Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १२

डी.सी.पी. देशमुख त्यांच्यासोबत १०  कॉन्स्टेबल घेऊन आता स्टेशन मास्तराच्या कार्यालयात पोहोचले. बाकीचे कॉन्स्टेबल बाहेरुन त्यांना कव्हर करणार होते. दहशतवाद्यांकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. शोएब प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभा राहून डोंबिवली स्थानक उडवण्याची योजना बनवत होता. पावलोपावली यश मिळत असल्याने तो अतिउत्साहात होता. हीच संधी साधून देशमुख नियंत्रण कक्षाकडे जाऊ लागतात. अचानक त्यांना काहीतरी वेगळं जाणवतं. त्यांच्यासोबत एक सामान्य नागरिक आला होता.

"एक मिनिट, तू कोण?" डी.सी.पी. देशमुख विचारतात.

"सर आपण अभिजीत डोंबिवलीकर, इथे वेस्ट साईडला इस्टेट एजंट म्हणून काम करतो आपण." अभिजीत म्हणतो.

"इथे काय फ्लॅट विकायला आला आहेस?" देशमुख सर दबक्या आवाजातच रागाच्या सुरात खेकसतात.

"नाही हो, आपण इथे तुमची मदत करायला आलो आहे." अभिजीत म्हणतो.

एका सामान्य नागरिकाने दहशतवाद्याला मारण्यासाठी स्वतःला मृत्युच्या दारात ओढवून घ्यावं? देशमुख सरांना त्याचं कौतुक वाटतं.

"अरे वेड्या, घरी लपून बसला असता तरी आम्हाला मदत झाली असती. इथे तुझ्या जीवाला धोका आहे." देशमुख सर म्हणतात.

"तुम्ही इथे आमच्यासाठी जीव द्यायला तयार आहात, मग आमची सुद्धा काही जबाबदारी बनते ना. सगळं तुमच्यावर सोडून असं किती दिवस लपून बसायचं?" अभिजीत म्हणतो.

"हे कोणी सामान्य गुंडे नाहीत, दहशतवादी आहेत." देशमुख सर म्हणतात.

"मग आपण पण ऐरा गैरा नाही, एक सामान्य नागरिक आहे, आणि सामान्य नागरिक काय करतो हे त्यांना दाखवून द्यायचं आहे." अभिजीत म्हणतो.

"तुझ्या धाडसाचं सध्या मी फक्त कौतुक करू शकतो, पण तुझ्यासह इतर सामान्य नागरिकांना वाचवणं ही आमची जबाबदारी आहे. आता तू एका सुरक्षित ठिकाणी लपून बसावं असं मला वाटतं." देशमुख सर म्हणतात.

"सर, फक्त एक संधी द्या. मी मिलिटरी स्कुलमध्ये शिकलो आहे. वशिलेबाजी नाही केली म्हणून मिलिटरीमध्ये मला नोकरी नाही मिळाली. मला बंदूक आणि रायफल चालवता येते. मी नक्कीच एक-दोघे तरी नक्की मारू शकतो. आणि समजा मला काही झालचं तर मी प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांपैकी एक होतो असं सांगा." अभिजीत म्हणतो. देशमुख सरांसाठी प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. जे काही निर्यय असतील, त्यांना ते ताबडतोब घ्यायचे होते.

"ठीक आहे. पण सावध रहा." देशमुख सर म्हणतात.

अभिजीत, देशमुख सर आणि १० कॉन्स्टेबल नियंत्रण कक्षात पोहोचतात. तिथे आधीच ६ दहशतवादी बेसावधपणे उभे होते. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन देशमुखांनी आपल्या रिव्हॉल्वरला आधीच सायलेन्सर लावला होता. म्हणजे ते जेव्हा फायरिंग करतील तेव्हा आवाज येणार नाही. झालंही तसंच. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अचूक नेम धरून सहाच्या सहा दहशतवाद्यांना बघताक्षणी यमसदनी पाठवले.

नियंत्रण कक्षामध्ये बंदिस्त असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना आपण सुटलो असल्याचा दिलासा मिळतो.

"बाहेर अजून बरेच दहशतवादी आहेत, पण काळजी करू नका. तुम्ही सगळे इथे सुरक्षित आहात." देशमुख सर रेल्वे अधिकाऱ्यांना म्हणतात.

"सर, आता आपण काय करायचं?" एक कॉन्स्टेबल विचारतो.

"आपण मुख्य कार्यालयात संपर्क करून स्टेटस विचारू आणि मग पुढील योजना आखता येईल." असं म्हणून ते रेल्वे अधिकाऱ्यांकडे वळतात, "मला हेड ऑफिससोबत कनेक्ट करून द्या." रेल्वे अधिकारी देशमुख सरांना एकाच वेळी मुख्य रेल्वे कार्यालय आणि पोलीस मुख्यालयाशी कनेक्ट करतात.

