Get it on Google Play
Download on the App Store

गीताई अध्याय चवथा

श्री भगवान् म्हणाले

योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो । मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥

अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला । पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥

तो चि हा बोलिलो आज तुज योग पुरातन । जीवीचे गूज हे थोर तू हि भक्त सखा तसा ॥ ३ ॥

अर्जुन म्हणाला

ह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन । तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ॥ ४ ॥

श्री भगवान् म्हणाले

माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे । जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी ॥ ५ ॥

असूनि हि अजन्मा मी निर्विकार जगत्-प्रभु । माझी प्रकृति वेढूनि मायेने जन्मतो जणू ॥ ६ ॥

गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना । अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे ॥ ७ ॥

राखावया जगी संता दुष्टा दूर करावया । स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ॥ ८ ॥

जन्म-कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे । देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज ॥ ९ ॥

नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय । झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले ॥ १० ॥

भजती मज जे जैसे भजे तैसा चि त्यास मी । माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ॥ ११ ॥

जे कर्म-सिद्धि वांछूनि यजिती येथ दैवते । मनुष्य-लोकी कर्माचे पावती फळ शीघ्र ते ॥ १२ ॥

निर्मिले वर्ण मी चारी गुण-कर्मे विभागुनी । करूनि सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी ॥ १३ ॥

कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज । माझे स्वरूप हे जाणे तो कर्मात हि मोकळा ॥ १४ ॥

केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्त्व जाणुनी । तैसी तू हि करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा ॥ १५ ॥

नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे । तुज ते सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ॥ १६ ॥

सामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे । अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥

कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे । तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो ॥ १८ ॥


उद्योग करितो सारे काम-संकल्प सोडुनी । ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ॥ १९ ॥


नित्य-तृप्त निराधार न राखे फल-वासना । गेला गढूनि कर्मात तरी काही करी चि ना ॥ २० ॥


संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह । शरीरे चि करी कर्म दोष त्यास न लागतो ॥ २१ ॥


मिळे ते चि करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर । फळो जळो जया एक करूनि हि न बांधिला ॥ २२ ॥


ज्ञनात बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा । यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि ते ॥ २३ ॥


ब्रम्हात होमिले ब्रम्ह ब्रम्हाने ब्रम्ह लक्षुनी । ब्रम्ही मिसळले कर्म तेंव्हा ब्रम्ह चि पावला ॥ २४ ॥


देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्टिती । ब्रम्हाग्नित तसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिती ॥ २५ ॥


श्रोत्रादी इंद्रिये कोणी संयमाग्नीत अर्पिती । कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती ॥ २६ ॥


प्राणेंद्रिय-क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती । चिंतनाने समाधीस अंतरी चेतवूनिया ॥ २७ ॥


द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी । संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी ॥ २८ ॥


होमिती एकमेकात कोणी प्राण-अपान ते । रोधूनि गति दोहोंची प्राणायामास साधिती ॥ २९ ॥


प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी ।

यज्ञ-वेत्ते चि हे सारॆ यज्ञाने दोष जाळिती ॥ ३० ॥


यज्ञ-शेषमृते धाले पावले ब्रम्ह शाश्वत । न यज्ञाविण हा लोक कोठूनि पर-लोक तो ॥ ३१ ॥


विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे । कर्माने घडिले जाण जाणूनि सुटशील तू ॥ ३२ ॥


द्रव्य-यज्ञादिकांहूनि ज्ञान-यज्ञ चि थोर तो ।

पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता ॥ ३३ ॥


सेवा करूनि ते जाण नम्र-भावे पुसूनिया । ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ॥ ३४ ॥


ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू । आत्म्यात आणि माझ्यात भूते निःशेष देखुनी ॥ ३५ ॥


जरी पाप्यांमधे पापी असशील शिरो-मणि । तरी ह्या ज्ञान-नौकेने पाप ते तरशील तू ॥ ३६ ॥


संपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो । तसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ॥ ३७ ॥


ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी । योग-युक्त यथा-काळी ते पावे अंतरी स्वये ॥ ३८ ॥


श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध । ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ॥ ३९ ॥


नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा । न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ॥ ४० ॥


योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले । जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती ॥ ४१ ॥


म्हणूनि अंतरातील अज्ञान-कृत संशय । तोडुनी ज्ञान-खडगाने ऊठ तू योग साधुनी ॥ ४२ ॥


….. अध्याय चवथा संपूर्ण …..