Get it on Google Play
Download on the App Store

वीरमणि बाजीप्रभु देशपांडे

धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार ।

धन्य तो शूर । धर्माच्या कामीं जो जो मरणार ।

त्याच्या जयनाद जो जो होणार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥

चौक १

अफझुल्लाला ठार केल्यावर । झालं विजापूर ।

भीतिनें गार । शाहा मग झाला मोठा बेजार ।

फार मोठं झालं त्याला शेजार । जडला जणूं घोर त्याला आजार ॥

सारे अमीर करिती विचार । आतां जाणार ।

गांव विजापूर । लौकर सैतानाच्या कबजांत ।

होणार सारा घोर आकांत । साधावा कैसा त्याचा हो घात ॥

अफझुल्लाचा मुलगा फाझलखान । झाल हैराण ।

सुचेला त्याला आन । सूडानं घेरलं त्याच्या हृदयास ।

येईना झोंप, झाला कडु घांस । अंगाचं आटलं त्याच्या लइ मांस ॥

सदा झाला शिवराया काळ । लागली तळमळ ।

परि तो दुर्बळ । एकला काय शिवाला करणार ।

सिंहाला कोल्हं कसं हो धरणार ? । मुंगसाला साप काय करणार ?॥

चाल

एके दिवशीं अफझुल फाजलाच्या स्वप्नामधीं आला ॥

बापाला आपल्या पाहून फाजल दचकला ! ॥

अफझुल्ला तवा बोलला आपल्या लेकाला ॥

"ऊठ कारटया ! काय निजलास ? ।

गोड लागतो काय रे तुला घास ? ।

नेभळट पोरटया ! झालास । गनिमानं शीर कापून टांगलं किल्यास ॥

तंवा फौज घेऊन तयार लेका ! होतास ॥

ततून मूर्खा ! पळून जाऊन राखलं जीवास ॥

मरणाला भित्र्या ! भ्यालास । चल त्याचं मुंडकं आणून टांग वेशीस" ॥

असा झाला फाजलाला भास । विसरला देहभानास ।

ताडकन उठून तलवार लावली कमरेस ॥

खदखडा दार उघडून गांठलं वेशीस ॥ वेशीच्या वरच्या वाशास ।

टांगलेलं होतं लइ दीस । रामरायाचं मुंडकं; मग त्यास ।

तलवार मारुन बोलला तंवा कवटीस ॥ "झालं सरलं आतां तुझ दीस ।

तू पड आतां धरणीस । टांगीन इथं शिव्याचं मुंडक मी खास ॥

चाल

असं म्हणून फिरला माघारा । गेला झरझरा ।

आपल्या घराला । रात्र ती झाली ती कष्टमय फार ।

सूडाचा झाला त्याचा निर्धार । ऐकावा पुढचा सारा प्रकार ॥१॥

चौक २

दुसरे दिवशीं गेला दरबाराला । बोलला आदिलशाला ।

"गप्प काय बसला ? । आला सैतान विजापूरला ।

समजावा नाश सकल झाला । त्याचा काय बंदोबस्त केला ? ॥

पाचोला जसा वार्‍याला । रान वणव्याला । दिवटी सूर्याला ।

आदिलशहा तसा शिवाजीला । झाला काय सांगा राव ! मजला ।

पाहिजे आपला विचार कळला ॥ दरबारी थोर अमीर ।

भले झुंजार । पाठवूनि चूर । शत्रुचा करा आज सरकार ।

नाहींतर आपला नाश होणार । शाहिचं चांगलं दिवस सरणार" ॥

आदिलशाह घाबरुन गेला । बोलला फाझलाला ।

"शिद्दी जोहराला । घेऊन करा तुम्ही त्याला ठार ।

नंतर करुन मोठा दरबार । थाटानं देऊ तुम्हां तलवार" ॥

चाल

फाजलखान शिद्दी जोहार झाले तय्यार ॥

मेजवान्या त्यांना थाटाच्या झाल्या घरोघर ॥

त्यानीं फौज घेतली भरपूर । दारुगोळा केला तय्यार ।

किती घोडा होता गणतिला नाहीं हो पार ॥

घोडयांना घातले अलंकार । पायात्‍नं बांधले घुंगुर ।

डोक्याला लावले पिसार । मग वरती चढले खोगीर ।

