Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय १५

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगत्पालका ॥ मुनिमानसचकोरमृगांका ॥ कृपांबुदातया पूर्णशशांका ॥ ग्रंथादरीं येई कां ॥१॥

मागील अध्यायीं कथन ॥ तुवां वदविलें कृपा करुन ॥ गर्तकूपीं अग्निनंदन ॥ गोपीचंदें घातला ॥२॥

घातला परी कैसा लाग ॥ कीं कोठें नाहीं मूसमाग ॥ जैसा शंकर गेल्यामाग ॥ फसवूनि त्यासी वरियेलें ॥३॥

असो पुढें आतां श्रोती ॥ श्रवण करावी रसाळ उक्ती ॥ सिंहावलोकनीं घेऊनि गती ॥ मागील कथा विलोका ॥४॥

बद्रिकाश्रमीं पूर्ण तपासी ॥ गोरक्ष कानिफा जान्हवीतीरासी ॥ तप आचरितां द्वादशवर्षी ॥ उद्यापन उरकिलें ॥५॥

परी याचें त्यासी नाहीं ठाऊक ॥ कायाभुवनीं उभय अर्क ॥ संगोपीत कामांतक ॥ परी माहीत नाहीं अन्योन्यां ॥६॥

पुढील भविष्योत्तर जाणून ॥ गुप्त ठेविलें ओळखून ॥ यापरी तप झालिया पूर्ण ॥ उभयतांही बोळविलें ॥७॥

कानिफा निघाला उत्तरदेशीं ॥ महातपी तो गोरक्षशेखी ॥ उत्तरपूर्णमध्य कोणासी ॥ संचार करीत चालिला ॥८॥

प्रयाग गया काशी करुन ॥ श्रीगुरुतें शोधी गजकर्णनंदन ॥ यापरी पूर्ण दक्षिण कोण ॥ गोरक्ष शोधी मच्छिंद्रा ॥९॥

शोधीत परी तो कैसा ॥ कीं जलाविण विभक्त मासा ॥ कीं बाळ मातेचे वसवसा ॥ सदोदित हदयांत ॥१०॥

नावडे त्यातें अन्नपाणी ॥ नावडे निद्रा सुखासनीं ॥ सदा भंवते भाविक मनीं ॥ उद्वेगचक्रीं पडियेला ॥११॥

श्रीगुरु आठवूनि चित्तांत ॥ भ्रमण करीतसे पिशाचवत ॥ साडी श्वास आणूनि हेत ॥ नाथ हे नाथ म्हणोनि ॥१२॥

वारंवार हंबरडे फोडीत ॥ म्हणे कधीं भेटती गुरुनाथ ॥ प्राण डोळां उरला किंचित ॥ पाय आतां दाखवीं ॥१३॥

ऐसी प्रेमें होतसे वृष्टी ॥ आपुल्या पुसे वागवटी ॥ म्हणे पहिला असेल मच्छिंद्र जेठी ॥ कोणी तरी सांगा हो ॥१४॥

ऐसें बहुधा बहुतां पुसून ॥ नाना क्षेत्री करी गमन ॥ तो भ्रमत गौडदेशाकारण ॥ हेळापट्टणीं पातला ॥१५॥

तपें मांस भक्षिलें समग्र ॥ अति सूक्ष्म जर्जर शरीर ॥ त्यावरी श्रीगुरुवियोगचिंताशर ॥ हाडीं टोले मारीतसे ॥१६॥

जेथें बैसे तेथें वसे ॥ नीरबिंदू वाहती नेत्रास ॥ कार्याकारण कोण्या क्षेत्रास ॥ भिक्षा मागूं जातसे ॥१७॥

तों हेळापट्टण नगरामाझारी ॥ येऊनि बैसला क्षणभरी ॥ तों द्वारपाळ ग्रामद्वारीं ॥ बैसले होते कांहींसे ॥१८॥

त्यांनी पाहूनि गोरक्षनाथ ॥ आदेश म्हणूनि त्यातें नमीत ॥ परी गोरक्ष तयां द्वारपाळां पुसत ॥ मच्छिंद्रनाथ आहे कीं ॥१९॥

तवं ते म्हणती आमुचे गांवीं ॥ मच्छिंद्र नामें कोणी गोसावी ॥ महाराजा आलाचि नाहीं ॥ काय सांगावी सुखव्यक्ती ॥२०॥

परी नाथा एक तापसी ॥ आला होता या गांवासी ॥ नाम जालिंदर या जगासी ॥ मिरवत होता महाराजा ॥२१॥

काय सांगावी तयाची नीती ॥ लोकांसी वाटे जैसा गभस्ती ॥ तो तृणभारा वाहतां माथीं ॥ अधर आम्ही पाहातसों ॥२२॥

गोरक्ष म्हणे काय कारण ॥ मस्तकीं वाहतसे तृण ॥ येरी म्हणे तो काननांतून ॥ गोधनाकरितां आणीतसे ॥२३॥

गोरक्ष म्हणे गोधन कोणाचें ॥ येरी म्हणती तें गांवीचें ॥ परी निःस्पृहवृत्ति गोधनाचें ॥ पालन करी महाराजा ॥२४॥

