Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ४

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।
 महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥

तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।
 तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥

तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।
 जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥

अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।
 माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥

मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।
 तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥

बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।
 प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥

वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।
 पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥

अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस ।
 विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥

त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।
 महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥

बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।
 तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥

सकाळपून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।
 त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥

ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।
 चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥

विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।
 कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥

पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।
 कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥

मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।
 अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं * आपुल्या ॥१५॥

त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।
 दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥

आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।
 ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥

पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।
 विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥

जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।
 अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥

पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।
 नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥

महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।
 त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥

साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।
 उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥

आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।
 ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥

विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।
 चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥

तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।
 ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥

सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।
 त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥

गांजा तमाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।
 वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥

जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।
 मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥

बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।
 नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥

तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।
 आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥

साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।
 परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥

जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।
 नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥

पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।
 हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥

ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।
 नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥

ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।
 बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥

बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।
 विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥

काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।
 म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥

महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।
 नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥

बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।
 चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥

तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।
 प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥

काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।
 हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥

काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।
 कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥

याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।
 आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥

या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।
 जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥

असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।
 तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥

त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।
 बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥

लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।
 सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥

चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।
 मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥

मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।
 गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥

गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।
 गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥

त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।
 कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥

गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।
 गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥

हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।
 माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥

मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।
 जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥

आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।
 सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥

कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।
 पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥

ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।
 बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥

अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।
 पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥

माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।
 हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥

आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।
 पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥

त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ ।
 तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥

तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले ।
 म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥

सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका ।
 नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥

जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं ।
 चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥

आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती ।
 मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥

क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन ।
 साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥

समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित ।
 घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥

आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
 मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥

तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत ।
 ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥

माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें * करुन ।
 समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥

जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली ।
 तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥

महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर ।
 तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥

तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी ।
 पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥

अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें ।
 हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥

ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य ।
 कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥

चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा ।
 निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥

श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त ।
 अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥

कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती ।
 कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥

कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार ।
 कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥

तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला ।
 दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥

चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? ।
 इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥

तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें ।
 पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥

जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको ।
 गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥

त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती ।
 जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥

चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला ।
 दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥

तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना ।
 आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥

अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले ।
 ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥

मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें ।
 ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥

तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार ।
 नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥

चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी ।
 जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥

समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें ।
 आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥

ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून ।
 करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥

कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां ।
 उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥

दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले ।
 त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥

त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला ।
 ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥

ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली ।
 कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥

आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन ।
 कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥

बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला ।
 बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥

कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन ।
 धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥

चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला ।
 लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥

लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ ।
 भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥

चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी ।
 राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥

शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी ।
 तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥

वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार ।
 तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥

प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? ।
 ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥

माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले ।
 म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥

जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त ।
 म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥

म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला ।
 आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥

आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून ।
 माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥

ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं ।
 गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥

आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून ।
 वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥

ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला ।
 तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥

हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण ।
 प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥

तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी ।
 अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥

जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार ।
 घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥

ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी ।
 ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥

अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन ।
 त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥

तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना ।
 दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥

तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें ।
 यत्‍न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥

शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी ।
 भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥

तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला ।
 समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥

रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।
 निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥

आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं ।
 कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥

रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर ।
 आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥

तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला ।
 धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥

बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी ।
 ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥

आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण ।
 तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥

त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली ।
 तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥

माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां ।
 यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥

नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत ।
 हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥

यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें ।
 आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥

माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी ।
 परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥

कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें ।
 संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन ।
 महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥

श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन ।
 जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥

किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची ।
 ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥

माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया ।
 ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥

तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें ।
 आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥

ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा ।
 झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥

इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण ।
 कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥

म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी ।
 उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥

असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण ।
 चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥

असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली ।
 ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥

वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा ।
 वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥

पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा ।
 एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥

ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।
 ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥

सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच ।
 ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥

महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी ।
 ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥

मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां ।
 झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥

सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें ।
 आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥

दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला ।
 जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥

थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडली आनंदली ।
 दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥

संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ ।
 कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥

बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी ।
 अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥

हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
 साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