त्यावर बसले रणशूर । बडे बडे होते अमीर ।

ते सारे झाले तय्यार । हातात नंगी तलवार ।

अशी फौज चालली गनिमाला कराया ठार ॥

जंवा जातां जातां तळ देती । तवा ऐका, काय काय करिती ।

मोठमोठे डेरे लावती । गांजाचा नाद हो अती ।

अक्षि पिऊन झिंगुन जाती । मग नाचरंग चालती ।

त्यांचा थाट सांगावा किती ! त्यांना दाणा वैरण किती ।

लागे त्याला नाही गणती । गरिबांना धाक घालिती,

त्यांच्या गंज्या काढुनी नेती । नाहींतर पेटवूनी देती ।

लोकांच्या घरोघर जाती, गाइवासरें धरुनी कांपिती ।

बायकांना ओढुन नेती । त्यांचीं घरं संम्दीं धुंडिती ।

पैसा अडका लुटून नेती । मग हातीं दिवटी घेऊन आगी लावती ! ॥

जवा लोक रडाया लागती । तवा सारे ’खो खो’ हांसती ! ॥

त्यांच्या तोंडात फेंकती माती । इरसाल शिव्या मग देती ।

जर कोणी अंगावर येती । तर त्यांना दोर्‍या बांधिती ।

आधीं त्यांचीं नाकं कांपिती । लोखंडी सळ्या मग घेती ।

लाल भडक त्यांना करिती । मग डोळ्यामध्नं खुपसती ।

मग हातपाय तोडती । असे हाल करुन मारिती ।

नाहींतर सुन्ता करुन भाई बनविती ॥

चाल

मराठी राज्याची कळी । नवी उमलली ।

तिच्यावर आली । टोळांची धाड, काय होणार ।

कळेना काय काय घडणार । दैवाचे खेळ कसे हो कळणार ! ॥२॥

चौक ३

ही वार्ता कळली शिवाला । सावध झाला ।

गेला पन्हाळयाला । करुन बंदोबस्त सगळा ।

किल्ल्यावर दारुगोळा चढला । तय्यार सारा लोक झाला ॥

नुकत्याच प्रतापगडाखालीं । झालेल्या भारी ।

लाल तलवारी । पुन्हा पन्हाळगडावरती दिसल्या ।

वीरांच्या हातामध्नं रमल्या । तहानेनं व्याकुळ लइ झाल्या ॥

सूर्याच्या किरणांनीं सारे । चमकले भाले ।

तय्यार झाले । चिरण्याला कंठनाळ सगळे ।

डोक्यावर जिरे टोप चढले । हातांत धनुर्बाण आले ॥

अन्नाचा पुरवठा केला । तय्यार झाला ।

तोंड देण्याला । यवनाला मराठयांचा गोपाळ ।

यवनाला मराठयांचा भूपाळ । यवनाला हिंदधर्माचा लाल ।

यवनाला हिंददेवीचा बाळ । काळाचा काळ्याकुट्ट कळिकाळ ॥

’शिवराय पन्हाळगडावर’ । ऐकून सुभेदार ।

शिद्दी जोहार । फाजलखानासकट तिकडं वळला ।

झटकन किल्ल्याखालीं आला । किल्ल्याला त्यांचा वेढा बसला ॥

चाल

नेताजी पालकर शूर । त्यानं केलं शिद्दीला जेर ॥

परि फौज होती भरपूर । म्हणून होता शिद्दीला जोर ॥

चौक्यांचा पहारा चौफेर । चहुंकडे ठेविले हेर ॥

करि नाच नंगी तलवार । रक्ताला झाली आतुर ॥

चाल

झाले चार महिने तरी होता शिद्दी जोहार ॥

वेढा काढुन जाईना; मग केला शिवानं विचार ॥

नेताजी, बाजी रणगाजी जमविले वीर ॥

मग त्याना बोलला शिवबा जें ऐकावं सारं ॥

"किती दिवस असें हे चालणार ? । दोन वर्सं वेढा बसणार ।

एक वर्स अन्न पुरणार । मग अन्नपाणि सरणार ।

तंवा उपासमार होणार ॥ यवनांच्या पाया पडणार ।

कां आतांच कांही करणार ? ॥" मग बोलले शूर सरदार ।

"कांहीं तोड आतांच काढून व्हावं हो पार" ॥

असा त्यांचा बेत जंवा झाला । तंवा राजा शिद्दीकडं गेला ।

ऐका जी काय बोलला । "तुमचं पडलं फार भय मला ।

द्यावं जीवदान हो मला । घ्यावें पदरीं दीन लेंकराला ।

