वडिलांचे कर्तव्य

संत तिरुवल्लुवर जेथे जात तेथे लोकांच्या गर्दीने घेरले जात असत. अनेक जण  त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांचे प्रवचन ऐकत असत. त्यांच्याकडे सल्ला मागत असत.

एकदा एका शहरात त्यांचे प्रवचन चालू होते. त्यावेळेस त्या  शहरातील एक श्रीमंत शेठ हात जोडून उभा राहिला, आणि म्हणाला, "महाराज, मी आयुष्यभर अमाप संपत्ती जमा केली आहे, माझा एकुलता एक मुलगा माझ्या पैशावर आनंदाने जगेल, असा विचार मी केला होता  पण तसे झाले नाही. त्याच्या व्यसनामध्ये पैसे पाण्यासारखे वाया गेले. मला सांगा, मी काय करू? "

शेठचे म्हणणे ऐकल्यावर संताने विचारले, "बरं, मला हे सांग, तू तुझ्या मुलाला सुसंस्कृत व्हायला शिकवलं आहेस का?"

शेठ म्हणाला, "नाही महाराज,  मी हा विचार कधीच केला नाही. मी फक्त माझ्या आयुष्याचे ध्येय पैसे कमविणे एवढेच विचारात ठेवले."

मग संताने शेठला समजावून सांगितले," वडिलांचे पहिले कर्तव्य म्हणजे आपल्या मुलांना शिक्षण देणे, त्यांच्यावर संस्कार करणे आणि त्यांना चांगल्या मूल्यांशी जोडणे. जर शिक्षण आणि संस्कार एकत्र केले तर तो देखील पैसे कमवेल. अजूनही वेळ गेली नाही. जर तुम्ही आजही लक्ष दिले तर मुलाचे भविष्य तुमच्यासाठी अनुकूल असू शकते, कारण वेळेवर उचललेले योग्य पाऊल आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाते. बाकी देवावर सोपवले पाहिजे.