Get it on Google Play
Download on the App Store

रात्र पाचवी मथुरी

श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा.'

"अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे.' असे म्हणून श्यामने सुरूवात केली.

'मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो; परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले.

'आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. घरी असते. हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणा-या बायकांना कांडपिणी म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंशपरंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात. जणू वतनच ते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा दोनतीन कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता, तो लहान होता. दहाबारा वर्षांचा असेल. 'मथुरी उन्हाळयाच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू, वगैरे आणून द्यावयाची. पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. अळूसुध्दा गोड फळ आहे. त्याचा तपकिरी रंग असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञताबुध्दीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही.

'का ग गज-ये, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला? ही दुसरी कोण आली?' आईने विचारले.

गजरी म्हणाली, 'मथुरीला ताप आला आहे. मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे.'

आपणास कामावर जाता न आले तर दुस-या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे, ही कर्तव्यबुध्दी त्या गरीब मोलकरणीतही होती.

'बराच आला आहे का ग ताप?' आईने विचारले.

इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, 'श्यामची आई! माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल.'

'बरे हं.' आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली.

दुपारी बाराएक वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला.

'गुरांना पाणी घातलेस का, शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाही तर गुरे पायांनी तुडवितील व त्यातच बसतील; गवत घालून ठेव.' आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, 'सारे केले. आता मी जातो.' 'थांब शिवराम. इकडे ये जरा.' आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणिले. 'शिवराम हे तुझ्या आईला हो. म्हणावं लौकर बरी हो.' असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रूमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला.

तिन्हीसांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. 'गज-ये! ती समई कोंडयाला पुसून नीट लख्ख करून ठेव.' आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडणाच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंडयाला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या.

शिवरामाने झाडांना पाणी घातले, गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, 'शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा; त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरूण घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते.' असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला.

मथुरेने शिवरामाला विचारले, 'शिवराम! हे कोणी दिले?'

शिवराम म्हणाला, 'श्यामच्या आईने.' मथुरी म्हणाली, 'देवमाणूस आहे माउली. सा-यांची काळजी आहे तिला.' मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही. तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला.

'शिवराम! तुझ्या आईचे कसे आहे?' आईने विचारले.

'कपाळ लई दुखते, सारखे ठणकते; अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोपबी नाही.' त्याने सांगितले.

'बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबरशिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल.' आई म्हणाली.

तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला. शेणाच्या गोव-या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली.

दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्याएवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबरशिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात.

काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती. अशक्त झाली होती; परंतु ती कामावर येऊ लागली. पंधरावीस दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, 'मथु-ये! किती ग वाळलीस तू ! कांडण होईल का तुझ्याकडून?'

मथुरी म्हणाली, 'बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरूणावर पडून खाल्ले, पुरे आता; हिंडती फिरती आता झाली आहे. चार दिवसांनी होईन धडधाकट ! तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला ?'

आई म्हणाली, 'अग सारी देवाची कृपा. आम्ही किती एकमेकांना पुरणार! बरे पण, मुलांचा भात झाला आहे. तूही चार घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथेच जेव पोटभर, ऐकलेस ना?'

त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्या वेळेस केवढी कृतज्ञता होती!

ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत. तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, 'अरे हे काय श्याम!' तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, 'श्याम! तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लौकर. सा-यांवर तिचा लोभ.'

अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती.

श्यामची आई

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
प्रारंभ रात्र पहिली सावित्री-व्रत रात्र दुसरी अक्काचे लग्न रात्र तिसरी मुकी फुले रात्र चवथी पुण्यात्मा यशवंत रात्र सहावी थोर अश्रू रात्र सातवी पत्रावळ रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना रात्र नववी मोरी गाय रात्र दहावी पर्णकुटी रात्र अकरावी भूतदया रात्र बारावी श्यामचे पोहणे रात्र तेरावी स्वाभिमान- रक्षण रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण रात्र अठरावी अळणी भाजी रात्र एकोणिसावी पुनर्जन्म रात्र एकविसावी दूर्वांची आजी रात्र बाविसावी आनंदाची दिवाळी रात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर रात्र चोविसावी सोमवती अवस रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय रात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण रात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय रात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे रात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने रात्र एकतिसावी लाडघरचे तामस्तीर्थ रात्र बत्तिसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक रात्र तेहतिसावी गरिबांचे मनोरथ रात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी रात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही! रात्र सदतिसावी अब्रूचे धिंडवडे रात्र अडतिसावी आईचा शेवटचा आजार रात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध रात्र पाचवी मथुरी