गोरक्ष म्हणे किती दिवस ॥ राहिला होता या वस्तीस ॥ राहूनि लोप कवण ठायास ॥ झाला पुढें तो सांगा ॥२५॥

येरी म्हणती योगद्रुमा ॥ एक संवत्सर राहिला या ग्रामा ॥ पुढें गेला कोठें तें आम्हां ॥ माहीत नाहीं महाराजा ॥२६॥

याउपरी गोरक्षनाथ ॥ दिवस किती लोटले ते पाहात ॥ येरी म्हणे दश आजपर्यंत ॥ लोटले संवत्सर महाराजा ॥२७॥

ऐसी ऐकूनि तयांची वाणी ॥ गोरक्ष विचारी आपुले मनीं ॥ तरी कां माझा स्वामी नाम पालटूनी ॥ जगामाजी विचरला ॥२८॥

मी सांडूनि पूर्ण तपास ॥ लागावया करीत येईन धांवत ॥ म्हणूनि पालटिलें स्वनामास ॥ गांवामाजीं मिरवला ॥२९॥

ऐसी कल्पना आणूनि मनीं ॥ अश्रुधारा वाहती नयनीं ॥ म्हणे महाराजा गेलासी सोडुनी ॥ मज पाडसा कैसा रे ॥३०॥

टाकूनि निर्वाण काननांत ॥ कोठें गेला माझा नाथ ॥ मी अर्भक अज्ञान बाळक ॥ बहुत मोकलिलें कैसें मज ॥३१॥

हे नाथ तूं सकळमय ॥ सर्वस्वी बापमाय ॥ तुजविण मातें कोण आश्रय ॥ तिन्हीं लोकीं दिसेना ॥३२॥

अहा मज पाडसाची येरणी ॥ चरुं गेली कोणे रानीं ॥ माझें स्मरण सकळ सांडूनी ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३३॥

अहा मग वत्साची प्रेममाउली ॥ कोण रानीं चरुं गेली ॥ परी माझे स्मरण विसरली ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३४॥

अहा माझी मोहाची माय ॥ करुं गेली अंतराय ॥ मज ते विसरुनि सदयहदय ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३५॥

ऐसें बोलूनि विलाप करीत ॥ ऊर्ध्व हंबरडा मारुनि धांवत ॥ पोट कवळुनि श्वास सोडीत ॥ अहा नाथ म्हणूनी ॥३६॥

मग ते कानवाळू द्वारपाळ ॥ म्हणती नाथा न करीं तळमळ ॥ तुम्हां मायलेंकरांचा मेळ ॥ ईश्वर करील पुढारां ॥३७॥

ऐसी वदती ते वाणी ॥ गांवांत धाडिला भिक्षेलागूनी ॥ मग तो गोरक्ष सदनोसदनीं ॥ अलक्ष गाजवीत जातसे ॥३८॥

परी जालिंदर होता ज्या ठायीं ॥ तेथें सहज आला भिक्षेस पाहीं ॥ तैं एकटएक सदन सांई ॥ पाहुनि अलख म्हणतसे ॥३९॥

तो सवाल ऐकूनि जालिंदरनाथ ॥ आदेश म्हणत महीआंत ॥ ते आदेश गोरक्षाप्रत ॥ श्रवण झाले तांतडी ॥४०॥

मग ते आदेश वंदूनि पुढती ॥ म्हणे कोठे आहांत महाराज जती ॥ येरु म्हणे महीगती ॥ विराजलोसे महाराजा ॥४१॥

गोरक्ष म्हणे कवण नामीं ॥ मिरवत आहांत नाथा स्वामी ॥ येरी म्हणे मनोधर्मी ॥ नाथ जालिंदर म्हणतात ॥४२॥

परी महाराजा योगद्रुमा ॥ कवण नाम मिरवतसे तुम्हां ॥ आणि वहदहस्तप्रसादउगमा ॥ गुरु कोण तुमचा हो ॥४३॥

गोरक्ष म्हणे महाराजा ऐकें युक्ती ॥ तुम्ही सेविली महीगर्ती ॥ जगीं प्रतेष्टुनी पाय मती ॥ भंगित झाली लोकांची कोपानळ पेटला ॥४६॥

म्हणे महाराजा आज्ञा करावी ॥ क्षणेंचि घालीन पालथी मही ॥ तंव त्या नृपाची प्रौढी कांहीं ॥ भस्म करीन क्षणांत ॥४७॥

जैसा अग्नि पेटला सदनांत ॥ तेणें तृणतंतूचें कोण गणित ॥ तन्न्यायें येथील नृपनाथ ॥ भस्म करीन महाराजा ॥४८॥

अहा ऐसी गुरुमूर्ती ॥ देवां दानवां वरद अती ॥ ऐशा स्वामीसी घालूनि गर्ती ॥ राज्य कैसा करितो जी ॥४९॥

तरी आतांचि आज्ञा प्रमाण ॥ लागूं नेदीं एक क्षण ॥ मग जालिंदर बोले वचन ॥ ऐसें नोहे महाराजा ॥५०॥

या कार्याचें पुढें कार्य ॥ नातरी हदयीं विचारुनि पाहें ॥ नाथपंथ येणें दुणावे ॥ हेंचि भविष्य असे पहा ॥५१॥