शहाचा मी अपराध केला । म्हणून आतां पश्चाताप झाला ।

देतों मी त्याच्या मुलखाला । हा किल्ला ठेवा पण मला ।

हा दास शरण तुम्हांला" । असं बोलला सुभेदाराला ।

शिद्दीला आनंद झाला । मग बोलला शिवरायाला ।

"जीव दान आतां तुला दिला । पर किल्लाप पाहिजे आम्हांला ।

तो नाहीं मिळणार तुला" । जर दादा द्यावं चित्ताला ।

सांगीन आतां तुम्हांला । शिवराय फिरुन शिद्दीला काय बोलला ॥

"सुभेदार थोर तुम्ही झाला । अन् किल्ला नाहीं म्हणता कां मला ! ।

द्यावं आतां एवढं पोराला । द्यावं एवढं वचन लेंकराला ।

आज काय तो विचार तुम्ही करा । पुन्हां उद्यां येइन भेटीला ।

तवा काय तें सांगावं मला" । असं बोलून डाव करुन किल्ल्यावर गेला ! ॥

चाल

आनंद फार तंवा झाला । शिद्दी जोहारला ।

धरुन दाढीला । बोलला "अल्ला ! डाव केला ।

काफर खास आतां धरला" । पण त्याचा कावा कायरे कळला !! ॥३॥

चौक ४

समेटाचा बहाणा असा केला । गाफिल झाला ।

पहारा, ढिला पडला । दारुला आला ऊत अनिवार ।

झिंगून गेले अमीर सरदार । खरोखर वेडा शिद्दी जोहार ॥

जो हार सिद्धिचा झाला । रामीं रत झाला ।

तो कां जोहाराला । करील राव जी ! सांगा जोहार ।

जाईल काय त्याला शिव हार । ज्याला सारी हार जाणार हार ॥

जोहार बोलला आपणाला । "यंव रे उंदराला । पिंजर्‍यांत धरला; ।

घेऊन जातों विजापूरला । पठयानंच त्याला कैद केला ।

दुसर्‍यांना डाव नाहिं जमला" ॥ फाजलखान बोलला आपणाला ।

"सूड पुरा झाला ॥ कापुन शिवाजीला । वेशीला हा मर्द मुंडकं टांगणार ।

बापाचं देणं सारं फेडणार । मोठा मग मानकरी मी होणार ! ॥

चाल

आशेचा असा डोलारा । फाजलान मनांत उभा केला ।

विसरला देहभानाला । दारुनं झिंगुन गेला ।

इकडे विचार काय मग झाला । शिवाजीनं काय बेत केला ।

ऐकावं सांगतों तुम्हाला । हेरानं आणलं खबरेला ।

लगबगीनं बोलला राजाला । "महाराज ऐका वचनाला ।

आज पहारा ढिला लई झाला । जवा गेलो होतो फिरण्याला ।

झोंप आली होती पहार्‍याला । अर्धंमुर्धं होतं जागेला ।

त्यांचें बोलणें आलं कानाला । त्यांचं म्हणणं दिसलं हो मला ।

आज गनिम हातीं लागला । कां वेर्थ घ्यावं तसदीला ? ।

अन्‍ त्रास द्यावा आपल्या जीवाला ? । लई दिवस राच्‍च जागुन वेडा जीव झाला ॥

आतां पहारा सारा झोंपला । चौकीवाला जोरसे पेंगला॥

अशी बातमी घेउन आला । हा दास आपल्या चरणाला ।

पुढचं सांगणं नाहीं ठावं मला । तें आपलें ठावं आपणाला " ।

असं बोलून बातमी देऊन हेर तो गेला ॥ शिवाजीनं काय बेत केला ।

निवडक घेतला लोकांला । अन्‌ किल्ल्याखालीं चालला ।

दादा ! किल्ला सारा उतरला । चहूंकडं काळोख झाला ।

पर कळलं नाहीं कोणाला । रात्रीला घोर लागला ।

चहूंकडं काळोख झाला । जंवा कृष्ण जन्म बघा झाला ॥

तंवा भूल पडली पहार्‍याला । टोपलींत घालुन लेंकराला ।

वसुदेव वाडयांतून आला । तरी कळलं नाहीं कोणाला ! ।

यमुनेला उतार झाला । तवां पार पलीकड गेला ।

असं लहानगं बाळ घेऊन गोकुळांत गेला ॥

थेट तश्शी भूल पहार्‍याला । बघा पडली !

