Get it on Google Play
Download on the App Store

मुंबई

मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर असून दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून सागरी मार्गाने होणारी भारताची ५०% मालवाहतूक होते.

मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.

मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत आहे.

आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा-दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली. मुंबईची लोकसंख्या वाढत राहिली (१६६१: १०,०० ते १६८७: ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.

१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढले व ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.

पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कोलकात्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले.भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.

१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर मे १, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन त्याची राजधानी मुंबईच राहिली.

१९७०च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बंबई (हिंदी भाषा) व बॉम्बे(इंग्लिश भाषा) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजींचे नाव देण्यात आले.


मुंबईतील एक कबुतरखाना

दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वल्मजी रत्नशी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅन्ट रोडला, गिरगावात व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.

हवामान

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात(मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मॉन्सूनचा पाऊस मुंबईला जून ते सप्टेंबरपर्यंत झोडपतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ३८° से. ते किमान ११° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७.४°से असे नोंदवले गेले आहे.

अर्थव्यवस्था

मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १०% कारखाना-रोजगार (Factory employment), ४०% प्राप्तिकर, २०% केंद्रीय कर (Central excise), ६०% आयात कर, ४०% परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न भारतीय रूपया९,१९,६०० कोटी इतके होते व प्रती व्यक्ती आय भारतीय रूपया१,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बॅंका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.

१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.

मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.

प्रशासन

महानगर प्रशासन
बृहन्मुंबई महानगरपालिका

मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो.

मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात.
जिल्हा प्रशासन

मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व

मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३४ आमदार करतात.
महानगर पोलिस यंत्रणा

मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलिस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलिस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलिस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे.
 

न्याय यंत्रणा

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय(Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत.

वाहतूक व्यवस्था

मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.
रस्ता

मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र ३, राष्ट्रीय महामार्ग क्र ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरु आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: १) पूर्व द्रुतगती मार्ग (सायन ते ठाणे). २) पूर्व मुक्तमार्ग (फोर्ट ते घाटकोपर) ३) सायन पनवेल द्रुतगती मार्ग (सायन ते पनवेल). ४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते बोरीवली).

मुंबईच्या बेस्ट (Bombay Electric Supply and Transport कंपनीच्या) बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट नवी मुंबई, मीरा-भायंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिबुल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नव्या मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे, दिंडोशी व बोरीवलीपर्यंत चालवते.

मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८% लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते.
रेल्वे

मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट मध्ये आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरीय रेल्वे तीन वेग-वेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर.

२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५०० हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व ९, १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. ’मुंबई मेट्रो’ नावाच्या एक भूमिगत व एलिव्हेटेड [मराठी शब्द सुचवा] जलद वाहतूक पद्धतीचे बांधकाम सध्या चालू आहे. त्यातली मुंबई मोनोरेल ही पूर्ण झाल्यावर जेकब सर्कल ते वडाळ्यापर्यंत धावेल. भारतीय रेल्वे मार्फत मुंबई इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस), मुंबई सेन्ट्रल, वांद्रा टर्मिनस, अंधेरी व बोरीवलीहून सुरू होतात.
वायुमार्ग

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात,

नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळाला केंद्र सरकारची परवानगी मिळाली असून तो २०१४ पर्यंत तयार होईल व सध्याच्या विमानतळाचा भार कमी करण्यात मदत करेल. जुहू विमानतळ हा भारतातील पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.
जलमार्ग

मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारतातील सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५% ते ६०% मालवाहतूक येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे
नागरी सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते.या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती वा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो देवनार, मुलुंड व गोराईतील डंपिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते.

बेस्ट, महावितरण व रिलायन्स एनर्जी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्तीमार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक वाढत चालला आहे व काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल्.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोन, एअरसेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.

लोकजीवन

मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख व नास्तिक आहेत.

मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून हिंदी, इंग्रजी, कोकणी या भाषादेखील बोलल्या जातात.

मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.

विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरीबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.
असामाजिक तत्त्वे

१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बाँबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकी हल्ला होता.

मुंबईकर आणि मुंबईची संस्कृती

मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात.

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.

मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.

मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहे. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.

न्यूयॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरीकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.

प्रसारमाध्यमे

मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृतपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृतपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए, हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृतपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारतातील इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात.

दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार नेटवर्क, झी नेटवर्क व सोनी टीव्ही या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. झी मराठी, ई टीव्ही मराठी व सह्याद्री वाहिनी ह्या मराठी वाहिन्या मराठी प्रेक्षकांना सेवा पुरवतात.

मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत.

शिक्षण

मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर बाकी सीबीएस्‌ई/आयसीएस्‌ई बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारतातील १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा शास्त्र शाखेत) प्रवेश घेतात. १२वी नंतर साधी पदवी किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. आय. आय. टी, मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट(व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI) व एस.एन.डी,टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटत आहे. ही चिंतेची बाब आहे.

उपनगरे

वांद्रे, खार, सान्ताक्रुझ, विलेपार्ले, जुहू, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड