Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १

१२ फेब्रुवारी २०१७ - जोहान्सबर्ग येथे संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक पार पडते जिथे भारताचे पंतप्रधान एक महत्त्वपूर्ण कायदा बहुमताने मंजूर करून घेतात. या कायद्यानुसार एखाद्या देशावर दहशतवादी हल्ला झाल्यास त्या देशाला हल्ला करणाऱ्या देशावर प्रतिहल्ला करण्याचा आणि नुकसान भरपाई वसूल करून घेण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला. आधी अनेक देशांनी या कायद्याला विरोध दर्शविला होता मात्र सर्व देशांकडून संयुक्त चौकशी झाल्यानंतरच हल्ला झालेला देश कारवाई करू शकतो या निर्णयानुसार कायदा संमत होतो.

"मेरे प्यारे देशवासीयों…" म्हणत पंतप्रधानांचे भाषण व्हायरल होतं. संपूर्ण भारत देशात आनंद साजरा केला जातो, अनेक ठिकाणी फटाके फोडून, बॅनर्स लावून, मोटारसायकल रॅली काढून आनंद व्यक्त केला जातो. ट्विटर आणि फेसबुकवर भारताच्या पंतप्रधानांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. पुढील आठवडाभर अनेक वृत्तवाहिन्यांवर हा विषय घेऊन चर्चा होते.

तत्पूर्वी कश्मीर येथे भारतीय लष्कराच्या अनेक ताफ्यांवर दहशतवादी हल्ले झाले होते, त्याच हल्ल्यात एका नर्सरीमधील ४० निष्पाप लहान मुलांचा बळी गेला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्व भारतीयांच्या भावना तीव्र झालेल्या असतात. अगदी जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत होता. दहशतवादी हल्ला कोणी केला हे सर्वांना ठाऊक असताना देखील तो देश हल्ल्याची जबाबदारी घेत नव्हता, उलट सैनिकांच्या तळाजवळ नर्सरी उघडण्याची बुद्धी असलेला देश अशी भारताची विटंबना तो देश करतो. या एकूणच प्रकारातून जोहान्सबर्ग येथे दहशतविरोधात कायदा संमत होणार हे पूर्णतः स्पष्ट झाले होते. आता भारत पुढे काय पाऊल उचलतो याकडे सर्व जगाचे लक्ष लागून होते.

भारताच्या पंतप्रधानांना दूरदृष्टी असल्याने ते हल्ला केलेल्या देशावर कोणतीही कारवाई करत नाहीत, उलट ते त्या देशाला सर्व दहशतवादी भारताकडे सुपूर्द करण्याची विनंती करतात. तो देश नेहमीप्रमाणे भारत देश खोटं बोलत आहे असं म्हणतो आणि दहशतवादी सोपवण्यास नकार देतो. तरीही भारत देश मवाळ भूमिका घेतो.

काही दिवसांनंतर दुसरा देश कश्मीरवर पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची चूक करून बसतो. भारताचे पंतप्रधान याच गोष्टीची वाट पाहत होते, बुद्धिबळाप्रमाणे त्यांनी आधी समोरच्याला चाल करण्याची संधी देऊन आता ठरवल्याप्रमाणे ते आपली चाल करू लागतात. ते त्या देशावर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करतात. यावेळी भारतीय सैनिकांचा मोठा ताफा शत्रूदेशात आसरा घेत असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करतो, ज्यात जिहाद-ए-मुकम्मल संघटनेचा प्रमुख ओमार अफझल मारला जातो. पुराव्यासाठी भारतीय सैनिक ओमारचा मृतदेह भारतामध्ये घेऊन येतात. ओसामा बिन लादेनवर झालेल्या अमेरिकी सर्जिकल स्ट्राईकनंतर ही सगळ्यात मोठी सर्जिकल स्ट्राईक ठरते.

भारताच्या या धडक मोहिमेनंतर चीन गप्प बसणे पसंत करतो. अमेरिकेसह अनेक देशांना भारताच्या या यशाचे आश्चर्य आणि कौतुक वाटते. भारतीय सैन्याची ताकद आता संपूर्ण जगाला दिसून आली होती.

फेसबुक आणि ट्विटरवर पून्हा एकदा भारतीय सैनिक आणि पंतप्रधानांवर शुभेच्छांचा पाऊस पडतो, पुन्हा एकदा वृत्तवाहिन्यांवर आठवडाभर विशेष चर्चासत्र आयोजित होतात, पुन्हा एकदा फटाके फुटतात, बॅनर्स लावले जातात, मोटारसायकल रॅली निघतात, पुन्हा एकदा संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण होतं.

