Get it on Google Play
Download on the App Store

कथा दुसरी

रात्र झाली. राजा सिंहासन ठेवलेल्या खोलींत शिरला. त्यानें हलकेंच दुसऱ्या परीचा सुवर्णपंख पकडला. त्याचबरोबर ती 'विजया' नांवाची सुवर्णपुतळी म्हणाली, 'राजा, मला हात लावूं नकोस ! राजा विक्रमासारखं मोठ मन असेल तरच या सिंहासनावर बस ! राजा विक्रमाच्या धवल किर्तीतले एक सुंदर आख्यान मी तुला सांगते ऐक --

एक दिवस विक्रम राजाचे दरबारांत एक दरिद्री ब्राह्मण आला. राजाने त्याचा आदरसत्‍कार केला व त्याला एक लाख सुवर्णमुद्रा दान म्हणून दिल्या.

तो दारिद्री ब्राह्मण खूष होऊन म्हणाला --

संग्रहेण कुलीनानां राज्यं कुर्वंति पार्थिवा: ॥
आदिमध्यावसानेषु न त्यजति च ते नृपन ॥

हे राजा, या पृथ्वीतलावर राज्य करणारे राजे कुलीन, विद्वान नररत्‍नें आपल्या आश्रयास ठेवूनच राज्य करतात आणि ते श्रेष्ठ पुरुषही आपल्या राजास कधीच सोडत नाहींत. अशाच एका राजाचा व त्याच्या पदरी असलेल्या एका श्रेष्ठ पुरुषाची कथा मी तुला सांगतो -- ब्राह्मण सांगू लागाला.

फार वर्षापूर्वी विशाल नगरींत राजा नंद राज्य करी होता. त्याच्या पदरी अनेक विद्वान लोक होते. नंद राजाच्या पट्टराणींचें नांव होते भानुमती. ही भानुमती अप्सरेसारखी सुंदर होती. फार गुणी होती त्यामुळे राजाला तिच्याशिवाय दुसरें कांहीं सुचतच नसे. राज्यकारभाकडे दुर्लक्ष होऊं लागलें. नंद राजाच्या शत्रुंनी ही परिस्थिती पाहिली व ते विशाल नगरीवर चालून येण्याचे बेत करूं लागले. राजाचा प्रधान चतुर होता.

एक दिवस तो राजाकडे गेला व त्यानें नम्रपणे राजाला सर्व परिस्थिती सांगितली. आपण राज्यकारभाराकडे लक्ष दिले नाहीं तर अनर्थ ओढवेल असेहीं सुचविले.

राजा म्हणाला, 'प्रधानजी, आपण म्हणतां ते खरे आहे, पण मी राणीला सोडून क्षणभरही दूर राहूं शकत नाहीं. यावर जर कांही उपाय शोधून काढाल तर --'

'महाराज, यावर उपाय आहे. एका उत्‍तम चित्रकाराकडून आपण राणीसाहेबांची तसबीर काढून घेऊ या. ती सारखी आपल्याबरोबर असली म्हणजे आपल्याला राणीसरकारचा विरह जाणवणार नाही.'

'करून बघूं या ! जा, चित्रकाराला आज्ञा द्या.' नंदरजा म्हणाला.

आणि कांही दिवसानी भानुमतीची तसबीर तयार झाली. तसबीर नंदराजाजवळ आणली त्यावेळी त्याचे गुरु शारदानंद तेथेंच बसले होते. राजानें ती तसबीर गुरूंचे हातांत दिली. शारदानंदानी ती निरखून पाहिली व म्हटलें, 'तसबीर भानुमतीची आहे असें वाटतें. पण तिच्या मांडीवर एक लहानसा काळा डाग आहे तो काहीं या चित्रात आलेला नाहीं.'

गुरूंचे हे भाषण ऐकून नंदराजाचा क्रोध अनावर झाला. आपला शृंगार गुरूंने चोरून पाहिला आहे अशी त्याची समजूत झाली. त्याला गुरूचा राग आला व त्यानें सेवकाना बोलावून गुरूला कैद केले. प्रधानाला हुकूम दिला -- 'याला अरणांत नेऊन ठार मारून टाक.'

प्रधानाला शारदानंदांची माहिती होती. हा श्रेष्ठ पुरूष अंतर्ज्ञनी आहे याबद्दल त्याची खात्री होती. त्या ज्ञानाचे जोरावरच त्यानें मांडीवरचा काळा डाग ओळखला होता; पण राजाला या क्षणाला हें पटणार नाहीं. तेव्हां याला आपण लपवून ठेवावें असें त्यानें ठरविले. गुरूहत्येचे पातक फार मोठे आहे ते राजाला लागू नये असा विचार करून प्रधानाने शारदानंदांना लपवून ठेवले व राजाला सांगितले, 'मी शारदानंदाला ठार केले.'

कांहीं दिवस गेले, एके दिवशीं युवराज विजयपाल अरण्यांत शिकारीसठी गेला होता. एका हरणाचें मागें लागून तो एकटाच खूप लांब गेला. शेवटीं ते हरीण डोंगरात दिसेनासे झालें. दमलेला राजपुत्र पाणी पिण्यासाठीं खाली उतरला. तेवढ्यांत एक वाघ समोरून येतो आहे हें पाहतांच तो गडबडला. हातांत शस्त्रही नव्हते. शेवटचा उपाय म्हणून तो जवळच्याच झाडावर चढला.

