Get it on Google Play
Download on the App Store

वीररत्‍न तानाजीराव मालुसरे

स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला,

तो धन्य धन्य ! नरवीर कीर्तियुत होई, ईश्वर त्यावरि संतोषला ॥ध्रु०॥

चौक १

एके दिवशीं जिजाई पहाटेला । बोलत शिवाजीला ।

"कोंडाणा जंवा दिधला । यवनाला घाला तंवा पडला ।

राज्याला मोंगल काळ झाला । चित्ताचा धीर सकळ सुटला ॥

सारा मुलुख ताब्यांत ठेवण्याला । किल्ला पाहिजे झाला ।

स्वाधीन; आपणाला । ना तरी सदा काळिमा लागला ।

राज्याला तसाच कीर्तीला ॥ पाहिजे विचार हा केला ॥

रामकृष्ण तुमचे पूर्वज । जनक धर्मराज ।

धरावी त्यांची लाज । रावणाला धाक ज्यांचा पडला ।

कंसाला धाक ज्यांचा पडला; । पृथ्वीचा भार कमी हो केला ॥

ज्यांनीं धर्म सकळ बुडविला, । देश चिरडिला, ।

त्यांच्या नाशाला । घेतसे देव नविन अवतार; ।

दुष्टांचा पूर्ण करित संहार; । लक्षांत घ्यावा तोचि व्यवहार ॥

चाल

हें राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी ॥ ती भोगलालसा सदा जगीं वावरी ॥