तरी आतां क्षमा करुन ॥ पुढें महाराजा करी गमन ॥ परी हें ऐसें वर्तमान ॥ बोलूं नको जगासी ॥५२॥

तुम्ही हिंडतां सहज महीसी ॥ मम सुत कानिफा भेटतां तुम्हांसी ॥ श्रुत करावें कृत्य त्यासी ॥ वृत्तांत यथींचा सकळिक ॥५३॥

मग तो युक्तिप्रयुक्ती करुन ॥ संपादूनि रायासी कल्याण ॥ मातें काढील गर्तेतून ॥ वाढवील तो नाथपंथ ॥५४॥

ऐसें सांगूनि गोरक्षनाथ ॥ आदेश म्हणू बोळवीत ॥ आणि गोरक्ष ऐकूनि शांत ॥ होऊन आदेश म्हणतसे ॥५५॥

मग आदेशशब्दोंचे गमन ॥ करुनि निघाला गोरक्षनंदन ॥ आहारापुरतें मेळवूनि अन्न ॥ उपहारा संपादी ॥५६॥

मग शिंगी शेली करुनि ग्रहण ॥ करिता झाला मार्गी गमन ॥ तों जगन्नाथ प्राचीनस्थान ॥ तेथें जाऊनि पोहोंचला ॥५७॥

येरींकडे कानिफानाथ ॥ गांवोगांवी भ्रमण करीत ॥ परी ज्या गांवी जाय तेथें ॥ जगालागीं बोधीतसे ॥५८॥

कानिफामुखाचिये बोधस्थिती ॥ ऐकूनि परम जन मानवती ॥ सलिलप्रेम दाटूनि चित्तीं ॥ अनुग्रह घेती तयाचा ॥५९॥

मग त्या गांवांत एकेक दोन ॥ सच्छिष्य निघती विरक्तमान ॥ प्रपंचराहणी लाथ मारुन ॥ नाथासवें चालती ॥६०॥

ऐसे एक दोन पाच सात ॥ दहाविसांचा मेळा जमत ॥ होतां होतां सप्तशत ॥ दाटले शिष्य समागमें ॥६१॥

पूर्वदेशीं करितां गमन ॥ तो स्त्रीराज्य दोषसघन ॥ तयाच्या सीमेपर्यंत जाऊन ॥ उलट पाहती माघारां ॥६२॥

स्त्रीराज्यांत पुरुष कोणी ॥ नाहीं हे विख्यात जनश्रुतकर्णी ॥ म्हणोनि शिष्यमंडळ दणाणोनि ॥ परतोनि पाहती माघारीं ॥६३॥

ठायीं ठायीं करिती विचार ॥ म्हणती स्त्रीराज्यदेव तीव्र ॥ तेथें प्रवेश करितां नर ॥ वाचत नाहीं सहसाही ॥६४॥

ऐसा देश कठिण असून ॥ स्वामी करिती तयांत गमन ॥ तरी अग्निकुंडीं सकळां नेऊन ॥ पूर्ण आहुती इच्छीतसे ॥६५॥

जरी सेविल्या हलाहलातें ॥ मग कोण पुरुष जगेल तेथे ॥ जेवी तीव्र अग्नीत शिरतां तेथें ॥ आहाळेना कैसें म्हणावें ॥६६॥

सदनीं प्रेरिला वैश्वानर ॥ सदन झाले स्त्रदिरांगार ॥ तयामाजी निघतां नर ॥ वांचेल कैसा सहसा तो ॥६७॥

कीं पतंग घेता दीपाची भेटी ॥ त्याचि रीती येथें गोष्टी ॥ दिसूनि येती परी शेवटीं ॥ मृत्यु आम्हा दिसतसे ॥६८॥

ऐसें होतां निश्चयवचन ॥ कोणी म्हणती करा पलायन ॥ जीवित्व वाचल्या साधन ॥ घडून येईल महाराजा ॥६९॥

एक म्हणती ऐसें करावें ॥ सदृढ धरावे गुरुचे पाय ॥ मग जीवित्वाचें भय काय ॥ जातसे तरी जाऊं द्या ॥७०॥

काय वाचा तनुमनधन ॥ प्रथम त्यासी केलें अर्पण ॥ मग या जीवित्वाची आस्था धरुन ॥ व्रतालागीं कां भंगावें ॥७१॥

एक म्हणती लागलें वेड ॥ कैंचे व्रत पडिपाड ॥ जीवित्व हरल्या व्रतकोड ॥ कोणी दृष्टीं पाहिलें ॥७२॥

तरी हा अर्थ सांडूनि धन ॥ या स्वामीलागीं चुकवून ॥ गृहस्थांनो पलायन ॥ करुनि जावित्व वांचवा ॥७३॥

या स्वामीसी लागलें वेड ॥ सादर मृत्युझांपड ॥ जया ठायीं पडेल धाड ॥ चालूनि जातो त्या ठायीं ॥७४॥

ऐसें तुम्हांसीं सत्य भासेल ॥ तरी हे मानूनि घ्यावे बोल ॥ जीवित्वाची आस्था असेल ॥ तरी बोल्र फोल न मानावे ॥७५॥