संपूर्ण भारतीय मनुष्यबळाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या इस्त्रोने वर्षाच्या सुरुवातीसच शनी ग्रहाच्या कक्षेत उपग्रह सोडण्याची घोषणा केली होती, भारतीय खेळाडूंनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता, मोबाईल कंपन्यांनी इंटरनेटचे दर स्वस्त केले होते, परदेशी कंपन्या भारताकडे बाजारपेठेच्या नजरेने बघून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होत्या, त्यातच गेल्या वर्षी ऑलंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते आणि आता जोहान्सबर्ग येथे दहशतवादीविरोधी कायदा संमत करून ओमारसारख्या दहशतवाद्याचा फडशा पाडला होता. एका प्रकारे सर्व स्तरांवर यश मिळत असल्याने भारतात ‘अच्छे दिन’ साजरे होत होते.

‘अच्छे दिन’ असे किती दिवस चालू राहणार? चांगल्या गोष्टींना नजर ही लागतेच. अगदी तसंच होत होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना कुठेतरी या सर्व घडामोडींचा आणि ओमार अफझलच्या मृत्यूचा सूड घेण्याची तयारी सुरु होती. लष्कर-ए-मूहाफ़ीज आणि खाँफ या अतिरेकी संघटना संयुक्तपणे भारतावर हल्ला करण्याची योजना आखतात ज्यात भारताच्या आर्थिक राजधानीवर, म्हणजेच मुंबईवर एकाच वेळी १०० अतिरेक्यांसह हल्ला करून भारत देशाच्या आनंदाला विरजण लावायचं असं ठरतं.

भारताची आर्थिक राजधानी असल्याने आणि भारतीयांसह परदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्याने लष्कर-ए-मूहाफ़ीज आणि खाँफ या दोन्ही अतिरेकी संस्था मुंबई शहराला पुन्हा एकदा लक्ष्य करतात. त्यासाठी १०० मातब्बर अतिरेक्यांची निवड केली जाते. यासाठी त्यांना अत्याधुनिक शस्त्रांसह मिक्स मार्शल आर्टसचं प्रशिक्षण देण्यात येतं. हल्ला असा करायचा कि पुढील १०० वर्षे तरी भारतीय नागरिक हे विसरू शकणार नाही आणि त्या हल्ल्याच्या आठवणीने प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला पाहिजे.

दुसरीकडे ओमार अफझलच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी अतिरेकी कोणत्याही थराला जातील याची भारताचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांना पूर्ण खात्री असते. संरक्षणमंत्री, इस्रोचे महासंचालक, रॉ प्रमुख, गृहमंत्री आणि मुख्य पोलीस आयुक्त यांच्यासह ते तातडीची बैठक बोलावतात. सीमेवर कडक सुरक्षा ठेवून सर्व वाहतूक यंत्रणांवर लक्ष ठेवायचे, देशाच्या आत असलेल्या स्लिपर्स सेल्सचा शोध घ्यायचा, सोशल मिडीयावर शेयर होत असलेल्या गोष्टी फिल्टर करायच्या, सॅटेलाईटद्वारा अतिसूक्ष्म गोष्टींवर लक्ष ठेवायचे, पोलीसांना देखील अत्याधुनिक शस्त्रे उपलब्ध करून द्यायची, परदेशातील भारतीयांचा विश्वास संपादित करून त्यांना दक्षता घ्यायला सांगायची अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होते.

गोष्टी लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली जाते, सर्व राजकीय पक्षांना एकत्र काम करण्यासाठी सूचित केले जाते, टोलनाके, वाहतूक मार्गांवर बारीक लक्ष ठेवले जाते.

२६ जुन २०१७: इस्लामाबाद - "हिंदुस्थान कि तबाही के लिये हमारे बन्दे पुरी तरह तैयार है, अब बस आपके हुकूम का इंतेजार है।" शोएब नावाचा अतिरेकी खाँफ संघटनेच्या प्रमुखाला म्हणतो.

"तुम्हारे हौसले बुलंद है। हिंदुस्थान कि तबाही अब ज्यादा दूर नहीं। हमें बस उसके अंदर घुसना है। फिर हम अच्छेसे सोच सकते है। हिंदोस्तान के अंदर जाने के लिए क्या तुम्हारे पास कोई रास्ता है?" खाँफ संघटनेचा प्रमुख खालिद विचारतो.