षड्‌विकार होती बहु प्रबळ अंतरीं ॥ मग शुद्धबुद्ध होईल कावरीबावरी ॥

मग दृष्टि राहिल सदैव पापावरी" ॥ ऐकून आईचे बोल ।

शिवराज चित्तिं व्याकुळ, । म्हणे "माय । काय आम्हि केलं ? ।

कधिं पाप नाहीं बघितलं, । धर्मास नाहीं सोडलं ।

गर्वास उभं कापलं । आळसास नाहीं पद दिलं ।

मन तुमच्या अर्ध्या वचनांत सदा राहिलं" ॥

मग जिजामाउलिनं पुन्हां त्यास सांगितलं, ॥

"जर किल्ला घेण्या ऊशिर । शिवराया ! लागला फार ।

तर हिंदुधर्माचं शिर । तर महाराष्ट्राचं शिर ।

मोंगल उडवि सरसर । धर्माचा होइल चूर । पापाचा वाहिल पूर" ।

डोळ्यांत अश्रु सांठले कंठ दाटला ॥ गहिंवरल्या कंठामधून शब्द उमटला ॥

"माघाच्या वद्य नवमीला । तो किल्ला पाहिजे सर झाला ।

करि पूर्ण आस ही बाळा " । शिवराज बोलले नमून मातृपदाला ॥

चाल

"जर पूर्व-पुण्याई केली । असेल लाभली ।

होइल शिव वाली । माउली । आज निश्च्य केला ।

माघाच्या वद्य नवमीला । जोडिन किल्ला मराठेशाहीला" ॥१॥

चौक २

उमराठं गांव छानदार । सुरेख घरदार ।

लावली तलवार । कमरेला, धाक यमाला पडला ।

पाताळीं काळ जाउन दडला । सौख्याला सदा मोहोर आला ॥

जसा जयंत शोभत इंद्राला । अभिमन्यु अर्जुनाला ।

स्कंद शंभूला । रायबा तसा तानाजीला ।

रायबा तसाच जनतेला । सौख्याला सदा बहर भरला ॥

शेलारमामा सांगत तानाजीला । "रायबा थोर झाला ।

आला हो लगिनाला । कराव औंदा लगिन ह्याचं ।

पाहुंद्या लगिन नातवाचं । चार इसावर हो वय आमुचं" ॥

तानाजिनं होकार तंवा दिला । सोयरा बघितला ।

मुहुर्त मग ठरला । माघाच्या वद्य नवमीचा ।

थाट लइ झाला तय्यारीचा । वर्णील कुठवर ही वाचा ॥

चाल

तंवा सम्द लोक जमुनशान बोलती तान्यास ॥

"लइ तान्या मोठा झालास शिवबाचा दास ॥

त्येचं थोरपण नावरुप सांगशि आम्हांस ॥

त्या शिवरायाच्या पायीं वाहिलं जीवास ॥

घरदार सोडून दिलं त्याच्या कार्यास ॥

त्यास आम्ही कधीं पाहावं ? । त्यास आपण कधीं देखावं ? ।

डोळ्याचं पारणं फेडावं ? । ’हा ताना शिवरायाच्या मर्जीतला’ ॥

असं कौतुकानं सदानीदा सांगशि आम्हांला ॥

या वेळेस त्यास आणवावं । त्येनं आमचं गांव पहावं ।

त्येनं आपलं राहाणं देखावं । हें असं ध्येनांत धरावं ।

जा शेलारमामा ! तुम्ही तुम्ही त्यास आणावं" ॥

चाल

तानाजिनं इचार जरा केला । मामास सांगितला ।

रायबा संग घेतला । तिघेहि झाले घोडयावर स्वार ।

बाळ तरुण म्हातारपणाचा अवतार । जाहला जगांत जयजयकार ॥२॥

चौक ३

ऐका तंवाच राजगडावर । झालेला प्रकार ।

युद्धास घनघोर । आलं हो मूळ, प्रसंग थोर ।

ऐकावं शांत होऊन सारं । चित्ताचा सोडुं नव्हे धीर ॥

’युगत करुन शिवाजी सुटुन गेला । दिल्लीहून आला ।

मराठया प्रांताला । होईल राग त्याचा अनिवार ।

करिल गट्ट मोंगल सरकार । दक्षिणेंत होईल मराठा कारभार’ ॥

औरंगजेबानं विचार असा करुन । पन्नास हजार देऊन ।

शिपाई शिस्त करुन । धाडिला उदयभान सरदार ।

कोंडाणा किल्ल्याचा सम्दा अधिकार । शाहानं दिला तयास बहुकाळ ----॥

असा कागद घेऊन हेजिब आला । जयसिंगानं धाडियेला ।

त्याच समयाला । रायाच्या चैन मनाला पडेना ।

तान्ह्याच्या राया करित स्मरणा । नव्हते कां दुसरे सरदार नाना ? ॥

चाल

हा विचार करिती शिवबा किल्ल्यावरी ॥ तों तानाजी पोंचले राजगडावरी ॥

ती अक्षत देण्या झाली त्यांची तय्यारी ॥ ती जिजामाउली त्यांची इचारपुस करी ॥

