प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 49

जी. डी. एच. कोल या अर्थशास्त्रज्ञ विद्वानाने म्हटले आहे, ''खादीच्या धंद्याचे संवर्धन करावे अशी जी चळवळ गांधींनी चालविली आहे ती म्हणजे भूतकालाचे पुनरुज्जीवन करावे अशा रम्य मानसचित्रात गुंगून त्यात रंग भरण्याकरता उतावीळ झालेल्या वेड्या पिराचे खूळ नाही, खेड्यातील लोकांचे दारिद्र्य कमी करावे, खेड्यांचा दर्जा वाढवावा म्हणून त्या हिशेबाने केलेला तो एक प्रत्यक्षातला व्यवहारी प्रयत्न आहे.''  तो प्रयत्न तर तसा होताच पण आणखी कितीतरी अर्थ त्या प्रयत्नात भरलेला होता.  या प्रयत्नामुळे देशातल्या सार्‍या लोकांना शेतकर्‍यांचा विचार तो गरीब झाला तरी एक आपल्यासारखा माणूसच आहे ह्या दृष्टीने करणे भाग पडले; चमचम चकमकणार्‍या चार-दोन शहरांपलीकडे जागच्या बाजूला हा खेड्यातील शेतकर्‍यांच्या दारिद्र्याचा, दैन्याचा खड्डा आवासून उभा आहे हे उमजू लागले; देशाची स्थिती सुधारली, देशाला स्वातंत्र्य आले, याची खरी खूण म्हणजे चारदोन नवकोट नारायण झाले.  काही वकिलांचे किंवा चार पांढरेपेशांचे चांगले चालले, चारदोन कनिष्ठ वरिष्ठ कायदेमंडळे निघाली ही नसून, ह्या शेतकर्‍याला समाजात किती मान मिळतो, त्याचासंसार किती सुधारला हीच खरी खूण आहे हे महतत्वाचे तत्त्व या प्रयत्नामुळे समजले.  आंग्लविद्याविभूषित ही एक नवीन जात, हा वेगळाच वर्ग, ब्रिटिशांनी आमच्या समाजात काढला होता, तो बाकीच्या जनतेपासून अलग पडून आपल्या एका वेगळ्या जगात वावरत होता, व त्याने ब्रिटिशांविरुध्द काहीही निषेधाची मोहीम चालविली असली तरीसुध्दा, तेव्हासुध्दा त्याला त्याच ब्रिटिशांच्या तोंडाकडे पाहून चालावे लागे.  सामान्य जनता व सुशिक्षित वर्ग यांच्यात आडवा पडलेला हा खंदक गांधींनी थोडाफार भरून काढला व ह्या सुशिक्षितांना तोंडे फिरवून आपल्या देशबांधवांकडे पाहणे भाग पडले.

यंत्रांचा उपयोग करण्याबाबत गांधींच्या मतात हळूहळू पालट होत असलेला दिसत होता.  ''यंत्रे वापरायला हरकत नाही, पण कोणी यंत्राचाच हव्यास धरला तर त्याला माझा विरोध आहे'', असे ते म्हणतात.  ''खेडोपाड्यांतून घरोघरी जर आपल्याला वीज खेळवता आली तर खेडुतांनी आपल्या धंद्याची उपकरणे विजेवर चालवायला माझी हरकत नाही.''  निदान आजच्या परिस्थितीत तरी प्रचंड यंत्रसामग्रीवर धंदा म्हटला की त्याच्या मागोमाग सत्ता व संपत्ती काही विविक्षित लोकांच्या हातात गोळा व्हावयाचीच असे गांधींचे मत होते.  ''काही थोड्या लोकांच्या हातांत सत्ता व संपत्ती साठावी या उद्देशाने यंत्रांचा उपयोग करणे मला पाप वाटते, अन्याय वाटतो.  हल्लीच्या काळात यंत्राचा उपयोग असाच होतो आहे.''  प्रचंड यंत्राच्या साहाय्याने चालणारे मोठमोठे नाना प्रकारचे कारखाने, अनेक धंद्यांना लागणारी सामग्री तयार करणार्‍या मोक्याच्या उद्योगधंद्यांचे कारखाने व सार्वजनिक उपयुक्ततेची कामे सांभाळणारे कारखाने, यांची आवश्यकता आहे असेसुध्दा त्यांना अलीकडे पटू लागले होते, पण त्यांची अट अशी होती की, हे सारे कारखाने सरकारी मालकीचे असले पाहिजेत व त्यांच्या मते महत्त्वाचे असे काही जे हस्तव्यवसायाचे छोटे धंदे होते, त्या धंद्यांवर या मोठ्या धंद्यांचे आक्रमण होऊ नये.  त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमाबद्दल ते म्हणत, ''आर्थिक समतेच्या भरभक्कम पायावर जर हे बांधकाम उभारले नाही तर ते म्हणजे एक वाळूवर बांधलेले घर ठरेल.''