ऐसें ठायी ठायीं ताटीं ॥ बैसूनि करिती बोलचावटी ॥ परी हा अर्थ सकळ पोटीं ॥ कानिफातें समजला ॥७६॥

मनांत म्हणे भ्याले सकळ ॥ हीनबुद्धि अति दुर्बळ ॥ परी आपुला प्रताप सांगतां तुंबळ ॥ सत्य वाटणार नाहीं यासी ॥७७॥

मग करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ स्पर्शास्त्रप्रयोग पोटीं ॥ जल्पूनि प्रेरी महीपोटीं ॥ तिन्ही दिशा लक्षुनी ॥७८॥

पुढील मात्र मार्ग ठेवूनि मोकळा ॥ दिशा बंधन केल्या सकळा ॥ केल्या परी ऐशा बळा ॥ देवदानवां आतुळेना ॥७९॥

केले अर्थ द्व्यर्थपर ॥ शिष्य पळूनिं नाहीं जाणार ॥ आणि मारुतीचाही भुभुःकार ॥ पोहोचूं नये त्या ठाया ॥८०॥

ऐसें स्पर्शास्त्र पृष्ठीं ॥ रचूनि शांत बैसला जेठी ॥ मग शिष्यां पाचारुनि शेवटीं ॥ पुसता झाला तथासी ॥८१॥

लहान मोठे मेळवून ॥ समुद्रायासी बैसवून ॥ म्हणे आम्हांलागीं जाणें ॥ स्त्रीराज्यांत आहे कीं ॥८२॥

परी तो देश कठिण ॥ वांचत नाहीं पुरुषरत्न ॥ हनुमंतभुभुःकारेंकरुन ॥ प्राणहानी होतसे ॥८३॥

पुढें देश बहुत कठिण ॥ परी आम्हांलागीं आहे जाणे ॥ तया देशींचे तीर्थ करुन ॥ येऊं ऐसे वाटतसे ॥८४॥

आमुचा विश्वास गुरुपायीं ॥ जरी असेल भवप्रवाहीं ॥ तरी देशाची लंघूनि मही ॥ पुनः येऊं माघारे ॥८५॥

नातरी सुखें जावो प्राण ॥ परी मनाची धांव घेई पूर्ण ॥ तरी तुमचा विचार कवण ॥ तो मजप्रती दर्शवावा ॥८६॥

जें निःसीम गुरुच्या असती भक्तीं ॥ तिहीं धरावी माझी संगती ॥ नातरी जीवलोम असेल चित्तीं ॥ तिहीं जावें माघारें ॥८७॥

ऐसें सांगूनि बोलावीत ॥ म्हणे देखिली बुद्धि करा येथ ॥ मग निःसीम भक्तांचे किंचित ॥ तया ठायी राहिले ॥८८॥

सातशतांत सात जाण ॥ ठायीं उरले स्थान धरुन ॥ वरकड कंबरवस्ती करुन ॥ कल्पिल्या मार्गी चालिले ॥८९॥

मनांत मानिती सुखवसा ॥ म्हणती तस्करबुद्धीचा ठसा ॥ पळूनि जाता काजळीलेशा ॥ मूर्खत्व येते आपणांसी ॥९०॥

तरी फार बरवें झालें ॥ स्वामीनें अंतर ओळखिलें ॥ उजळणी बोळविले ॥ कीर्तिमाहात्म्य रक्षुनी ॥९१॥

ऐसा चित्तीं सुखवसा मानून ॥ आले पंथी करिती गमन ॥ एक कोस गेले धांवून ॥ सीमेपर्यंत ग्रामाच्या ॥९२॥

परी स्पर्शास्त्र सीमा लक्षून ॥ बैसलें होतें मही वेष्टून ॥ तेणें येतांच धरिले कवळून ॥ महिसीं दृढ केले ते ॥९३॥

पद झालें महीं व्यक्त ॥ मागें पुढें ठेवाया नसे शक्त ॥ जैसें सावज गुंतल्या चिखलांत ॥ बळ कांहीं चालेना ॥९४॥

असो झाले महीं व्यक्त ॥ म्हणूनि हस्ते काढूं जात ॥ तों हस्त झाले महीं लिप्त ॥ मग सकळ ओणवे झाले ॥९५॥

येरीकडे कानिफानाथ ॥ त्या सातातें बोलावूनि घेत ॥ जवळ बैसवूनि सकळ वृत्तांत ॥ निवेदिला तयांचा ॥९६॥

तुम्ही करावें आतां ऐसें ॥ शीघ्र जाऊनि त्या महीस ॥ पाषाण करीं उचलोनि विशेष ॥ तयांच्या पृष्ठी स्थापावे ॥९७॥

मग विभक्तास्त्रविभूति ॥ चर्चूनि तयांच्या भाळाप्रति ॥ मागूनि पाठविलें साती ॥ समाचारा तयांच्या ॥९८॥

ते तंव श्रीगुरुचे आज्ञेकरुन ॥ पहात चालिले सीमास्थान ॥ तरी ते सर्वही ओणवे होऊन ॥ ठायीं ठायीं खुंटले ॥९९॥