हें जाणून ताना चपापला अंतरीं ॥ हें असें कसं आज झालं ।

शिवरायानं नाहिं देखिलं । त्येच्या मनांत काय हो आलं ।

तें अजून नाहिं समजलं । लगिनास आलों आम्ही त्याला बोलावायला ॥

परि येत्या वेळेला सकून सुभ नाहिं झाला ॥ तर त्यास जाऊन भेटावं ।

त्येचं मन सम्द वोळखावं । शिवबानं सदा म्होरं यावं ।

आधि कडकडून भेटावं । मग आमचा हात धरुन किल्ल्यावर न्यावं ॥

परि असं कसं आज व्हावं । याचं कारण त्याला पूसावं ।

मग मामा ! लगिनामंदि एकमन व्हावं’ ॥

मग तडक तिघे निघाले । सरासर गेले ।

जेथे शिव बसले । युद्धाचा करित सकळ विचार ।

देशाचा होते करित संसार । आयास म्हणुन पडतोय फार ॥३॥

चौक ४

पाहुन तान्याला शिवाजि पुढं झाला । हातानं धरियेला ।

आणुन बसवीला । विचारी क्षेम तानाजीरावाला ।

मामाला आणिक रायबाला । येण्याचं तसं कारण त्याला ॥

चिंतेच्या अधीन पुरा । रायाचा चेहरा । तानाजीस दिसला ।

बोलला शूर मराठा सरदार । धैर्याचा मूर्तिमंत अवतार ।

प्राणाचा नाहिं तयास दरकार ॥ "तुमचं कुशल आधीं ऐकावं ।

मनानं आनंदावं । नंतर परिसावं । आमुचं; हाच उचित व्यवहार ।

राच्याचा दिला देवानं अधिकार । सांगावा आपला कुशल समाचार ॥

जसं प्रसन्न तुम्हां पाहिलं । पूर्वी मन धालं ।

नाहीं तसं देखिलं । भेटिच्या आजच्या समयाला ।

चंद्राला राहू चिंतेचा लागला । चित्तान असा कयास केला" ॥

शिवराज छत्रपति बोले । "विशेष नाहीं झालं ।

विचार सारं चुकलं । आपुलं, असे कुशळ आमचं ।

आतांच तानाजीराव येण्याचं । सांगावं काय कारण तुमचं " ॥

चाल

मालुसरे लागले बोलण्याला, आनंद जरा झाला,

तांदुळ पुढं केला, चित्ताचा हो बाग; परि गेला ।

घटकेंत वाळुनी सारा ! ॥ "शेलारमामानं सांगितलं आम्हांला,

रायबा थोर झाला, आला हो लगिनाला, सोयरा बघितला,

मुहूर्त मग ठरला, माघाच्या वद्य नवमीला ॥

सारे लोक बोलले आम्हांला, ’ऐशा समयाला,

शिवबा पाहिजे आला, आमच्या गांवाला भेट देण्याला,

होईल तोष डोळ्याला’ ॥ सारीं कामं ठेवून बाजूला,

जिजाईमाईला, घेऊन गांवाला यावं लगिनाला,

तोष, दासाला । होईन, धन्य भूपाला" ।

खळबळे प्रेम चित्तांत, आनंद मिळत दुःखांत ॥

शिवराज बोलले तान्यास, ॥ "आमचं मन धांवे येण्यास, ॥

चाल

पर शरीर दुसर्‍या कामावर । झालं तय्यार ।

घेऊन समशेर । कोंडाणा किल्ला कराया सर ।

माउलिनं घातली शपथ घोर । पुरवावी हीच आशा थोर" ॥४॥

चौक ५

’माघाच्या वद्य नवमीला । किल्ला पाहिजे झाला ।

आपला जन्माला ! ना तरी गनिम खास बसला ।

काळिमा लागेल कीर्तीला । जन्मुन काय उपयोग केला’ ॥

अशि शपथ घातली माउलिनं । प्राणहि अर्पुन ।

करिन स्वाधीन । कोंडाणा, जावें तुम्ही परतून ।

रायबाचं लग्न टाकावं उरकून । थाटानं यावं नंतर परतून ॥

या वेळेस स्वारिवर जावं । स्वताच अनुभवावं ।

युद्ध करावं । आशा ही झाली आम्हां अनिवार ।

हातांत घेतलि भवानी तलवार । आम्हां श्रीअंबाबाई आधार" ॥

हे शब्द हृदयिं झोंबले । मर्मिं लागले । ताना मग बोले ।

संचरे आर्यतेज हृदयांत । संचरे क्षात्रतेज अंगांत ।

उपमा नाहीं तिनहि लोकांत ! ॥ "आधीं लग्न लाविन कोंडाण्याचं ।

नंतर रायबाचं । हेंच ब्रिद आमुचं । वाहिला देह त्याच कार्यास ।

युद्ध मोक्षाचं दार आम्हांस ! । आपलं साह्य दीन दासास ॥

चाल

जरि आमच्यासारखं पडतिल लोक रणावर ॥ महाराज !