एक योग झाला । म्हणून कृष्ण म्हणावं शिवाला ।

शिव कृष्णरुप हो झाला । भेदभाव नाहींसा झाला ।

चौकीवाला घोरुं लागला । सारा पहारा गारद केला ।

शिवाजी पुढं मग गेला । जितका त्याला पहारा भेटला तितका गार केला ॥

रक्ताचा पाट चालला । पर कळलं नाहीं कोणाला ।

पिंजर्‍यांतून पक्षी उडाला । करा जागं आता शिद्दीला ।

बघ म्हणावं बेरकी उंदराला । करा जागं आतां फाजलाला ।

बघ म्हणावं आतां काफराला । हातावर तुरी देऊन तुमच्या हो गेला ॥

चाल

गर्वाचं घर सदा खालीं । असं लिहिलं भाळीं ।

सत्याचा वाली । सदा प्रभुराय झाला गोपाळ ।

पार्थालाच घातली कीर्तीनें माळ । खळाचा नंद बाळ हा काळ ॥४॥

चौक ५

दोन घटका गेल्यावर झाला । मोठा गलबला ।

जो तो म्हणे "अल्ला ! । गारद केला सारा पहारा ।

रक्तानं रस्ता सारा भरला । देखो सैतान पार झाला" ॥

तंवा आला शिद्दी जोहार । रक्ताचा पूर । पाहून झाला गार ।

चित्तावर आली दुःखाची खार । राग पर त्याचा झाला अनिवार ।

म्यानांतून ओढली तलवार ॥ फाजलखान झाला बेफाम ।

सुटला त्याला घाम । जिरला सारा जोम ।

म्हणे ’क्या हुवा अल्ला ! गेला ’ ! । अल्ला काय सांगणार तुजला ? ।

त्याचा तुला कावा नाहीं रे कळला ॥ मग जोडणी केली लवकर ।

चालले हो स्वार । बारा हजार । पाठलाग केला त्यांनीं जोरदार ।

फौजेवर होते दोन सरदार । फाजल आणि सिद्दी अजीज सुभेदार ॥

चाल

पुढं धावे सूर्य, पाठीमागें केतु असुर ॥

पुढं धावे चंद्र, मागं लागला जणूं राहु चोर ॥

पुंढ धर्म, मागं अधर्म धावतो स्वैर ॥

पुढं नीति, मागं अनीतीचा लागला विचार ॥

स्वातंत्र्य पुढें, मागं लागे दास्य चिरकाल ! ॥

चाल

रात्रिनं काळोख केला । दिसेना कांहीं कोणाला ।

चांदण्यांनीं नाच बंद केला । आभाळांतुन चांद निघाला ।

शिवाच्या डोईवर आला । त्यांनीं कां हो नाच बंद केला ।

असं म्हणतां ? सांगतों तुम्हांला । शिव घोडयावरती स्वार झाला ।

अन्‌ चालला दौड विशाळगडाला । त्याच्या भाळीं चंद्र शोभला ।

पाहवेना हें दैत्य राहूला । चंद्रला आतां गिळण्याला ।

शिवामागं राहू लागला । पाहवेना त्यांना हा घाला ।

म्हणुन त्यांनीं नाच बंद केला । ढगाच्या ओढलं पडद्याला ।

अन्‌ सांगायला गेल्या सूर्याला । काय बोलल्या ऐका सूर्याला ।

"असा असा प्रकार झाला । आमचा पती पृथ्वीवर गेला ।

त्याच्यामागं राहू लागला । त्याला सोडवायला हो चला" ।

इकडं काय प्रकार झाला । ऐका जी सांगतों तुम्हांला ।

भर रात्रीं घोडा फेकला । झाले चार तास हो त्याला ।

वारा मंद वाहूं लागला । पहांटेचा सुमार झाला ।

विशाळ गड दिसूं लागला । तीन कोस किल्ला राहिला ।

आनंद झाला शिवाला । काय बोलला ऐका लोकांला ।

अंबेनं कृपा करुन तारलं आम्हांला ॥ आतां राहिलं नाहीं भय मला ।

आवाज कसला पण झाला ? । ’टप्‌ टप्‌ टप्‌’ हं ! आला ! आला !

शत्रू पाठीवर आला । चला मारा टाचा घोडयाला ।

चला गांठलं पाहिजे किल्ल्याला" । प्रसंग जीवावर आला ।

पुन्हा घोडा दौड धांवला । घोडयांना फेंस बघा आला ।

फाजलखान पाठीवर आला । जीव सारा कासाविस झाला ।

पर शिवा नाहिं बघा भ्याला ! । पुढल्या चौकी सांगिन पुढचा प्रकार जो झाला ॥

चाल

आली आणीबाणीची वेळ । युद्ध जंजाळ ।

रक्तबंबाळ । झाल्यावर कोण कोण मरणार ।

झाल्यावर काय काय घडणार । आपणाला सांगा कसं हो कळणार ? ॥५॥

चौक ६

जवां तांबडं फुटलं पूर्वेला । गनिम शिवाजीला ।

येवून तवा भिडला । परि रात्र नाहिं शिवा डरला ।

तय्यार झुंजण्याला झाला । थोरांना जीव करेकचरा ॥

त्याला नव्हतं जीवाचं भय । होता निर्भय ।

वाटलं पर भय । दुसर्‍यांना शिवा प्राणाहून प्यार ।

राज्याचा तेवढा एक आधार । अंबेच्या कंठामधला प्रिय हार ॥

देशाच्या ऐकाजी काजीं । नित्य तो राजी ।

तोच रणगाजी । बाजी प्रभु देशपांडे सरदार ।

चित्ताला होता मोठा दिलदार । शौर्याचा मूर्तिमंत अवतार ॥

चाल

पाहुन असला घोर प्रसंग बाजी पुढं झाला ॥

स्वातंत्र्यवीर रणगाजी बोलला शिवाला ॥

"महाराज ! विनवि तुम्हांला । ऐकावं माझ्या शब्दाला ।

शत्रु हा हांकेवर आला । ही खिंड भली हो मला ।

इथं राहुन धरतो शत्रुला । चार लोक धरती हजाराला ।

द्या संधी येवढी दासाला । करामत दावतों तुम्हांला ।

तवर आपण किल्ल्याकडं चला । आपणासंग घ्याव फौजेला ।

पाचपन्नास ठेवावं मला । जीव चरणीं आपल्या वाहिला ।

जंवर जीव नाहिं रणिं गेला । तवर धोका नाहीं तुम्हांला ।

फेका दौड आता घोडयला । बोलण्यांत फार वेळ गेला ।

आपण आमचा देव दुजा नाहिं देव आम्हांला" ॥

ऐकून अशा बोलला । शिवाचा गळा दाटला ॥

चाल

भर आला त्याच्या हृदयाला, पाहून प्रेमचंद्राला ॥

पाण्याचा लोट खळखळला, उसळून बाहेर आला ॥

चाल

शिवाला आला कळवळा । काय बोलला ऐका ! बाजीला ॥

चाल

"लोक काय म्हणतिल मला,

देवून तोंडाला, एका बाजीला, निष्ठुर गेला ।

कशि दया नव्हती हो त्याला ॥

जसा जीव प्यारा हा मला, तसाच तुम्हांला;

