All Marathi Stories

अतिशहाणा

सोमनाथला वाटे, की आपला मुलगा सुनन्द हा मोठा बुद्धिमान मुलगा आहे. त्याने सुनन्दला शिक्षण द्यावे म्हणून शहरात नेले आणि निर्मलानन्द नावाच्या गुरूंकडे ठेवले. काही दिवसांनी सोमनाथला काही कामा निमित्त शहरात जायचे होते. तो निर्मलानन्दकडे ही गेला. त्याला पाहताच निर्मलानन्द म्हणाला- "तुझा मुलगा अतिशहाणा आहे; त्यामुळे त्याला शिकवणं फार कठीण काम आहे." पण सोमनाथला ते काही पटेना. तो म्हणाला- "माझा मुलगा तर चांगला चलाख अन् खूपच बुद्धिमान आहे. मला असं वाटतं की आपणच त्याच्याकडे नीटसं लक्ष देत नसावेत." हे उत्तर ऐकून निर्मलानन्दला फारच वाईट वाटले. त्याने सुनन्दला जवळ बोलावले व म्हटले- "हे बघ सुनन्द ! जुन्या काळी आपल्या देशात इतके अद्भुत कलावान विणकर असत की त्यांनी विणलेली एक एक साडी काडेपेटीत सहज मावू शके ! तुझ्या लक्षात आलं ना मी काय सांगतोय ते ?" सुनन्दने होकारात्मक मान हलवली. "ठीक आहे, सांग बरं काय समजलं तुला ?" गुरूंनी सुनन्दला विचारले. "असंच की, त्या काळात कोडेपेठ्या इतक्या मोठाल्या असत की त्यात एकेक साडीही सामावू शके ! बरोबर ना ?" सुनन्द झटकन उत्तरला. आता सोमनाथला शहाणपणा अन् अतिशहाणपणा यातला फरक कळून चुकला ! 'आपण फटकन् काहीतरी बोललो', म्हणून त्याने निर्मलानन्दची क्षमा मागितली, आणि 'काहीही करून सुनन्दला नीट मार्गावर आणेल' असे त्याच्याकडून वचन घेऊन सोमनाथ घरी परतला.