Get it on Google Play
Download on the App Store

माध्यमांतर – धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड

निमिष सोनार

एपिक चॅनलवरील महाभारतावर अभिनव प्रयोग केलेल्या "धर्मक्षेत्र" च्या पहिल्या एपिसोडबद्दल मी ह्या महिन्यात लिहित आहे ज्यात द्रौपदीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.

"एपिक ऑन" हे मोबाईल ऍप खास सबस्त्राईब करून मी काही एपिसोड अभ्यासून ते खास "आरंभ" च्या वाचकांसाठी "अध्यात्म" या सदरात (माध्यम रूपांतर करून) देत आहे. अर्थात हे माध्यम रूपांतर वाचकांना नीट समजण्यासाठी थोडे स्वैर आहे याची नोंद घ्यावी.

ज्यांनी "धर्मक्षेत्र"चे हे एपिसोड पाहिले असतील किंवा नसतीलही आणि ज्यांनी महाभारत वाचले किंवा पाहिले असेल किंवा नसेल; अशा सगळ्या वाचकांना काहीतरी वेगळे पण माहितीपूर्ण वाचल्याचे नक्की समाधान या अभिनव सदरातून मिळेल, हे मात्र नक्की!

(कुरुक्षेत्रावरचे युद्ध संपून आता चित्रगुप्तच्या दरबारात पाप पुण्याचा हिशेब करण्याची वेळ आली आहे. महाभारतातील सगळे पात्र आता मृत्यू पावले आहेत, असे येथे गृहीत धरले गेले आहे.)

चित्रगुप्त येतात. त्यांना सगळे अभिवादन करून बसतात मात्र कर्ण पांडवांजवळ बसायला नाही म्हणतो आणि त्याचा परम मित्र दुर्योधनाजवळ बसायची परवानगी मागतो आणि त्याचे जवळ जाऊन बसतो. सध्या दरबारात फक्त द्रौपदी आणि कृष्ण यांची अनुपस्थिती असते.

मग त्या धर्मेक्षेत्राच्या कोर्टात गांधारी आणि कुंती येतात. गांधारी व्देषभावना मनात ठेऊन,

 कोर्टात (दरबारात) द्रौपदीला आणण्याची चित्रगुप्त याला विनंती करते.

एका झाडाखाली द्रौपदी उभी असते, तिला कृष्ण "धर्मक्षेत्र"च्या दरबारात चलण्याची विनंती करतो.

दोघे तेथे येतात.

पहिला आरोप तिच्यावर लागतो की पांडवांशी विवाह करणे हे द्रौपदीचे षडयंत्र होते, तिच्या वडिलांचा बदला पूर्ण करण्यासाठी!

मग स्वयंवरात काय घडले याविषयी चर्चा सुरू होते.

गांधारी द्रौपदीवर आरोप करते की स्वयंवरात तिची नजर सर्वप्रथम कुणावर गेली? पांडवांवर तर नक्की नाही.

द्रौपदी खरे सांगते की कर्ण.

चित्रगुप्त: "मग कर्णाच्या गळयात माळ का नाही घातली?"

द्रौपदी: "कारण तो सूतपुत्र होता!"

गांधारी: "चूक आहे. तू कौरव पांडवांचे शतृत्व आणखी वाढावे यासाठी असे केलेस आणि तुझा जन्मच मुळात तुझ्या वडिलांचा एक बदला घेण्याच्या दृष्टीने झाला. (द्रुपद आणि द्रोण यांची दुष्मनी सर्वश्रृत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे) तिची इच्छा होती की भाऊ (दृष्टद्युम्न) सोबत वडिलांना मदत करावी. तिला युद्ध घडवायचे होते. म्हणून तिने कर्णाला मुद्दाम नाकारले!"

कृष्ण आक्षेप घेतो आणि सांगतो की मीच तिला "अर्जुन हा, तुझी नियती आहे" हे सांगितले होते आणि त्याला स्वयंवरात वरायला सांगितले.

कर्ण प्रश्न विचारायला उभा राहतो तर भीम कर्णावर धावून जातो आणि दोघे एकमेकांना मारण्यास उठतात. चित्रगुप्त त्यांना चूप करतो. भीमाच्या मते कर्णाला द्रौपदीला काही प्रश्न विचारायचा अधिकार नाही.

कर्ण: "द्रौपदी तू माझ्याशी लग्न केले असते तर युद्ध झालेच नसते. तू सांगितले असते की तुला गुरु द्रोण यांचा बदला घ्यायचा आहे तर मी सगळे हारून तुला मदत केली असती. विचार दुर्योधनाला! मी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. आपण त्याची मदत घेतली असती."

द्रौपदी: "बरोबर आहे. जो माणूस आपल्या मित्राची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला बांधील आहे त्याला माझ्यासाठी वेळ काढायला जमले असते का? त्याचे ऐकून तू माझेशी कसाही व्यवहार केला असता. तू खरे तर माझ्याशी लग्न करायला लायक नाहीस. नव्हता!"

मग कुंती येते आरोप करायला.

