Get it on Google Play
Download on the App Store

चर्मकाराचे भूत आणि गोपालकृष्ण

अश्याच आणखीन कथा पाहिजे असतील तर कृपया पोस्ट शेर करा. त्यामुळे आमच्या वाचकांचा हुरूप वाढतो.

हि कथा आमच्या पंडितजींनी सांगितली होती. पवईच्या तलावाच्या बाजूला एक भाजी मंडई आहे. सुमारे ३० वर्षेपुर्वी इथे एक चर्मकार आपले दुकटा थाटून बसला होता. रास्ता रुंदायीचे कारण सांगून महानगरपालिकेने त्याला हाकलून लावले. त्या जागेचे कागदोपत्री मालक होते एक गुजराती व्यापारी श्री मगनलाल. श्री मगनलाल सध्या वृद्ध होऊन एका नर्सिंग होम मध्ये आपले शेवटचे दिवस कंठत होते. त्यांनी खूप वर्षे आधी चर्मकाराला इथे बसायची परवानगी दिली होती. दुकान हाकलून लावण्यासाठी एक पोलीस ऑफिसर आला होता. पोलीस ऑफिसर बिहारी होता. कोणी तरी शर्मा. शर्मा साहबांनी स्वतःहून चर्मकाराचे सामान उचलून ट्रक मध्ये टाकले होते. चर्मकार अक्षरशः पाय पडला पण ड्युटी पुढे शर्मा साहेबानी काही बघितले नाही.

नगरपालिकेने जमीन बळकावयाची प्रक्रिया सुरु केली होती. श्री मगनलाल ह्यांना काय पैसे वगैरे दिले ठाऊक नाही पण बिचारा चर्मकार त्यांच्या नर्सिंग होम मध्ये भेटण्यासाठी अनेकदा जाऊन आला पण त्याची परिस्तिथी पाहून कुणीही त्याला आंत जाऊ दिले नाही. चर्मकार स्वतः सुमारे ६० वर्षांचा होता. त्याच्या दुकानापासून काही अंतरावर एक गोपाळकृष्णचे साधे मंदिर कि घुमटी काय ते होते. तिथे काही हौशी मंडळींनी ७ दिवस भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. एक शामियाना वगैरे बांधून ठेवला होता.

पहिले तीन दिवस शामियान्यातून कधी पैश्यांची तर कधी विजेचे सामान अश्या गोष्टींची चोरी होऊ लागली. शर्मा साहेब पोलीस ऑफिसर तर होतेच पण गोपाळकृष्णचे फार मोठे भक्त होते. चोरीची केस त्यांनी फार मनावर घेतली. चौथ्या दिवशी त्यांनी फार चांगली पळत ठेवली. सध्या वंशांतील हवालदार दारुडे बनून बाजूला पडून राहिले, एक माणूस आंत झोपला इत्यादी. शर्मा साहेब स्वतः बाहेर एका टॅक्सी मध्ये झोपून पळत ठेवून राहिले. चोराला अक्षरशः मारे पर्यंत बदडून काढण्याचा त्यांचा इरादा होता.

रात्रीचे २ वाजले असतील कि शर्मा साहेबानी एक माणूस आंत जाताना पहिला. त्यांनी शपथेवर सांगितले असते कि तो माणूस चर्मकारच होता. माणूस शामियानांत आंत जाऊन काळोखांत अदृश्य होतंच त्यांनी शिट्टी वाजवली आणि सर्व गुप्त पोलीस विजेरी घऊन शामियान्यात घुसले. कुणीही त्या माणसाला पहिले नव्हते आणि आंत कुणीही नव्हते. फक्त एक फटाक्यांचे बॉक्स ठेवले होते ते गायब झाले होते.