"हॅलो, डोंबिवली स्टेशन मधून डी.सी.पी. शिवाजी देशमुख बोलत आहे. आम्ही रेल्वे स्टेशनच्या नियंत्रण कक्षात पोहोचलो आहोत. माझ्यासोबत १० कॉन्स्टेबल आहेत. माझे इतर साथीदार स्टेशनबाहेर घेराव घालून आहेत. आपली काही योजना असल्यास मला कळवावे अथवा मला पुढील कारवाई करण्याची अनुमती द्यावी. आपल्या माहितीसाठी, आम्ही ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे." देशमुख सर म्हणतात.

"डी.सी.पी., तुम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत आहात. आपल्याशी बोलून आम्हाला दिलासा मिळाला आहे. बीएसएफ जवान आणि आर्मी ऑन द वे आहे. ट्रॅफिकमुळे त्यांना यायला अजून तासभर तरी वेळ लागेल. त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. तोवर आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे." पोलीस मुख्यालयातून उत्तर येतं.

"हो सर, इथल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी आमचा एक कॉन्स्टेबल आपल्या संपर्कात राहील. आम्ही आमची कारवाई सुरू करत आहोत." असं म्हणून देशमुख सर फोन ठेवतात.

देशमुख सरांची योजना असते, एकाच वेळी सर्व बाजूंनी दहशतवाद्यांवर हल्ला करायची. पण जेव्हा त्यांनी ६ दहशतवादी मारले तेव्हा त्यांना दहशतवाद्यांनी बाळगलेल्या शस्त्रांचा अंदाज आला. आपल्या बंदुका आणि रायफल्स त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांचा सामना करण्यास कमी पडतील याची त्यांना कल्पना आली. एकवेळ योजना बदलावी असं त्यांना वाटतं, पण दहशतवादी मारायचा असेल तर अचूक नेम अपेक्षित आहे, मग ती बंदूक असो वा एके-४७. ते आपल्या योजनेनुसार मार्गी लागतात. त्यांनी बाळगलेल्या व्हॉकी-टॉकीद्वारे ते बाहेरून कव्हर करत असलेल्या सर्व कॉन्स्टेबल्सना योजनेनुसार तयार राहण्यासाठी सूचना करतात.

शोएब आपल्या साथीदारांना स्टेशन उडवण्यासाठी आरडीएक्स कुठे लावावं हे सांगत असतो. तेवढ्यात रेल्वे स्थानकावर घोषणा होते, "सभी आतंकवादीयोंको चेतावनी दी जाती है के अपने हथियार छोडकर सरेंडर करें। पुलिस और आर्मीने आपको चारो ओर से घेर लिया है।" देशमुख सर घोषणा करत होते.

घोषणा ऐकून शौचालयामध्ये असलेल्या अशोक, मल्हार सर, प्राजक्ता आणि वृषाली यांच्यात उत्साह येतो. पोलीसांनी आता फायरिंग केली तर आपण सुद्दा त्यांना साथ द्यायची, असा विचार ते करतात. पण त्यांच्यासमोर एक अडचण असते, ती म्हणजे त्यांना ती अत्याधुनिक शस्त्रे वापरता येत नव्हती.

"माझ्याकडे एक कल्पना आहे, ही शस्त्रे कशी चालवायची हे आपण यू-ट्यूबवर बघू शकतो, माझ्याकडे अनलिमिटेड डेटा प्लान आहे." असं म्हणून अशोक आपला फोन बाहेर काढतो आणि शस्त्रे कशी चालवायची हे बघू लागतो.

शोएबच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. प्लॅटफॉर्मवरील घोषणा पोलीसांनी नियंत्रण कक्षातून केली होती हे त्याला कळून चुकलं होतं. आपल्या सर्व साथीदारांना तो सतर्क राहण्यास सांगतो. कोणतीही व्यक्ती दिसल्यास सरळ गोळ्या झाडा असं तो आपल्या साथीदारांना सांगतो. दुसरीकडे पोलीस ठरवून होते, जोपर्यंत दहशतवादी हल्ला करणार नाहीत, तोपर्यंत प्रतिहल्ला करायचा नाही.

देशमुख सर नियंत्रण कक्षातून तिकीट काउंटरच्या दिशेने जाणार तोच त्यांना गोळी झाडण्याचा आवाज येतो. दहशतवादी इतक्या लवकर गोळ्या झाडतील असं त्यांना वाटलंच नव्हतं. पण ते दहशतवादी नव्हते, यू-ट्यूबवर सांगितल्याप्रमाणे अशोकने बंदूक लोड केली आणि उत्साहाच्या भरात त्याच्याकडून चुकून गोळी झाडली गेली.

पोलीसांनी हल्ला केला असं समजून शोएब आता चांगलाच भडकला, आता जे व्हायचं ते होऊ दे असं म्हणत त्याने आपल्या साथीदारांना चौफेर गोळ्या झाडायला सांगितल्या. पोलीसांकडून देखील प्रतिहल्ला सुरु झाला. लष्कराला यायला अजून बराच वेळ होता, आता जे काही होणार होतं त्याला देशमुख सर जबाबदार राहणार होते.