Get it on Google Play
Download on the App Store

अक्षौहिणी

भारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य दोन्ही पक्ष मिळून लढले. बहुतेक सर्व राजांनी एकेक अक्षौहिणी सैन्य आणले होते. कृष्णाने आपले तीन कोटि गोपालांचे सैन्य दुर्योधनाला दिले होते. मात्र कौरवांच्या अकरा अक्षोहिणी सैन्याच्या मोजदादीत हे कृष्णाचे सैन्य अजिबात मोजलेले दिसत नाही.

एक अक्षौहिणी म्हणजे काय याचा पूर्ण खुलासा दिलेला आहे. १ रथ, १ हत्ती, ३ घोडे व ५ पायदळ सैनिक मिळून १ पत्ति होते. ३ पत्ति म्हणजे एक सेनामुख व त्यानंतर ३-३ च्या पटीत गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनीकिनि व अक्षौहिणि असे कोष्टक दिलेले आहे. एकूण एका अक्षौहिणीत २१८७० रथ, तितकेच हत्ती, ६५६१० घोडे व १,०९,३५० पायदळ समाविष्ट होत. नवल म्हणजे, आजहि ३ सैनिक म्हणजे एक ग्रूप, ३/४ ग्रूपचा एक सेक्शन, मग त्याच पटीत प्लॅटून, कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिविजन, कोअर अशीच व्यवस्था असते! मधल्या काळात, युरोपियन, मुघल, मराठे वा इतरांच्या सैन्याचीहि अशीच व्यवस्था असे काय?
अक्षौहिणीतील रथ व हत्ती यांची तुलना टॅंक, आर्टिलरी (तोफखाना) यांच्याशी होईल. घोडदळाची जागा आता चिलखती वाहनानी घेतली आहे. काही पायदळाच्या डिव्हिजन्स, आर्टिलरी डिविजन्स, आर्मर्ड डिव्हिजन्स एकत्र करून बनणार्‍या आर्मीची अक्षौहिणीशी तुलना करता येईल. अशा कित्येक आर्मी ग्रूप दुसर्‍या महायुद्धात दोन्ही पक्षांतर्फे लढले. एकेका राजाचे एक अक्षौहिणी सैन्य चतुरंग व स्वयंपूर्ण होते.
अठरा अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकूण २५ लाख माणसे एवढ्याशा कुरुक्षेत्रावर कशीं लढलीं असतील? दुसर्‍या महायुद्धात काही शहरांसाठी झालेल्या युद्धात, उदाहरणार्थ स्टालिनग्राड, मॉस्को वगैरे, दोन्ही पक्षांकडून सात आठ लाख सैन्य लढले पण तीं युद्धक्षेत्रे खूप विस्तृत होतीं. भारतीय इतिहासातील मोठ्या लढायांत, उदा. तालिकोट, पानिपत वगैरेत ४-५ लाखांवर मजल गेली नव्हती. तेव्हां महाभारतांतील आकडेवारी खूप अतिशयोक्त म्हटली पाहिजे.