सातांसी पाहूनि अवघ्या मूर्ती ॥ परम चित्तीं लज्जित होती ॥ अधोवदन करुन्मि पाहती ॥ परी न देती उत्तर ॥१००॥

हे जाऊनि बोलती त्यांतें ॥ कैसें सोडूनि गुरुतें ॥ जीवित्वलोभ धरुनियां मनातें ॥ मार्ग केला पुढारां ॥१॥

परी ईश्वराची अगाध करणी ॥ सकळ पडलां महीं खिळूनी ॥ ऐसिया रीतीं कोण तरुनी ॥ गेला आहे सांगा पां ॥२॥

मग हस्ते सकळ पाषाण ॥ पृष्ठीं ठेविती बळेंकरुन ॥ स्पर्श होतांचि जाती चिकटून ॥ आंग हालवितां पडेना ॥३॥

मग परम आक्रंदती ॥ चुकलों चुकलों ऐसें म्हणती ॥ आतां क्षमा करुनि चित्तीं ॥ सोडवावें आम्हांतें ॥४॥

येरु म्हणती खुशाल असा ॥ जीवित्वाचा धरुनि भरंवसा ॥ स्वामी पाहूनि आलिया देशा ॥ सोडवूनि नेऊं तुम्हांसी ॥५॥

गुरु करितां हा कशाला ॥ संकट पडतां काढितां पळा ॥ परी ज्याची क्रिया त्याची त्याला ॥ फलद्रूप होतसे ॥६॥

आतां स्वस्थ असा चित्तीं ॥ अम्ही जातों स्त्रीदेशाप्रती ॥ दैवें वांचूनि आलिया अंतीं ॥ सोडवूनि नेऊं तुम्हांतें ॥७॥

ऐसें सकळां करुनि भाषण ॥ सकळां पृष्ठीं देऊनि पाषाण ॥ परतते झाले गुरुआज्ञेकरुन ॥ परी ते पाहूनि आरंबळती ॥८॥

म्हणती गुरुमायेहूनि माय ॥ होऊनियां सदस्यहदय ॥ आम्हांसही सवें न्यावें ॥ स्त्रीराज्यामाझारी ॥९॥

आमुची सकळ गेली भ्रांती ॥ आणि गुरुची समजली प्रतापशक्ती ॥ आतां सकळ नसूनि दुर्मती ॥ विश्वासाते टेंकलों ॥११०॥

ऐसी करितां विनवणी ॥ ती ऐकिला सातजणीं ॥ मग म्हणती श्रीगुरुतें सांगुनी ॥ सुटका करुं तुमची ॥११॥

ऐसें बोलूनि सकळांकारण ॥ पुनः आले परतून ॥ म्हणती महाराजा दैन्यवाण ॥ शिष्यकटक मिरवले ॥१२॥

त्यांची नासिली सकळ भ्रांती ॥ पृष्ठी पाषाण घेऊनि आरंकळती ॥ तरी आतां कृपा ओसंडोनि चित्तीं ॥ मुक्त करा सर्वांतें ॥१३॥

आतां येथूनि गेलिया प्राण ॥ सोडणार नाहीं आपुले चरण ॥ सर्वही स्थिर मती धरुन ॥ चरणाचरी लोटतील ॥१४॥

नाना युक्तींकरुन ॥ करितील श्रीगुरुचें समाधान ॥ हें सच्छिंष्यांचें ऐकूनि वचन ॥ नाथ चित्तीं तोषला ॥१५॥

मग विभक्तास्त्रमंत्र होंटी ॥ जल्पूनि योजिली भस्मचिमुटी ॥ ओपूनि शिष्या करसंपूटी ॥ म्हणे चर्चूनि यावे तयातें ॥१६॥

मग एक शिष्य जाऊनि तेथें ॥ भाळीं चर्चूनि भस्मचिमुटातें ॥ चर्चिता झाले सकळ मुक्त ॥ सातां उणें सातशें ॥१७॥

ऐसे मुक्त झाले सकळ जनीं ॥ येऊनिं लागले गुरुचे चरणीं ॥ नाथ तयालागीं पाहुनी ॥ अहा अहा म्हणतसे ॥१८॥

असो ऐसें बोलूनि बचन ॥ तेथूनि टाळितां मग मुक्काम ॥ स्त्रीदेशाचे सीमेवरी जाऊन ॥ वस्तीलागीं विराजती ॥१९॥

तेथें दिन लोटल्या झाली रात्री ॥ तो चमत्कार वर्तला ते क्षितीं ॥ भुभुःकार द्यावया मारुती ॥ सेतुहूनि चालिला ॥१२०॥

तों मार्गी येतां अस्त्र सबळ ॥ वेष्टित झालें पदकमळ ॥ परी तो वज्रशरीरी तुंबळ ॥ अस्त्रालागीं मानीना ॥२१॥

येरु चित्तामाजी विचार करीत ॥ हें स्पर्शास्त्र आहे निश्वित ॥ तरी येथें कोणी प्रतापवंत ॥ आला आहे निश्वयें ॥२२॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ येता झाला सीमेप्रती ॥ तों कटक पाहूनि नाथपंथी ॥ मनांत विचार करीतसे ॥२३॥