तरी मिळतील रोज भाराभर ॥ रंगेल लाल रक्तानं त्यांची समशेर ॥

आपण जर जाल बिनिवर । बरंवाईट झालं तर ।

मिळतील काय अवतार । दिसतात सूर्य कां फार ।

दिसतात तारे भरपूर । आमच्यासारख लोक घरोघर ।

तुमच्यासारख येक होणार । राहो लोभ तुमचा आम्हांवर ।

करो दया आज शंकर । सोडा हुकूम जाण्या रणावर ।

माघाच्या वद्य नवमीला किल्ला हो सर ॥

झालाच असं समजावं तरिच हा वीर ॥

ना तरी अंबेच्या पायीं वाहिन शीर !" ॥

चाल

अशि प्रतिज्ञा करुन निघाला । सुचेना अन्य त्याला ।

गात कवनाला । बंधुनो ! ऐका चरित्र त्याचं ।

शूराचं प्रतापि पुरुषाचं । पावन होईल मन आमुचं ! ॥५॥

चौक ६

लगिनाचा बेत रद्द केला ॥ घेऊन सूर्याजिला ।

टेहळणी करण्याला । चालला वेश करुन न्यारा ।

वळविलं रायाजी नाईकाला । ऐकावं त्येच्या पोवाडयाला ॥

घेरेसरनाईक रायाजी । मोठा रणगाजी । म्हणतो परी ’हां जी !’ ।

यवनाला, मोह मनाला पडला । मोंगलाचा दीन चाकुर बनला ।

मर्दाचा सम्दा इचार चुकला ॥ त्येच्या मुलीच्या लग्नामंदि गेला ।

तान्हा गोंधळाला । गात कीर्तीला । शिवबाच्या, झाला सारा लोक गार ।

चित्ताला त्यांच्या त्यानं केला वार । हातांत ओढली त्यांनीं तलवार ॥

रायाजी नाईक बोलला । तंवाच गोंधळ्याला । जाणलं त्येनं त्याला ।

ज्याची हो खूण त्याला कळणार । चित्ताचा झाला त्याच्या निर्धार ।

यवनाचा आला त्यास तिटकार ॥

चाल

"अक्षि रावजी ! तानू गोंधळ्याला ।

वळखिलं सम्दं ! तुम्हाला ! गोंधळ्याचा पोशाख केला ।

अन् माझं मन पाहण्याला आला व्हय ? । केल आज पुनित देहाला ।

दयेचा समिंदर झाला । काय हुकूम सांगावा मला ।

लइ दिसानं योग हा आला । आज जीव आमचा वाहिला शिवबादादाला ॥

देवलोक सम्द खाली आलं वाटतं आम्हाला ॥ राखाया गोरगरिबाला ।

राखाया गाय माउलीला । राखाया आपल्या धर्माला ।

धन्य धन्य तोड गावना तुमच्या कीर्तीला ! ॥"

तानाजी लागला बोलण्यला । "दावावा बुरुज आम्हाला ।

पाहुं द्या तट आम्हांला । रोखुं द्या जागा आम्हांला ।

जिथ्‌नं चढुनशान गांठावं उदयभानाला" ॥

चाल

घेरेसर रायाजि नाइकाला । घेऊन संगातीला ।

रोखुन बुरुजाला । परतले तानेराव सरदार ।

भवानी साह्य ज्यास करणार । वर्णन त्याचं कसं हो सरणार ॥६॥

चौक ७

तीन इसा मावळं संगातीला । घेऊन जाण्याला ।

सांगुनशान भावाला । चालला ताना कोंडाण्याला ।

पूजिलं शंभुभवानीला । घेतलं तीस आपल्या मदतीला ! ॥

निघतांना सांज लइ झाली । दौड परि केली ।

गांठली जाळी । राच्चं नौधाव्या घटकेला ।

काळोख सर्वामंदि भरला । घुबडांनीं गोंधळ लइ केला ॥

झुंजार बुरुज गांठला । येशीच्या शेंपटीला ।

लावुन सोलाला । बोलला तान्हा घोरपडीला ।

चित्ताला त्याच्या घोर पडला । पडलेला दूर तिनं हो केला ॥

’यशवंती ! सदा यश दिलस । म्हणुन ठेवलं ।

नांव तुझं भलं । देइ ग आज बी तेंच मजला ।

पुरविन तुझ्या कौतुकाला । घालिन खायला ग्वाड तुजला !’ ॥

असं म्हणुन सोडलं वर तिला । गेली सरसरा । आला पर फेरा ।

दैवाचा, बाई खालतं फिरली । पहिल्यांदा तिनं ही कच खाल्ली ।

असली ती गोष्ट कधिं न झाली ! ॥

चाल

मग तान्हा बोलला रागानं येशवंतिला ॥

"आज इचार काय ग तूं हा केलास ?