याप्रमाणे, खेडेगावातून हस्तव्यवसायाचा उद्योग व लहान प्रमाणावरचे धंदे करावे असा पुरस्कार मनापासून करणारेसुध्दा, मोठ्या प्रमाणावर यांत्रिक उत्पादन चालविणे अशक्य आहे,  अपरिहार्य आहे हे ओळखून चालले आहेत, त्यांची इच्छा एवढीच की तसल्या यांत्रिक उत्पादनाचे क्षेत्र होता होईतो मर्यादित ठेवावे.  या मतांचा गोळाबेरीज अर्थ हा की, उत्पादन व अर्थव्यवस्थेच्या ह्या दोन प्रकारांपैकी भर कोणत्या प्रकारावर द्यावा, त्यांचा एकमेकांशी जम कसा बसवावा एवढाच काय तो वादाचा प्रश्न राहतो.  आजच्या जगाची जी परिस्थिती आहे तिच्या संदर्भाने अर्थ लावू म्हटले तर, राष्ट्रांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते हे तत्त्व मान्य करूनही एखाद्या राष्ट्राला त्यातल्या त्यातच राजकीय वा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र राहावयाचे असेल तर त्या देशाने यांत्रिक उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर चालविले पाहिजे, शक्ती निर्माण करण्याच्या आपल्याजवळच्या सर्व साधनांचा अधिकात अधिक उपयोग करून घेतला पाहिजे, हे कोणीही मान्य करील.  तसेच राहणीचे मान जर खूप वरच्या दर्जाचे करावयाचे असेल व ते तसे टिकवून ठेवावयाचे असेल व जनतेचे दारिद्र्य नाहीसे करावयाचे असेल तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या राष्ट्राला आधुनिक यंत्रविज्ञानाचा उपयोग केल्याखेरीज गत्यंतर नाही.  यंत्राच्या साहाय्याने संपत्ती व सुबत्ता मिळविण्याच्या कामात एखादा देश मागे पडला तर त्यामुळे जगातील राष्ट्रांच्या शक्तीत जो एक समतोलपणा संभाळला गेला पाहिजे तो वारंवार बिघडत राहील, अधिक शक्तिमान राष्ट्रांच्या आक्रमक वृत्तींना उत्तेजन मिळेल.  अशा मागासलेल्या राष्ट्राला आपले राजकीय स्वातंत्र्य सांभाळता आले तरी ते नावापुरतेच राहणार, त्या राष्ट्रावरची आर्थिक सत्ता हळूहळू दुसर्‍या राष्ट्राकडे जाऊ लागणार.  ह्या मागासलेल्या राष्ट्राला ठरलेला आपला स्वत:चा जीवनादर्श सांभाळण्याकरता आपला अर्थव्यवहार लहान प्रमाणावर ठेवण्याची खटपट करावी लागेल, परंतु आर्थिक सत्ता परकीयांच्या हाती गेल्यामुळे ती खटपट फुकट जाईल.  सारांश हा की ग्रामोद्योग व लहान छोटे धंदे यांच्यावरच मुख्यत: देशाची अर्थव्यवस्था बसवू पाहिले तर त्या प्रयत्नात अपयश नक्की येणार.  अशा प्रयत्नांनी देशातल्या अडचणी दूर होणार नाहीत, देशाचे स्वातंत्र्य टिकणार नाही व जगातल्या राष्ट्रांच्या पंक्तीत देशाला जागा न मिळता फारतर एखादा आश्रित म्हणून त्याची कोठेतरी कोपर्‍यात सोय लागेल.