कीं म्या यत्न करुनि बहुत ॥ तेथें पाठविला मच्छिंद्रनाथ ॥ परी कटक गेलिया तेथ ॥ बोधितील तयासी ॥२४॥

मग बोधें होऊनियां स्वार ॥ स्वदेशीं येईल मच्छिंद्र ॥ मग मैनाकिनीमुखचंद्र ॥ दुःखसागरीं उतरेल ॥२५॥

तरी येथेंचि यातें निर्बळ करुन ॥ मागें लावावें परतून ॥ मग अति भीमरुप धरुन ॥ भुभुःकार करीतसे ॥२६॥

गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ भयंकररुपी अति तीव्र ॥ तें पाहुनिया कटकभार समग्र ॥ स्वामीआड दडताती ॥२७॥

म्हणती महाराजा प्रळयकाळ ॥ प्रथम उदेला महाबळ ॥ आता मधील कटक सकळ ॥ उपाय कांहीं योजावा ॥२८॥

येरु म्हणे नाहीं भय ॥ उगेचि पहा धरुनि धैर्य ॥ यानें तुमचें करावें काय ॥ अचळपणीं असा रे ॥२९॥

मग करीं घेऊनि भस्मचिमुटी ॥ वज्रास्त्र परम कठिण ॥ माथा मिरविलें भूषण गगन ॥ येरीकडे वायुनंदन ॥ निजदृष्टी पहातसे ॥३१॥

मग मोठमोठे उचलून पर्वत ॥ फेंकिता झाला गगनपंथ ॥ ते गिरी आदळतां वज्रास्त्र ॥ चूर्ण होती क्षणार्धे ॥३२॥

तें पाहूनि अंजनीसुत ॥ प्रेरिता झाला मुष्टीघात ॥ तेणें वज्र झाले भंगित ॥ निचेष्टित महीं पडलें ॥३३॥

ऐसे होतां प्रकरण ॥ दृष्टी पाहे कर्णनंदन ॥ मग काळिकास्त्र जल्पून ॥ भस्मचिमुटी सोडीतसे ॥३४॥

यावरी सर्वोचि अग्न्यस्त्र ॥ सोडिता झाला प्रयोगमंत्र ॥ त्यावरी सर्वोचि वासवास्त्र ॥ वरी वाय्वस्त्र प्रेरिलें ॥३५॥

मग तो वाय्ववस्त्रप्रयोग्त होतां ॥ द्विमूर्धनी दाटला सविता ॥ मग महापर्वत असती स्थूलता ॥ भस्म होती तयानें ॥३६॥

तों अंजनीसुतासकट ॥ तो अति तीव्र करीत नेट ॥ याउपरी काय उद्भट ॥ विक्राळरुपी प्रगटला ॥३७॥

कीं कृत्तांत जैसा मुख पसरुन ॥ ग्रासू पाहे सकळ जन ॥ त्यातें साह्य परिपूर्ण ॥ वासवशक्ती मिरवली ॥३८॥

जैसा यमामागे दम ॥ प्रगट होय हरुं प्राण ॥ ऐसें उभयास्त्र तरुण ॥ कडकडां करीतसे ॥३९॥

जैसे खग मेघडंबरीं ॥ चमका मारिती चपळेपरी ॥ उदेली भक्ती तदनुपरी ॥ प्रणयतरणी मिरवल्या ॥१४०॥

त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर ॥ त्यावरी साह्यातें वातास्त्र ॥ मग मारुतिदेह होऊनि जर्जर ॥ रक्षणार्थ कांही दिसेना ॥४१॥

वासव आणि काळिकास्त्र ॥ मागे पुढें होऊनि पवित्र ॥ प्रहर भेदाया पाहती स्वतंत्र ॥ परी वायुपुत्र चपळ तो ॥४२॥

देई अस्त्रातें दोन हात ॥ ओढिता झाला चपळवंत ॥ तरी तेंही अस्त्र चपळ बहुत ॥ हस्तयुक्त होऊं न देत ॥४३॥

यावरी अग्न्यस्त्राकारण ॥ पुच्छीं योजी वायुनंदन ॥ यापरी वातास्त्राकारण ॥ स्तुति विनवोनि आराधिले ॥४४॥

म्हणे महाराजा प्रळयवंत ॥ प्रविष्ट करा अग्न्यस्त्रांत ॥ तरी तुझा आहे सुत ॥ लोकांमाजी मिरवतसे ॥४५॥

परी गृहींचा पाहूनि अनये ॥ कोणता पाहुनि तुष्टला तात ॥ ऐसेया प्रकरणीं हदयांत ॥ निवारिजे महाराज ॥४६॥

ऐसें उत्तर ऐकोनि सावधान ॥ मग बोलवी वायुनंदन ॥ तें वातास्त्र झालें क्षीण ॥ महाप्रतापें आच्छादी ॥४७॥

तें पाहुनी कानिफनाथ ॥ मोहनास्त्र प्रेरुनियां त्वरित ॥ तें गुप्तास्त्र हदयांत ॥ जाऊनि आंत संचरलें ॥४८॥

संचरलें तरी वज्रशरीर ॥ लाग न धरी मोहनास्त्र ॥ परी कांहींसा भ्रांत वायुकुमर ॥ निजदेहीं दाटला ॥४९॥

