कोल्हा आणि कोंबडा

एका शेतकर्‍याने कोल्ह्याला पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता. एके दिवशी त्यात एक लठ्ठ कोल्हा सापडला. त्याला अडकलेले एका कोंबड्याने पाहिले व तो हळूहळू त्या सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे बघत राहिला.

त्याला पाहून कोल्ह्याला एक युक्ती सुचली आणि तो ढोंगीपणाने म्हणाला-

'मित्रा, पहा बरं, मी कसा संकटात सापडलो आहे ते ! आणि हे सगळं तुझ्याचमुळे झालं. मी पहाटे तुझा आवाज ऐकला आणि म्हणून तुझी काय हालहवाल ते विचारण्यासाठी मी इथे आलो आणि या सापळ्यात अडकलो. तर तू मला एक काठी आणून दे म्हणजे मी माझी सुटका करून घेईन.'

हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि त्याने शेतकर्‍याला कोल्हा पिंजर्‍यात अडकला आहे असे सांगितले. तेव्हा शेतकरी मोठा सोटा घेऊन आला आणि त्याने त्या कोल्ह्याला खरपूस मार दिला. त्या माराने कोल्हा मरण पावला.