Get it on Google Play
Download on the App Store

सत्त्वशील राजा 1

फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तोंडातून नकार कधीच बाहेर पडला नाही. एके दिवशी राजा एकटाच गच्चीत बसला होता. आकाशात तारे चमकत होते. बागेतील रातराणीच्या वेलीचा वास येत होता. वारा हळूहळू वाहत होता. राजा विचार करीत होता. तो मनाशी म्हणाला, ‘मी उदार म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु वास्तविक माझे असे मी काय देतो? प्रजेपासून मला पैसा मिळतो. त्या पैशांतूनच मी देणग्या देतो? व उदार म्हणून मिरवतो. माझ्या स्वत:च्या मालकीचे मी काय दिले आहे? राजाच्या मालकीचे काय आहे? हे राजवाडे प्रजेच्या पैशातूनच बांधले. हे जडजवाहीर प्रजेच्या करातूनच विकत घेतले. ह्या माझ्या देहाशिवाय माझे असे काहीच नाही. माझी सारी मालमत्ता म्हणजे हा साडेतीन हातांचा देह. हा देह जर कुणी मागितला व मी दिला, तर मात्र मी खरा उदार ठरेन, खरा सत्वशील ठरेन.’ 

हे विचार करीत राजा झोपला. सकाळ झाली. राजाने स्नान केले. देवपूजा केली. नंतर तो   याचकगृहाकडे निघाला. ज्याला ज्याला काही मागावयाचे असे, तो तो तेथे जाई. आज देवाच्या मनात राजाचे सत्व पाहण्याची इच्छा झाली. भगवान् शंकरांनी एका आंधळ्या अतिथीचे रूप घेतले व त्या अतिथीशाळेजवळ त्या याचकगृहाजवळ ते उभे राहिले.

राजा आला. जो जे जे मागत होता, ते ते राजा देत होता. आंधळ्याची पाळी आली. राजा त्याला म्हणाला, “आंधळ्या! तुला काय पाहिजे ते माग; असा मागे मागे काय राहतोस?” तो आंधळा म्हणाला, “राजा! जे मागावयाचे आहे ते मागावयाला धीर होत नाही.” राजा म्हणाला, “निर्भयपणे माग. येथे. भिण्याचे काही कारण नाही.” तो आंधळा म्हणाला, “मी आंधळा आहे. तुझ्या दोन डोळ्यांतील एक डोळा काढून मला देशील तर माझ्यावर उपकार होतील. देवाचे वैभव मी पाहू शकेन. तारे पाहीन, फुले पाहीन. तुझे मुखकमल पाहीन. समुद्र, सरिता, वृक्ष, पर्वत, सारे पाहीन. राजा, बोलत का नाहीस? नसेल देता येत तर नाही म्हण. तुझी कीर्ती ऐकली म्हणून मी आलो.”