शर्मा साहेबांचे डोके फिरले. सकाळ होतंच त्यांनी सरळ बाजार गाठला. चर्मकार दुकानातून हाकलला गेला असला तरी आजूबाजूला कुठे घुटमळत असेल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी चौकशी केली. काही अंतरावर एक पिंपळाचे पेड आहे तिथे एका वेड्या माणसाबरोबर तो बसतो असे कुणी सांगितले. शर्मा साहेब तिथे गेले. त्यांना चर्मकार भेटला. आधी दोन थोबाडीत लावीन असा त्यांचा इरादा होता पण ६० वर्षांचा तो म्हातारा, ते कृश शरिर आणि केविलवाणी मुद्रा पाहून त्यांनी मारहाण करण्याचा इरादा बदलला.

"देवाच्या घरी चोरी करायला लाज नाही वाटत आजोबा ? " शर्मा साहेबानी त्यांना विचारले.

"आम्ही सगळी त्याच देवाची मुलं बाबा, त्याच्या घरच काही खाल्लं तर चोरी थोडीच होते" चर्मकाराने हाथ जोडून उत्तर दिले. उत्तर बरोबर वाटले तरी त्याची मुजोरी पाहून शर्मा साहेबाना जास्त राग आला.

"कुणी तरी कष्ट करून देवाला देणगी देतो. तेथील सामानावर सगळ्यांचा अधिकार असला तरी एकटा माणूस ते कसे घेऊन जाऊ शकतो ? " शर्माने प्रश्न विचारला.

"कृष्णाने म्हणूनच लोणी चोरले होते साहेब. लोणी गौमातेचे होते. सर्वांचे होते. मुलांना ना देता ते विकले जायचे म्हणून कृष्णाने ते चोरले. मी कुणाचे काहीही चोरले नाही. मी ४ दिवस झाले काही खाल्ले सुद्धा नाही. आपण घरी येऊन तर पहा? " चर्मकाराने पुन्हा हाथ जोडून विनवणी केली.

त्याच्याकडून अश्या प्रकारची शाब्दिक प्रतिक्रिया शर्मा साहेबाना अपेक्षित नव्हती. शर्मा साहेब ब्राम्हण होते. ह्या चर्मकारांत काही तरी खास आहे हे त्यांनी ओळखले. हा नुसता चोर नसून चांगला ठग आहे आणि आपल्याला कात्रीत पकडायला पाहतोय हे ताडून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. ह्याला रंगेहाथ पकडायला पाहिजे हे त्यांना कळून चुकले होते. पाचव्या रात्री त्यांनी जास्त मोठा सापळा रचला. एक हॅलोजन चा मोठा दिवा आंत बंद ठेवला होता. चोर आंत गेल्यास शिट्टी वाजवायची आणि ताबडतोप तो चालू करायचा असे ठरवेल होते. बाजूच्या दोन इमारतीत आणखीन काही तरुणांना नजर ठेवून राहायला सांगितले होते. शर्मा साहेब स्वतः आंत शामियान्यात एका मोठ्या भांड्याच्या मागे लपून बसले होते. शामियान्यात मुद्दाम एक पेटी आणि तबला ठेवला होता. पुन्हा २ वाजले आणि शर्मासाहेबानी पुन्हा एक आकृती आंत पहिली शिट्टी वाजवून ते पळत पुढे गेले, दिवा मात्र लागला नाही. काळोखांत त्यांचा हात चोराला लागला पण चोर निसटून गेलाच. दिवा लागला नाही म्हणून साहेब हवालदारावर प्रचंड खवळले, तो बिचारा शपथ घेऊन सांगत होता कि त्याने बटन चालू केले होते. दिवाच खराब झाला असेल. ९ फूट उंचीवर लावलेला तो दिवाच खरे तर चोरीला गेला होता.

पण ह्या वेळी एक पुरावा हाती लागला. चर्मकाराच्या डोळ्यांवरचा चष्मा. जुनाट काली फ्रेम झरे पडलेल्या काचा आणि तुटलेली फ्रेम ३ ठिकाणी सुताने बांधून ठेवली होती.