"एक रास्ता है। हिंदोस्ता को सबक सिखाने के लिए पहले हम सभी इराक जायेंगे, वहा से नकली इराकी पासपोर्ट और वहा के कॉलेज का नकली प्रोजेक्ट लेकर श्रीलंका जायेंगे। वहा जाते वक्त हो सके तो इराकी अध्यापक को लेकर जायेंगे उससे उन्हे यकीन होगा के हमारे बन्दे इराकी छात्र है।" शोएब म्हणतो.

"श्रीलंका जाकर हम हिंदोस्ता कि तबाही कैसे करेंगे?" खालिद म्हणतो.

"हिंदोस्ता ने अपनी सुरक्षा और कडी कि है, तो हमें सोच समझकर कदम उठाने चाहिये। हमारे बन्दे श्रीलंका के कॉलेजमें एक प्रोजेक्ट कि मांग करेंगे, वो प्रोजेक्ट होगा, हिंदोस्ता का अध्ययन। तो हमें श्रीलंका के कॉलेज से हिंदोस्ता जाने का पुरा इंतजाम किया जायेगा। हिंदोस्ता के लिये हम इराकी छात्र होंगे, जिन्हे श्रीलंका के कॉलेज से हिंदोस्ता का अध्ययन करना है। हमारे बन्दे हिंदोस्ता के अलग अलग जगहों में जाकर एक प्लॅन बनाएंगे, जीसमें १५ अगस्त के दिन हिंदोस्ता के अलग अलग जगहों पर वार करेंगे।" शोएब म्हणतो.

"लेकीन हमें तो सिर्फ मुंबईपर हमला करना है।" खालिद म्हणतो.

"अलग अलग जगहो पर हमला करेंगे तो उन्हे हमारी ताकद अच्छे से दिखा सकते है।" शोएब म्हणतो.

"हमें तुम्हारा प्लान पसंद आया। क्या तुम पुरे प्लान को हकीकत में लाने कि जिम्मेदारी लोगे?" खालिद म्हणतो.

"जरूर, जन्नत में जगह मिलने के लिये इससे अच्छा मौका मुझे मिल नहीं सकता।" शोएब म्हणतो.

"हमें फक्र है तुम्हारे इरादों पर… लेकीन एक याद रखना, अपना मास्टर प्लान तयार रखना। मुझे नही लगता के उस मनहूस दिन हिंदोस्ता तुम्हें इस तरह अलग अलग जगहो पर जाने देगी। अपने प्लान का साथ उस मुल्क के मुंबई, दिल्ली, बेंगलोर जैसे हर एक बडे शहर को तबाह करने का प्लान तयार रखो।" खालिद शोएबच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो.

क्रूर हास्य करत शोएब होकारार्थी मान हलवतो.

शोएब हा एका दहशतवाद्याचा मुलगा असतो, जे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारले गेले होते. वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तो पेटून उठला होता. त्याला शक्य असतं तर त्याने भारताला आपल्या पायाखाली चिरडल असत, भारतावर अणुबॉम्ब हल्ला घडवून आणला असता. वडिलांचा मृत्यूच नाही, तर त्याच्या मनात आधीपासून भारताविषयी राग आणि द्वेष होता. लहान वयातच त्याच्या मनात भारताविषयी वाईट गोष्टी भरवल्या होत्या.

स्वातंत्र्य मिळताच भारताने आपल्याला वेगळं केलं होतं, आपल्या वाईट काळात त्यांनी आपल्यावर हल्ला केला होता, भारतामधील हिंदू आपल्या धर्माच्या लोकांना त्रास देतात, आपल्याला कमीपणा दाखवण्यासाठी त्यांनी त्यांच्या ध्वजामध्ये आपला रंग खाली ठेवला आहे, अशा अनेक कारणांमुळे त्याला तिरंगादेखील नकोसा होता.

शोएबच्या मनात या चुकीच्या गोष्टी त्याच्या दहशतवादी वडिलांनी भरवल्या होत्या. त्यामुळे त्याच्या मनातील द्वेष खालिद पूर्णपणे ओळखून होता, आणि म्हणूनच त्याने आपल्या पुढील मोहिमेची धुरा शोएबकडे सोपवली होती.

अनेक स्तरांवर भारताने लक्षवेधी कामगिरी केलेली असल्याने भारतासाठी हा स्वातंत्रदिन महत्वाचा असतो. स्वतंत्र राष्ट्र म्हणण्यापेक्षा एक बलाढ्य राष्ट्र म्हणून भारत देश उदयाला येत होता. सर्व भारतीयांच्या डोक्यात घुसलेली हवा आपण रक्तपात करून घालवू असा विचार करत शोएब आपल्या योजनेला वेग देतो.