सांगूं कसं बोला, जीव देण्याला ।

आग लागो माझ्या तोंडाला ॥

शत्रूंचा वणवा पेटला, जाळत आला, जाळूं दे मला,

मरण देहाला खास, मग त्याला ।

जपणूक कशाला बोला ?" ॥

ऐकोनि राजवचनाला, बाजीला शोक बहु झाला ॥

तो वीर फिरुन शिवाला, ऐकावं काय बोलला ॥

चाल

"हा जीव प्यारा हो मला, म्हणून देहाला टाकून धरणीला, जातो स्वर्गाला ॥

द्या संधि एवढी दासाला ॥ ज्याला मृत्यु लाभला रणीं,

धर्माकारणीं, त्याची हो जनीं, धन्य ही काया । द्या संधि येवढी दासा या ॥

चाल

विजापूरचा होतों नोकर । तंवा केलं पाप मी फार ।

पण आला योग लवकर । झाली भेट विशाळगडावर ।

आपण केला सारा मोह दूर । चरणांचा घेतला आधार ।

बेईमान होतों मी फार । आज डाग धुवून काढणार ।

आपण जावं आतां लौकर " । शिवबानं केलं उत्तर ।

"तुम्हांसाठीं जातों लौकर । जवां जाईन विशाळगडावर ।

पांच तोफा सोडीन सत्वर । मग समजा झालों मी पार ।

असं म्हणून चालले शिवराय होउन स्वार ॥

चाल

मग बाजी झाला तय्यार । रोखून खिंडार ।

नंगी तलवार । हातामधिं, झाला रुद्र-अवतार ।

सांगिन जी पुढं पुढचा प्रकार । सहाव्या चौकाचा झाला आकार ॥६॥

चौक ७

शिवबांची घोडी कल्याणी । सदा जयदानी ।

घोडयांमधिं राणी । खडकाळ डोंगरामधुनी ।

तशीच मैदानी जशी काय हरणी ।

टाण् टाण् करुनि धांवतांना पाहिली यवनांनीं ।

’इस्कु पकडो’ म्हणुनि । चाल केलि त्यांनी ॥

चौफेर घोडे सुटले । खिंडींतून आले ।

बाण सळसळले । सणणणण करुन अंगीं घुसले ।

घोडे धडधडा खालती पडले । घोडेस्वार थंडगार झाले ! ॥

बाण येती कुठून समजेना । डसती घोडयांना ।

धांवत्या सांपाना । जशा काय झडपा घालती हो घार ।

झाली निम्मी फौज त्यांची थंडगार । रागाने झाले लाल सुभेदार ॥

पाठलाग तसाच करण्याला । जोरानं आला ।

फाजल खिंडीला । परि त्यानं पाहिलं बाजी प्रभुला ।

तीस जण घेऊन राहिला तोंडाला । खिंडीचा रस्ता बंद झाला ॥

जसा राम दिसला रावणाला । कृष्ण कंसाला ।

भीम कीचकाला । बाजी प्रभु तसा फाजलाला ।

दिसला पर जोर त्याला चढला । बाणांचा त्याला सुगावा लागला ॥

बाजीच्या लहानग्या टोळीला । पाहुन फाजलाला ।

हर्ष फार झाला । कां हो ? त्यांचं सैन्य होतं अनिवार ।

इकडं पांच पन्नास बाजीचे स्वार । तिकडं फाजलाचे बारा हजार ! ॥

चाल

फाजलानं केला मग हल्ला । बाजीहि तय्यार झाला ! ।

रणरंग खिंडीला आला । कवटाळी वीर मरणाला ॥

चाल

