Get it on Google Play
Download on the App Store

पाकिस्तानी मराठ्यांची कामगिरी

१९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे. सध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.

१९६० च्या दशकात सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या ‘टायगर्स ऑफ बलुचिस्तान’ या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे.मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत.

याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.

बुगटी मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतरही त्यांनी शिक्षण आणि नोकरीत चांगलं बस्तान बसवलं. मूळचा बुगटी समाज भटका असल्याने बुगटी मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यात बस्तान बसवणं सोपं गेलं. १९५० नंतर बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर याठिकामी सुई पेट्रोलियम नावाची कंपनी सुरु झाली. या कंपनीत मराठा समाजाने कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू आपल्या हुशारीच्या बळावर या समाजाने या कंपनीत मॅनेजर, सुपरवायझर अशी मोक्याची पदं मिळवली. मूळच्या बलुची जमाती मात्र मागेच राहिल्या.