असा कधिं नाहीं बघितला । अपशकुन आज मला झाला ।

पर आमचा देह कधिं मागं नाहीं परतला ॥

आणि एकदां सोडतो वर तुला । ततं चिकाट धरुन धीराला ।

नाहिंतर उडविल तलवार तुझ्या ग मुंडक्याला" ॥

घोरपड धांवली सरसरा । वर बसली पाहुनी थारा ।

मग तान्हा झाला सामोरा । त्यानं घट्ट धरलं सोलाला ।

हिस्का मारुन् पाहिलं दोराला । सरसर चढाया लागला ।

जीवाची फिकीर नाहिं त्याला । ’चला या हो’ बोलला लोकाला ।

झरझरा मावळा चालला ! वर भगवा झेंडा चालला ! ।

झट्‌कनं तान्हा झुंजार-बुरजावर गेला ! ॥

अक्षि वायसा सुद्धां गलबला । मावळ्यांनी बघावा नाहीं केला ।

तत मांसारक्ताचा काला । मावळ्यांनीं बघावा लई केला ।

असा धुमाकूळ माजला । तंवा कळल त्येंच्या लोकाला ।

खडबडून जागा मग झाला । मोंगलभाई बोलला ।

’सैतान किल्ल्यावर आला’ । ’या कोणि राखा आम्हाला ’ ।

चाल

आतां कोण कसला येणार । तुजला राखणार ।

ताना घेणार । नरडिचा घोट होउनि लाल ।

केल्या पापाच फळ भोगाल । आला या मर्तभूमिवर काळ ॥७॥

चौक ८

अशी कत्तल करुनि सरसरा । सांठवुनि शिरा ।

करुन मलमाला । आईच्या तान्हा लावि हृदयास ।

आला हो आला पूर शौर्यास । देखिलं त्यानं उदयभानास ॥

"हरहर महादेव" बोला । आला ऊत भला ।

खोर्‍यामदिं भरला । भानाला तान्हा सिंहापर खास ।

थरथरे काळ पाहुनी ज्यास । धांवला तो पारतंत्र्य चिरण्यास ॥

उदयभान वीर खळवळे । लाल झाले डोळे । तान्हा मग बोले ।

भानुला, देहभान नुरे त्यास । धर्माचा लागे त्याच्या मनीं ध्यास ।

भानुच्या उदयिं गुंतली आस ॥

चाल

"तूं उदयभान सरदार । रजपूत जातिचा वीर ।

तू हिंदुधर्मा आधार । तू हिंददेशा आधार ।

रामकृष्ण तुमचे पूर्वज होते नरवीर ॥

गायिवासरं पाळुनी कृष्ण झाला लइ थोर ॥

आज शिवानं घेतला अवतार । त्यास यश खास येणार ।

तू मातिमोल होणार । घरची बाईल ओढुन नेती ।

टकटका बघाया लावती । चरचरा गाय कांपिती ।

घटघटा रगात पिती । आमचं देव समदं फोडिती ।

धर्मास दुष्ट तुडविती । तोंडांत मांस घालती ।

साधुसंता त्रास लई देती । बायकाच्या अंगा झोंबती ।

त्यांची करणी सांगावी किती ? । अभिमान गेला शौर्याची झाली बघ माती ! ॥

चाल

तूं शूर मर्द सरकार । धर्मा आधार ।

जातिशीं वैर । साधुनी जाशि घोर नर्कांत ।

येउं दे आंर्यतेज अंगांत । होईल कीर्ती तिनही लोकांत ॥८॥

चौक ९

उपदेश गेला परि वाया । सत्तेची माया ।

सूडाची छाया । पसरली उदयभानावर खास ।

मोगलाचा धरला त्यानं विश्वास । जोरानं धांवला वार करण्यास ॥

तानाजी सिंह खवळला । धावुन गेला ।

पट्टा लइ फिरला । युद्धाला आला रंग अनिवार ।

बिजलिची करणी करित तलवार । दोघेही होते मोठे लढणार ॥

दैवाची करणी परि न्यारी । फिरला माघारी ।

देव कंसारी । भानानं केला तान्यावर वार ।

डाव्या हाताला रक्ताची धार । लागली; पडली भूमिवर ढाल ॥

गुंडाळून हाताला मुंडासा । झाला कसाबसा ।