तरी तैसाचि भ्रांतीमाझारी ॥ अग्न्यस्त्र पुच्छे धरी ॥ महाबळें समुद्रतीरी ॥ मिरकावुनि दिधलें ॥१५०॥

परी अग्न्यस्त्रें महासबळ ॥ काढूं लागलें समुद्र जळ ॥ जळाचरा ओढवला प्रळयकाळ ॥ तेणे समुद्र गजबजिला ॥५१॥

मग तो येवोनि मूर्तिमंत ॥ निजदृष्टीनें जंव पाहात ॥ तों कानिफा आणि वायुसुत ॥ युद्धालागीं मिरवले ॥५२॥

परी तयासी ओढवला प्रळयकाळ ॥ अग्न्यस्त्रातें करी शीतळ ॥ मग जलद आणोनी सकळ ॥ अग्न्यस्त्रीं स्थापिलें ॥५३॥

तेणें अग्न्यस्त्र झालें शांत ॥ येरीकडें वायुसुत ॥ मोहनप्रकरणीं प्रविष्टचित्त ॥ परी पुच्छी पर्वत उचलिला ॥५४॥

पर्वत उचलावयाचे संधीं ॥ फाकली होती तिकडे बुद्धी ॥ आणि स्थावरमोह अस्त्रें शुद्धि ॥ भ्रम पडला होताचि ॥५५॥

त्या संधींत दोहींकडून ॥ पाठींपाटी अस्त्रें दोन ॥ एकदांचि मेदिली प्रहार करुन ॥ सबळबळें करुनियां ॥५६॥

जैसी मेणाची मूर्धनी ॥ झुंजतां एक होय मेळणीं ॥ तैसी पृष्ठीं हदय लक्षुनी ॥ भेदतीं झालीं तीं अस्त्रें ॥५७॥

कालिका आणि वासवशक्ती ॥ भेदितांचि मूर्च्छित झाली व्यक्ती ॥ तेणें उलंढूनि महीवरती ॥ वातसुत पडियेला ॥५८॥

तें पाहूनि अनिळराज ॥ हदयीं उजळलें मोहबीज ॥ मग प्रत्यक्ष होवोनि तेजःपुंज ॥ तयापासीं पातला ॥५९॥

परी तो अंजनीचा बाळ ॥ वज्रशरीरी ब्रह्मांडबळ ॥ पुच्छ सांवरोनि उतावेळ ॥ युद्धा मिसळूं पहातसे ॥१६०॥

मग श्रीवातें धरुनि हात ॥ म्हणे ऐक मद्वचन सत्य ॥ हे सबळपाणी आहेत नाथ ॥ रळी यांतें करुं नको ॥६१॥

पूर्वी पाहें मच्छिंद्रनाथ ॥ तव शिरीं दिधला होता पर्वत ॥ वाताआकर्षणविद्या बहुत ॥ जाज्वल्यें मिरवे यापासीं ॥६२॥

तरी आतां संख्य करुन ॥ कार्य काय तें घे साधून ॥ गूळ दिल्या पावे मरण ॥ विष त्यातें नकोचि ॥६३॥

यापरी बोले अपांपती ॥ म्हणे हेंचि मानवतें माझे चित्तीं ॥ संख्यासारखी दुसरी युक्ती ॥ योग्यायोग्य दिसेना ॥६४॥

मग उदधीं आणि द्वितीय वातें ॥ सवें घेऊनि मारुतीतें ॥ कानिफातें घेऊनि त्वरितें ॥ परम प्रीतीनें भेटले ॥६५॥

कानिफा तीन्ही देवांसी ॥ नमन करीतसे अतिप्रीतीसीं ॥ नमूनि पुढें वायुसुतासी ॥ युद्ध कां सोडिलें म्हणतसे ॥६६॥

हे ऐकूनि बोले अनिळ ॥ कीं युद्ध कासया करितां तुंबळ ॥ कवण अर्थी तयाचें फळ ॥ आम्हांलागीं दाखवा ॥६७॥

नाथ म्हणे तया मारुतीसी ॥ युद्ध करीत होतों कासयासी ॥ मारुती म्हणे कामनेसी ॥ तरी ऐका माझिया ॥६८॥

म्यां बहुत यत्नेंकरुन ॥ गौरवोनि मच्छिंद्रनंदन ॥ परम आदरें स्त्रीराज्याकारण ॥ पाठविला आहे कीं ॥६९॥

तरी हे तयाचे असती जाती ॥ तेथें गेलिया तयाप्रती ॥ भेटल्या तयाची समूळ वृत्ती ॥ बोधस्थिती आणितील ॥१७०॥

मग तो सांडूनि तेथींचे स्थान ॥ स्वदेशांत करील गमन ॥ ऐसी चित्तीं कल्पना आणून ॥ युद्धालागीं मिसळलों ॥७१॥

तरी आतां असो कैसें ॥ हा गेलिया स्त्रीराज्यास ॥ कांहीं योग मच्छिंद्रास ॥ बोलूं नये दुरुक्ती ॥७२॥

ऐसे प्रकरणीं भाष्य देऊन ॥ आवश्य करावें यांनीं गमन ॥ मग माझें कांहीं एक छलन ॥ होणार नाही नाथासी ॥७३॥

