स्वर्ग आणि नरक

लेखक - संदिप पाटणे

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता. त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला. “ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.” देव म्हणाला. त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं. त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला. एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती. टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं. त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.  पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती. त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.  त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.  कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता त्यांच्या यातनांना अंत नव्हता. भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.” ते दुस-या दारातून आत आले. ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती. तेच टेबल तेच खिरीचं भांडं. भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे. पण ही सगळी माणसे तृप्त समाधानी व आनंदी दिसत होती. आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये” संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला “या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत. हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

गोष्ट संपली.

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे. यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते.  खोली, खीर, टेबल आणि चमचा. सगळ्यांना समान संधी मिळते. सर्वांना मदत करा. मग बघा आपल्या जीवनातील अंतर रंग कसे खुलतात ते.