सज्ज, परि फांसा । दैवानं घातला, कोण काढणार ? ।

दैवाला दया न कधिं येणार । भाळीं जें लिवलं तसंच घडणार ! ॥

तो धैर्यमेरु उमळला । धरणीला आला ।

झाला जीव गोळा । सोडुन देह गेला स्वर्गास ।

भानानं हाणली लाथ डोक्यास; । पापाची भरली त्याच्या घडी खास ॥

चाल

इतक्यांत टोळी घेऊन सूर्या वर आला ॥ त्येनं पाहिलं पळत्या लोकाला ।

त्येनं पाहिलं पळत्या मावळ्याला । "कुठं जाता ?" बोलला तो त्याला ।

सूर्याला मावळा बोलला । ’अहो ताना पडला धरणीला मोठा घात झाला’ ।

डोळ्यांत अश्रु दाटला । पर मोठा धीराचा तो पडला ।

तलवार रोंखुन बोलला पळत्या लोकांला ॥ "अर भित्र्या लोकांनो ?

जरा । ईचार मनामंदी करा ! । अर लढुनशान तरि मरा ।

इथनं पळुनशान जाऊन अमर काय झाला ? ॥

जो भ्याड पळपुटा झाला । तो खास गेला नर्काला ।

ठेवावं खालतं भाल्याला । नेसावं चोळीलुगडयाला ।

कमरेच्या सोडून शेल्याला । नेसावं बायकी शालुला ।

डोक्याला लावुन कुंकवाला । हातात भरुन बांगडीला ।

मग पळुनशान जाऊन राखा जीवाला ॥ काय आल्या धरुन दोराला ।

जाणार सांगाव मला ? । तो दोर तुमच्या आधींच झुंजुन मेला ! ॥

लइ जपुनशान जीवाला । कायमचं काय राहिला ।

इथनं जाउन्‌शान गांवाला । सांगाल काय राजाला ? ।

’हर हर महादेव’ बोला । चला घुसूनशान् उडवुया लाख मुंडक्याला" ॥

चाल

धन्य ! धन्य ! सूर्याजीराव ! उतराई व्हावं ।

कशानं सांगावं । भावाचं दुःख लोटुनी पार ।

देण्याला जीव झाला तय्यार । घेऊन याल कधीं हो अवतार ! ॥९॥

चौक १०

पुन्हां सारा उलटला भाला । मावळा एक झाला ।

केला मग हल्ला । मोंगलाची झाली तारपिट फार ।

पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार । घेण्याला लावली त्यांना माघार ॥

मामाची झुंज लागली । भानाशीं भली ।

घालुन खालीं । भानुला धाडलं घोर नर्कांत ।

फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत । प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥

वृत्तांत सारा घडलेला । कळला राजाला ।

लागली डोळ्यांला । पाण्याची धार, गेला आधार ।

शिवबाला तान्हा प्राणापर प्यार । दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥

हुंदक्यानं आला उमाळा, । शिवबा बोलला ।

"हाय ! घात झाला । ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।

सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! । दैवाला नाहिं दया लव खास ॥

चाल

स्वातंत्र्यदेविच्या गळ्यामधुन मणि गळला ॥

काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥

तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला ! ॥

माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।

ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला ! ॥

पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