ऐसें बोलतां वायुसुत ॥ अपांपति म्हणे बरवें यांत ॥ अहा म्हणूनि वदे मरुतसुत ॥ यांत काय वेंचतसे ॥७४॥

मग हांसोनि बोलिलें कानिफानाथें ॥ अहा शंका आलिया तुम्हांतें ॥ तरी प्रयोजन काय आमुतें ॥ मच्छिंद्रातें बोलाया ॥७५॥

तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी ॥ बोलणार नाहीं दुर्बलेंसी ॥ आणि संबोधूनि त्यासी ॥ तेथील तेथें स्थापूं कीं ॥७६॥

ऐसें वदूनि करतळभाष ॥ देऊनि तुष्ट केलें त्यास ॥ मग आपण आपुल्या स्वस्थानास ॥ त्रिवर्गही चालिले ॥७७॥

स्वस्थानासी ॥ तों उदय झाल्या लोटली निशीं ॥ मग शिष्यकटकेंसी ॥ तेथूनियां निघाले ॥७८॥

स्त्रीराज्यांत प्रवेशून ॥ नाना तीर्थक्षेत्रस्थान ॥ पहात पहात गजनंदन ॥ शृंगमुरडीं पातला ॥७९॥

तों तें गांवीचे नृपासनीं ॥ तिलोत्तमा मनाकिनी ॥ मच्छिंद्रासह बैसोनि समास्थानीं ॥ सेवेलागी विनटली ॥१८०॥

तों कानिफानाथ फेरी ॥ आला करीत राजद्वारी ॥ सवें शिष्य कटक भारी ॥ तों द्वाररक्षक शोधालागीं धांवले ॥८१॥

शोधिता शिष्य नयनीं ॥ तों कानिफा कळला कानीं ॥ मग जाउनियां राजांगणीं ॥ वृत्तांत सुचविला ॥८२॥

म्हणती महाराजा ग्रामद्वारीं ॥ कानिफा सहनाथपरिवारीं ॥ सातशें शिष्य समुद्रलहरी ॥ तव भेटी आलासे ॥८३॥

हें ऐकूनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे पाहिला तया कोण पंथ ॥ येरी म्हणती म्हणवती नाथ ॥ कानफाटी कर्णी ॥८४॥

ऐसें ऐकूनि मच्छिंद्रनाथ ॥ परम दचकलें तयाचें चित्त ॥ म्हणे आला कीं गोरक्षनाथ ॥ पालटोनि नामातें ॥८५॥

तरी आतां कैचे येथें ॥ राहूं देईना या सुखातें ॥ अहा तिलोत्तमा सौंर्दयें मातें ॥ लाधली होती प्रीतीनें ॥८६॥

परी तयामाजी विक्षेप झाला ॥ कीं सैंधवे दुग्धघट नासला ॥ तन्न्यायें न्याय झाला ॥ प्रारब्धवशें आमुचा ॥८७॥

आतां असो कैसे तरी ॥ यासी न्यावें ग्रामाभीतरीं ॥ म्हणोनि सिद्ध करोनि स्वारी ॥ अश्वशिबिकेसह निघाला ॥८८॥

त्वरें येऊनि ग्रामद्वारीं ॥ परस्पर भेटी झाल्यावरी ॥ कानिफा पाहोनि हदयाभीतरी ॥ समाधान मिरवलें ॥८९॥

मग आदेशा होऊनि नमन ॥ रुजामे भरजरी कनकवर्ण ॥ महीं पसरुनि योगद्रुम ॥ तयावरी बैसविला ॥१९०॥

मग कोण कोणाची समूळ कथा ॥ तदनु पुसतां गुरुचे पंथा ॥ त्यांनींहि सांगितली समूळ वार्ता ॥ जालिंदर जन्मापासूनी ॥९१॥

मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ ॥ देता अनुग्रह उत्तम यात ॥ तरी तूं कानिफा नाम सुत ॥ गुरुबंधू तो माझा ॥९२॥

मग शब्दोशब्दीं अधिकोत्तर ॥ वाढत चालली प्रेमलहर ॥ मग वाहूनि गजस्कंधावर ॥ ग्रामामाजी आणिलें ॥९३॥

मग नानायुक्ती रचोनि चित्तीं ॥ स्वयें करीं मच्छिंद्रजती ॥ एक भास अति प्रीतीं ॥ कानिफा राहविला त्या स्थानीं ॥९४।

राहिला परी तो नाथ कैसा ॥ तरी समूळ कथासुधारसा ॥ पुढिले अध्यायीं श्रवणीं वसा ॥ श्रवण होईल सकळिकां ॥९५॥

तरी हा भक्तिकथासार ॥ तुम्हां वैष्णवांचें निजमाहेर ॥ प्रपंच सांडूनि रहावें स्थिर ॥ या धवलगिरीं येऊनि ॥९६॥

धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ कवि मालू नाम जयासी ॥ तो बैसला ग्रंथमाहेरासी ॥ सुखसंपन्न भोगावया ॥९७॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ पंचदशाध्याय गोड हा ॥१९८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय १५ ॥ ओव्या ॥१९८॥