आता तर हवालदाराच्या सुद्धा विश्वास बसला कि चर्मकारच चोर होते. सकाळी जाऊन त्याला अटक करायची आणि पोलिसी हिसका दाखवूंन सर्व माल हासील करायचा म्हणून ते गेले. चर्मकार झाडाखालीच बसला होता. चष्मा नव्हता.

"काय आजोबा ? चष्मा कुठे पडला ? " शर्मा साहेबानी कुत्सित पणे विचारले. "ठाऊक नाही साहेब, एकदा चष्मा पडला तर काहीबी दिसत नाही त्यामुळे कुठे पडला हे कसे बरे सांगू ? "

"नाही तरी जेल मध्ये गरज नाही चष्म्याची. चला आपणहून जीप मध्ये बसा." असे म्हणून शर्मा साहेबानी हवालदाराला इशारा केला. हवालदाराने चर्मकाराची गचांडी धरून त्याला जीप मध्ये टाकले. तो आपले अंग चोरून बसला. ठाण्यात त्याला जेल मध्ये टाकून साहेबानी संध्याकाळ पर्यंतचा वेळ दिला. सामान चोरल्याचे कबुल कर आणि माल कुठे ठेवलाय ते सांग. आपण शंभर रुपये हातावर टेकवून तुला सोडून देऊ. तू म्हातारा आहेस. लोकांनी पकडले असते तर बडवून जीव काढला असता. शर्मा साहेबानी आपल्या यज्ञोपवितावर हात ठेवून त्याला सांगितले. चष्म्याशिवाय ना दिसणारा, खरोखर कृश असणारा माणूस आपल्याला झटका देऊन ९ फूट उंचीवर असणारा बल्ब घेऊन कसा पळू शकतो ? त्यांना ह्यांत काही तरी विचित्र वाटत होते. खरे तर शर्मा साहेबांच्या हृदयांत त्या चर्मकाराच्या बद्धल एक करुणा निर्माण झाली होती. हा माणूस काही दिवस आधी कष्ट करून जगत होता त्याला रस्त्यावर मीच आणले. चोरीची परिस्तिथी मीच आणली. आणि आता वर्दीच्या जोरावर मीच त्याला धमकावतो आहे. काही वेळ त्यांनी विचार केला आणि थोडी शरम त्यांनाच स्वतःला आली.

"आहे... आहे... आपल्या मध्ये सुद्धा काळीज आहे .. चर्मकाराच्या चेहेऱ्यावर स्मित होते. काही काळ तो फक्त हसत होता. घरी आहे.. बोलावले होते तेंव्हा का नाही आलास ? जाऊन घे. सर्व सामान घरी आहे." चर्मकाराने सांगितले.

पिंपळाच्या पेडाच्या खाली घुटमळणार्या चर्मकाराचे कुठेतरी घर असेल आणि तिथे त्याने सगळे सामान ठेवले असे हे आपल्या पोलिसी मेंदूला आधीच समजायला पाहिजे होते हे त्यांना वाटले. "हवालदार जीप काढ" त्यांनी हुकूम सोडला आणि खुर्ची वरून ते ताडकरून उठले. "थांब .." चर्मकाराने म्हटले आणि आपला थरथरता हाथ जेलच्या दारांतून बाहेर काढला. म्हातारा आपल्याला काही देत आहे असे शर्मा साहेबाना वाटले. त्याने ते पकडण्यासाठी हाथ पुढे केलाच.

"आपला काळजांत काय आहे ह्याचा विसर पडू नको देवूस, आहे .. कृपा आहे पूर्वजांची तुज्यावर, कर्तव्य सुद्धा केले पाहिजे पण ... तुला समजले आहेच मी काय म्हणतोय ते" शर्मा साहेबाना असेच काही तरी शब्द कानावर पडल्याचे आज सुद्धा आठवते.

