आशा-निराशा 15

रंगूबाईंनी दोघींना कुंकू लावले.

“यांचे अजून लग्न नाही वाटते झाले? मंगळसूत्र नाही.”

“मंगळसूत्र तुटले आहे.”

“अगं, आधी ओवा ते. अशा आधी हिंडायला काय निघाल्यात? तुम्ही नवीन मुली ! मंगळसूत्र तुटले तर ते ओवून पुन्हा गळयात घालीपर्यंत आम्ही जेवत नाही. जा आधी घरी. ओवा मंगळसूत्र.”

दोघी मैत्रिणी गेल्या. घरी आल्या. सरला नलीच्या खोलीत बसली होती. इतक्यात नली उदयचा फोटो घेऊन आली.

“हा बघा फोटो.”

“उदय ! माझा उदय !” असे म्हणून सरलेने तो फोटो हृदयाशी धरला. नली निघून गेली. सरला तो फोटो हृदयापाशी धरून पडून राहिली.

“सरले, चल जेवायला.”

“पोट भरले. खरे भोजन दिलेस. सुधारसाचे, अमृताचे.”

“असे नको करूस. दोन घास खा. मग आपण दोघी झोपू.”

दोघी मैत्रिणी जेवल्या.

“सरले, सुपारी हवी?”

“काही नको.”

“उदयला विडा खाता येत नसे. त्याचा विडा रंगत नसे. म्हणायचा, पुढे शिकेन.”

“आणि खरेच शिकला. मी विडा दिला की असा रंगायचा !”

“विडा रंगे की तो रंगे?”

“आम्ही दोघे रंगत असू.”

“आता पडायचे का जरा?”

“नलू, हा फोटो मला देशील? माझ्याजवळचे फोटो, सारी पत्रे मी चंद्रभागेत सोडून आल्ये. देशील का?”

“तुझ्या हृदयात रंगीत फोटो आहे.”

“परंतु भूक नाही शमत. बाहेरही काही दिसायला हवे असते. देशील का?”

“देईन. तुझ्याजवळ तो शोभेल.”

“मी आज रात्री जाऊ ना?”

“उद्या उजाडत गाडी आहे. तिने जा. पांढरकवडयास त्याच्या मामाकडे जा. पोलिसांजवळ चौकशी कर. टांगा करून सरळ पोलिसचौकीकडे जा. तेथे विचार. पत्र पाठव. तुझा उदय तुला भेटो. सुखी व्हा. त्याच्या आईचे आशीर्वाद का फुकट जातील?”