चित्रगुप्त: "कुंती जी, कौरव पांडव यांच्यात नेहमी भांडणे होत होती तर तुम्हाला कधी वाटले होते का की भविष्यात यांच्यात युद्ध होईल?"

कुंती गप्प.

चित्रगुप्त: "वेगळ्या पद्धतीने विचारतो. तुला तुझ्या सुनेची वागणूक योग्य वाटली का? कौरव पांडव यांच्यातील शत्रुत्व वाढेल असा प्रयत्न तिने केला असे तुम्हाला नाही वाटत? मयसभेत दुर्योधन पाण्यात पडला तेव्हा द्रौपदी त्याला हसून म्हणाली की तुला तुझ्या वडिलांसारखे दिसणे बंद झाले का? आंधळा झालास का? (त्याला तेव्हा सुयोधन असे संबोधले जायचे) आणि पुढचा आरोप म्हणजे मोठ्या व्यक्तींचा तिने अपमान केला आहे. कुंती जी तुम्ही उत्तर द्या!"

कुंती: "हो. ही पांडवांच्या जीवनात आली आणि सगळे पांडव बदलले. खुनशी झाले. शत्रुत्व आणखी वाढले!"

कृष्ण: "चूक आहे तुमचे. कौरवांनी पांडवांना अनेक वेळा जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला, त्रास दिला तेव्हा तुम्ही चूप राहिलात आणि तुम्ही चूप म्हणून पाचही पांडव चूप राहिले. पण द्रौपदी बोलली म्हणून तिला चूक मानले गेले. ती पांडवांना एवढेच म्हणाली की कौरवांनी तुमच्या सोबत एवढे सगळे करून तुम्ही चूप का राहिलात? अन्याय सहन का केला? लहानपणीच भीमाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला तेव्हा त्याला योग्य वेळेस धडा का नाही शिकवला? शिकवला असता तर लक्षागृहात पुन्हा तुम्हा पाचही भावांना मारण्याची हिम्मत त्यांची झाली असती का? कुंती आत्या, लक्षात घ्या! तुमची मुले लहानपणापासून शुर होते आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे काम फक्त द्रौपदीने केले आणि आज तुम्ही तिचा अपमान केलात?"

मग द्रौपदीचा भूतकाळातील प्रत्येक पांडवांसोबत संवाद दाखवला जातो.

चित्रगुप्त: "सुयोधनाचा द्रौपदीवर पुढचा आरोप आहे की तिने द्युतक्रिडेत झालेल्या अपमानाचे कारण पुढे करून युद्धाला आमंत्रण दिले!"

मग चित्रगुप्तच्या दरबारात वाद विवाद होतात की द्रौपदीला द्युतक्रिडेत दुःशासन ओढत आणतो तेव्हा द्रौपदी कुलवधू असते की दासी? आणि तिला द्युतात पणाला लावण्याबाबत जबाबदार कोण? आणि द्रौपदीचा त्या युक्तिवादात विजय होतो.

ती म्हणते की जर युधिष्ठिर स्वत:ला द्यूतात हारून चुकला होता तेव्हा त्याला द्रौपदीवर अधिकार नव्हता आणि म्हणून तिला पणाला लावायचा त्याला अधिकार नव्हताच.

म्हणून तिला द्युतक्रिडेत ओढत आणले तेव्हा ती दासी नव्हती तर कुलवधू होती आणि दुर्योधनाचा युक्तीवाद ती खोडून काढते की ती त्यावेळेस दासी होती आणि सभेत दासीचा नाही तर कुलवधूचा अपमान झाला हे ती सिद्ध करते.

मग गांधारी आणि कुंती यांचा द्रौपदीवरून वाद होतो कारण गांधारीला द्रौपदीचा द्युतक्रिडेतला अपमान साधारण अपमान वाटतो मग कृष्ण दोघींना खडसावतो आणि "दुर्योधन द्युतक्रिडेत द्रौपदीला मांडीवर बसण्यास सांगतो" या द्रौपदीच्या अपमानाची आठवण करून देतो. नंतर गांधारीला खडसावतो की तुझी मुले तुझे काहीही ऐकत नसत. मग गांधारीचा कृष्ण थोडासा अपमान करतो तेव्हा दुर्योधन चिडतो मग कृष्ण सांगतो की तुझ्या आईचा थोडासा अपमान सहन करत नाहीस आणि द्रौपदीचा (जी तुझ्या मोठ्या भावाची पत्नी आहे म्हणजे आईसमान आहे) इतका मोठा अपमान तू भर सभेत केलास आणि जर का तो अपमान मनात धरून त्याला युद्धाचे कारण द्रौपदीने बनवले तर त्यात गैर काय?

मग गांधारी कबूल करते की ती पुत्रप्रेमात आंधळी झाली होती आणि तिची मुले तिचे ऐकत नसत.

मग चित्रगुप्त द्रौपदीचा फैसला सुनावतात:

"महत्त्वाकांक्षी असणे चांगले फक्त ती अतिरेकी नको. तुम्ही (म्हणजे द्रौपदी) येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उदाहरण बनून राहाल.

अशा प्रकारे द्रौपदी एपिसोड संपतो.