शर्मा साहेब त्या दिवशी गाडी घेऊन दिलेल्या पत्त्यावर गेले. आज जिथे हिरानंदानी गार्डन आहे तिथे एके काही घनदाट जंगल होते. तिथे एका ठिकाणी चर्मकाराची झोपडी होती. लोक मेलेली जनावरे तिथे आणून टाकायचे. सडलेल्या वासाने इतर कुणीही तिकडे फिरकायचा नाही. त्यादिवशी शर्मा साहेबांचे संपूर्ण आयुष्य बदलले.

त्या वासाने त्याचें डोके ठणकू लागले पण तरी सुद्धा झोपडी शोधून ते विजेरी घेऊन आंत गेले. आंत काहीही सामान नव्हते होती फक्त एक कॉट, एक स्टोव्ह आणि चप्पले. काही अन्न कोपऱ्यांत होते. विजेरीच्या दिव्यांत त्यांना काही हालचाल दिसली. कॉट वर पहिले तर एक मुलगी होती, १३ - १४ वर्षांची असेल पण अधू होती. कितीतरी दिवस त्याच कॉट मध्ये असल्याने तिची अवस्था इथे सांगता येणार नाही अशी खराब होती.

शर्मा साहेबाना स्वतःची अशी संतती नव्हती. त्या मुलीला पाहतांच त्यांना रडू फुटले. त्यांनी स्वतः त्या मुलीला त्या परिस्तिथीत आपल्या जीप मध्ये टाकून घरी आणले. तिला नाव्हू घालून सलाईन वगैरे लावला. शर्मा साहेबाना एका विचित्र प्रकारे त्या मुलीशी काही तरी संबंध वाटला. शर्मा साहेबांच्या पत्नीने तिची खूप शुश्रूषा केली.

पण नवल पुढे घडले. त्या रात्री शर्मा साहेबाना फोन आला कि चर्मकार जेल मधून कसा तरी पळून गेला. हवालदार मंडळींनी प्रचंड शोध घेऊन सुद्धा तो सापडला नाही. पुढच्या दिवशी शर्मा साहेब पुनश्च त्या झोपडीत गेले. सामानाची पुन्हा एकदा तपासणी करायला. त्यांना सडलेल्या जनावरांना जिथे टाकतात तिचे चर्मकाराचा देह सापडला. पोस्टमार्टम च्या रिपोर्ट प्रमाणे मृत्यू किमान ७ दिवस आधी झाला होता.

शर्मा साहेबाना आज सुद्धा वाटते कि एक तर साक्षांत गोपाळकृष्णाने चर्मकाराचे रूप घेऊन त्यांना लीला दाखवली होती तर शर्मा साहेबांचे धाकटे बंधू म्हणजे आमचे पंडितजी ह्यांना वाटते कि चर्मकार स्वतः एक अध्यात्मिक प्रगती केलेले व्यक्ती होते आणि त्यांनी स्वतः भूत बनून आपल्या नाती साठी एक पालक शोधला होता. ती अधू मुलगी लिहिता वाचता शकत होती आणि शर्मा साहेबांच्या प्रयत्नामुळे तिने कॉलेज सुद्धा पास केले. तिच्या आठवणी प्रमाणे तिला फक्त आजोबाच आठवतात आणि लोकांच्या वाईट नजरा पासून वाचवण्यासाठी तिला त्यांनी एका दूरवरच्या झोपडीत ठेवले होते. आजोबा तिला दर रात्री अनेक कथा सांगत असत आणि तिला आठवतेय कि ज्या दिवशी शर्मा साहिबानी येऊन तिला घरी नेले त्याच्या आधल्या दिवशी सुद्धा आजोबा येऊन रडले होते कि आज सुद्धा खायला करायला त्यांच्या कडे काहीही नाही पण उद्यापासून तिला पुन्हा कधीही उपाशी राहावे लागणार नाही.

सत्य काहीही असो माणसाने आपल्या हृदयातील कारुण्याची ज्योत नेहमीच प्रज्वलित ठेवली पाहिजे.

।। जय श्री कृष्ण ।।