आली झुंज हातघाईवर । झुलती तलवार ।

ऐकमेकां मार । देती; धुमाकुळ झाला अनिवार ।

शत्रुवर करती जोराचे वार । जिकडं तिकडं झाला एक प्रकार ॥

किती होते मिसळले नाद । देऊ कशी याद ?

उठता पडसाद । खिंडींतून दाद नाहिं कवणा ।

तय्यार सारे वीर मरणा । ठेवील कोण त्यांची गणना ॥

चाल

कोण राम राम बोलती । देवांना हांका मारती ।

कोण धायधाय रडताती । तळमळुन देहांतून कोण प्राण सोडती ॥

कोणाची नाकं ठेंचती । डोळ्याची बुबळं लोंबती ।

छातित्‍नं भाले खुपसती । जसे मासे जळीं चमकती ।

आकाशीं विजा चमकती । तलवारी तशा लखलखती ।

रक्ताचे पाट वाहती । डोक्यांच्या कपर्‍या ऊडती ।

कोणाचे हात तूटती । बेशुद्ध कैक रक्ताच्या पाटामधिं पडती ॥

निकराचे हल्ले चढविती । ’हर हर महादेव’ असें कैक बोलती ॥

’दीन दीन’ यवन बोलती । किती अर्धमेले बरळती ।

हाणा मारा कापांचा भरला नाद हो अती ॥

शिरकमळं अंबेच्या पायीं वीर वाहती ॥

दशदिशा दणाणुन जाती । तलवारी भाले चमकती ।

एकमेकां घासुन ठिणग्या लाल निघताती ॥

वर मुंडकी उंच उडताती । जणू अंबाबाई चेंडवांचा खेळ खेळती ॥

ऐका जी त्याच वेळेला । विजयश्री आली बघण्याला ।

तिनं हातीं धरलं माळेला । ’माळ घालूं आतां कवणाला’ ।

अशि चिंता पडली हो तिला । जगदंबा बोलली मृत्यूला ।

काय ऐका सांगतों तुम्हांला । "आली विजयदेवी वरण्याला ।

अशी वर्दी द्यावी बाजीला । आणि करावा थाट चांगला" ॥
"ठीक ! करतो" मृत्यु बोलला । आणि थाट कराया लागला ।

लाल रंग खिंडीला दिला । रक्तांचा सडा घातला ।

धडांचा कारंजा केला । मांसाचा गालिचा केला ।

हाडकांच्या नक्षी काढल्या । दातांच्या कवळ्या पसरल्या ।

मुंडक्यांच्या केल्या त्यानं माळा । अंबेची वर्दी बाजीला ।

जंवा कळली चेव तंवा आला । जसा वारा उडवी भुश्श्याला ।

तसा बाजी उडवी शत्रुला ॥ रक्ताच्या धारा अंगाला ।

त्याच्या लागल्या, नाहीं पर भ्याला ! । जसा पळस प्रफुल्लित झाला ! ।

त्यानं केलं जेर यवनाला । पर ताजी फौज मदतीला ।

फाजलाच्या आली जोर झाला । म्हणून पुन्हां आला बाजीवर हल्ला ॥

चाल

विजापुरचं आलं पायदळ । फिरुन परतलं ।

सारं घोडदळ । निकराचा हल्ला केला त्यांनीं फार ।

बाजी पर होता मोठा बाणेदार । हल्ला हटवायला झाला तय्यार ॥७॥

चौक ८

आयुष्य सरतं घडोघडीं । काळाजी उडी ।

आल्यावर मढी । पडती; कुडी खास एकदां पडणार ।

पळभर उशीर नाहिं खपणार । जर मरण खास तर प्राण्या !

