपरी सकल ते भवपाश दूर ।

राजा करी प्रथम हे अघ-ताप दूर ॥

व्हावे म्हणून करिती वनवास व्यासा ।

पाहें सुदीन गमनास यथार्थ खासा ॥१५॥

पुण्याहवाचनविधी करि भीम आधीं ।

दानें द्विजांस दिधलीं हरणार्थ आधीं ॥

पत्‍नीसहित धरिला वनमार्ग त्यांनीं ।

पाहे तडाग भरलें जल अंबुजांनीं ॥१६॥

पुष्पें फलें प्रचुरशीं दिसलीं तरुंला ।

त्यांमाजि भव्य मुनिचें गृह एक त्याला ॥

पाहे अपूर्व नयनीं नृप हें विचित्र ।

मार्जार-मूषक जणूं समभाव मित्र ॥१७॥

मुंगूस सर्प समभाव धरुन एकी ।

तैसेच सिंह गज हे विसरुन बेकी ॥

राजास ती सति म्हणे अति नम्रवाचें ।

वंदूं चला चरन त्या मुनि आश्रमींचे ॥१८॥

(भुजंगप्रयात्)

अशा आश्रमीं आसनीं बैसले ते ।

ऋषी नाम विश्वायुतमित्र जे ते ॥

तयांभोंवतीं बैसला शिष्यवृंद ।

तयां वेदघोषीं असे फार छंद ॥१९॥

पदीं राज्ञि नी भूपती लीन होती ।

अशा पुण्यराशी ऋषींना नमीती ॥

तया दंपतीला दिलें आसनाला ।

वरी बैसतां भाव तो ओळखीला ॥२०॥

ऋषी त्या द्वयांना वदे मोदयुक्त ।

तुम्हां पुत्र होवो गुणी कीर्तियुक्त ॥

नृपासी मुनी वृत्त हें पूसतात ।

तुम्ही कोठुनी येतसां या स्थलांत ॥२१॥

वदे भूपती नाम वैदर्भ प्रांत ।

असें कोणतें स्थान बा सांग वृत्त ॥

तयामाजि कुंडीनपुरीं वसें मी ।

मला लोक संबोधिती भीम नामीं ॥२२॥

(मंदाक्रांता)

सूतासाठीं तप बहुत कीं दान-धर्मादि केलीं ।

यापूर्वींचें स्मरण मजला पापं हीं काय केलीं ॥

यासाठीं कीं मज फळ नसे लाधलें नाहिं आतां ।

राज्याला मीं त्यजुन वन हें सेविलें माय तातां ॥२३॥

आतां दैवें मजसि तुमचें दर्शनें लाभ पूर्ण ।

आशीर्वादें बहुत गुणिं तो पुत्र होईल तूर्ण ॥

साधूंचा हा सुखकर असा संग होईल सांग ।

संतानाचें वदन न दिसे पाप मागील सांग ॥२४॥

(गीति)

विश्वामित्र वदे त्या, भीमाला एक पूर्विंचें कथन ।

विधि व्यासासी सांगे, तीच कथा तो भृगू करी कथन ॥

संपत्तीच्या गर्वें, त्यागियले ते समस्त कुल-धर्म ।

झालास अंध भूपा, सांगतसें मी तुला गुपित वर्म ॥२६॥

वेदपुराणांमाजी, शास्त्रांमाजी तसाच लौकीकीं ।

आणिक विषयांमाजी, उत्तम ज्ञानी म्हणून लौकीकीं ॥२७॥

असलें साधूपूजन, गणपतिचें करित नित्य नियमांनीं ।

त्यांचें पूजन केलें, नाहीं म्हणुनी तुला निसंतानीं ॥२८॥

कुलदैवत हें तुमचें, गणपति असुनी करी न पूजन तें ।

यास्तव तुजवरि त्याचा, कोप असे हा मला खरें दिसतें ॥२९॥

विश्वामित्र नृपाला, सांगे वृत्तान्त तो करी श्रवण ।

ऐकावयास झाले, दोघाम्चे ते पिपासु हो श्रवण ॥३०॥

पूर्वज पिढींत भीमच, राजा तो सातवा असे पुरुष ।

त्याची भार्या कमला, प्रसवे पुत्रास ती बहु वरुषं ॥३१॥

जन्मापासुन बहिरा, तैसा कुबडा असे मुका पुत्र ।

बहु-भगयुक्तहि अंगीं, दुर्गंधीनें तसाच अपवित्र ॥३२॥

(हरिणी)

प्रभु मज अशा पुत्रासी तूं कशास दिधलें मला ।

असुत मजसी ऐसें कोणीं जरी वदलें मला ॥

अवघड मनीं नाहीं देवा कधींचहि वाटलें ।

मरण मजसी किंवा यासी दिल्यासहि चांगलें ॥३३॥

कु-सुत असला दावूं कोणा मदीय मुखास मी ।

रुदन करिते दुःखानें ती वदे असुखीच मी ॥

नृप परिसुनी आला तेथें बघे सति नी सुता ।

मधुरवचनीं झाला तीतें वदे समजावितां ॥३४॥

(मंदाक्रांता)

हे कल्लयाणी नृप सतिस हें दुःख तें सोड बोले ।

मीं तूं पूर्वीं जनित असतां कर्म जें आचरीलें ॥

त्याच्यायोगें फल मिळत असें भोगणें योग्य साचें ।

नानाशब्दें नृप सतिस हो आळवी गोड वाचें ॥३५॥

सौख्यें दुःखें टिकत नसती फार तीं काळ कांते ।

जो जो प्राणी सुख बहुत हें भोगितो जाण त्यातें ॥

होती दुःखें तदुपरि पहा साहण्या योग्य होतो ।

यासाठी तूं दृढ मन करीं आवरीं शोक जो तो ॥३६॥

(गीति)

असलें बालक आहे, म्हणुनी कांते करुं नको शोक ।

याचें संचित म्हणुनी, जन्म असे पावलें उभय लोक ॥३७॥

यास्तव दोघें करुंया, कल्लयाणाचे उपाय मंत्र-मणी ।

अथवा औषध देऊं, यात्रा तपसा करुं बरें रमणी ॥३८॥

किंवा दानें देऊं, कल्लयाणास्तव व्रतादि नियमांनीं ।

बहुविध प्रकार करुनी, सुंदर बालक दिसेल अंगांनीं ॥३९॥

मंत्र-प्रभाव मोठे, ग्रंथांमाजी लिखीत हे साचे ।

कमलेला भीम असे, संबोखित तो मधुरशा वाचें ॥४०॥