कसा मरणार ? । जो मर्द मानव झाला । सोडी जीवाला ।

रणांगणिं; त्याला कीर्ति वरणार ॥ पुन्हां चढला बाजीला जोर ।

दिलाय त्यानं मार । केला थंडगार । यवन; तवा झाली होती दोन पार ।

भूमिला झाला मुडद्यांचा भार । अंगावर चालले होते तरी वार ।

जरि झाला शत्रुचा मोड । वाटेना तो गोड । काय अवघड ।

बाजीला झालं सांगतों तुम्हांला ॥ त्यानं पहिला मान फिरवून ।

किल्ला निरखून । नाहीं पर खूण दिसली हो त्याला ! ॥

तोफांचा जाळ दिसेना । म्हणून यातना । होत बघ नाना ।

वाटल त्याला झाला नाश कार्याचा । ज्यासाठीं देह खर्चिला ।

तोंच नाहीं झाला । पार मनीं लागला । घोर----शिवाचा ! ॥

ऐका हा नाद----झाला । कसला हो बोला ।

गोळीबार झाला ! । हाय गोळा आला । लागला वीराला ।

धाडकन पडला भूवर । बाजी रणवीर । जसा काय थोर वृक्ष उन्मळला ॥

चाल

’बाजी पडला ? हाय ! घात झाला’ शब्द हे झाले रणांगणावर ।

त्यानं खचला मावळ्यांचा धीर ।

जिकडं फुटली वाट तिकडं चालले सारे चौफेर ॥

जंवा पाहिलं बाजिन सारं । तंवा बोलला त्यांना रणवीर ।

"मेलों नाहिं मी, फिरा माघार । आणि चढवा हल्ला जोरदार ।

जर मराल स्वर्गाला जाल । जर जगाल सौख्य भोगाल !

जर पळाल, तर नरकाला जाल !! " ॥

चाल

ऐकून अशा शब्दाला, पुन्हां सारा उलटला भाला ॥

निकराचा केला मग हल्ला, हैराण शत्रु हो झाला ॥

मरणाचा विळखा बाजीला, हाय बसला कासाविस झाला ! ॥

चाल

त्याचं लक्ष होतं परि खिळलं विशाळगडावर ॥

बाजी पडला आतां मरणाच्या शय्येवर ॥

जणु भीष्म पहुडला रणीं रणशय्येवर ॥

जगदंबा आणि विजयश्री आल्या लौकर ॥

हातांत माळ घेऊन झाल्या तय्यार ॥

माळ घातली बाजीला, झालं दुःख परि फार ॥

त्याचि दृष्टि होती खिळलेली विशाळगडावर ॥

तोफांचा नाद कुठं गेला ? । बाजीचा गळा दाटला ।

बाजीला घोर लागला । जीव धरुन राहिला आशेला ॥

बाजीचा सरता काळ आला । कुठं गुंतली आस मग बोला ?

जंवर शिवबा पार नाहीं झाला । तंवर आशा राहिली जीवाला ॥

चाल

धूमधडाधडा धड-धडा । धडाडा ! असा तोफांचा नाद कानीं पडला ।

"झालों देवा धन्य !" बाजी बोलला । देहातुन जीव पार झाला ! ॥

धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार । धन्य तो शूर ।

धर्माच्या कामीं जो जो मरणार । त्याचा जयनाद जो जो होणार ।

शाहीर ’पांडुरंग’ गाणार ॥८॥