त्याच झाडावर वाघाची चाहूल लागल्यामुळे एक अस्वल येऊन बसलेले होते. हे दुसरे संकट पुढें आलेले पाहून राजपुत्राचे हातपाय गळाले. पण ते अस्वल मनुष्यवाणीने म्हणाले, 'तु घाबरु नकोस ! मी तुला वचन देते, मी तुझा घात करणार नाही.' आतां विजयपालला थोडा धीर आला. तो व अस्वल जवळजवळ बसून राहिले. भक्षाचा वास आल्यामुळें वाघही तेथून हलायला तयार नव्हता. तोही त्या झाडाखालीच उभा राहिला.

दमलेल्या विजयपालला झोप येऊ लागली. अस्वल मोठ्या प्रेमाने त्याला म्हणाले, 'तूं झोप, मी पहारा करते. तुला मी खाली पडूं देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव.'

अस्वलावर पूर्ण विश्वास बसलेला विजयपाल झाडाच्या खोडाला टेकून स्वस्थ झोंपला.

त्याला झोंप लागल्यावर वाघ म्हणाला, 'अस्वला, तूं व मी अरण्यांत राहणारे, म्हणून भाऊ भाऊ आहोंत. हा मनुष्य आपला शत्रू आहे. तूं याला हलकेच खालीं ढकलून दे म्हणजे माझी भूक शांत होईल व मी निघून जाईन.'

पण अस्वलाने उत्तर दिलें -- 'वाघा, तूं सांगतोस हें खरे असलें तरी मी या माणसाला माझा शब्द दिला आहे. मी विश्वासघात करणार नाहीं.'

वाघाचा नाइलाज झाला. मध्यरात्र झाली. विजयपालची झोप पुरी झाली. आता थकलेलें अस्वल झोपी गेले. वाघ खाली उभा होताच. तो राजपुत्राला म्हणाला --

नदीनां च नखीनां च श्रृंगीनां शस्त्रपाणिनाम ।

विश्वासो नैव कर्तंव्य: स्त्रीषु राजकुशलेष्वपि ॥

 

नदी, तीक्ष्ण नखं असलेली जनावरें, शिंगाचे पशु, हत्यारबंद माणूस, स्त्रिया व राजे यांचा कधीहि विश्वास धरुं नये असे नीतिशास्त्र सांग़ते म्हणुन तूं या अस्वलास खाली ढकलून दे. मी त्याला खाऊन निघून जाईन.

राजपुत्राला वाघाचें बोलणें पटले व त्यानें बेसावध अस्वलास खालीं लोटून दिले. पण अस्वल सावध होते. त्यांने खाली पडता पडता झाडाची फांदी पकडली. आतां विश्वासघात केलेला राजकुमार थरथर कापु लागला. अस्वल आपल्याला मारणार अशी त्याची पुर्ण खात्री झाली.

पण अस्वल म्हणाले, 'हे स्वार्थी प्राण्या, मी तुझ्या शरीराला कांहिही अपाय करणार नाही. माझी तशी इच्छाच नाही. पण तुला कांहितरी शिक्षा ही हवीच तुला 'ससेमिरा' याच शब्दाचे माझ्या शापामुळे वेड लागेल, आणि ही चार अक्षरे चार श्र्लोकांच्या प्रारंभी असलेले माझ्या मनांत असलेले चार श्र्लोक जर तुला कुणी ऐकवले तरच तुझे वेड जाईल. तेव्हां आतां घरीं निघुन जा.'

आतां पहाट झालीच असल्यानें वाघ व अस्वल आपापल्या घरीं निघून गेले. अस्वलाने दिलेल्या शापामुळे राजपुत्र विजयपाल 'ससेमिरा-ससेमिरा' असें ओरडत रानांत हिंडू लागला.

इकडे त्याचा घोडा नगरांत जाऊन पोहोंचला होता. घोडा एकटाच आलेला पहातांच व्याकुळ झालेला राजा त्याच घोड्यावर बसून विजय्पालाच्या शोधावर निघाला. रानांत त्याल एक वेडा दिसला. पण निरखून पहातांच, तो आपलाच पुत्र आहे हें राजानें ओळखलें. विजयपालाला घेऊन राजा घरीं आला. अनेक वैद्य, हकीम आले. खूप औषधोपचार केले, पण राजपुत्राला गुण येईना. उलट 'ससेमिरा' ह्या नावांचे वेड वाढतच चालले. खिन्न झालेला राजा प्रधानाला म्हणाला, 'आज माझे गुरु शारदानंद असते तर त्यांनी याला बरे केले असते.' प्रधान गांवात दवंडी देऊन बघू या - शारदानंदांसारखा एखादा विद्वान कदाचित युवराजांना बरें करूं शकेल.'

बुडत्याला काडीचा आधार वाटतो त्याप्रमाणे राजाला या सूचनेनें थोडा आधार वाटला. त्यानें ताबडतोब दवंडी देण्याचा हुकुम सोडला. इकडे प्रधान घरी आला व शारदानंदांना नमस्कार करून त्यांने सर्व हकीकत सांगितली.

शारदानंदांनीं समाधी लावली. अंतर्ज्ञानानें त्यांना राजपुत्राची सारी हकीकत समजली. थोडा वेळ गेला. गुरुनें डोळे उघडलेले पाहतांच प्रधानानें परत प्रणाम केला. हंसतच शारदानंद म्हणाले, 'वत्सा, तूं राजाला जाऊन सांग़, माझी कन्या फार चतूर आहे. ती राजपुत्राला बरें करील. मात्र ती पडदानशील असल्याने आंतच राहून बोलेल.'

झाले ! प्रधनानें निरोप सांगितल्यानंतर सर्व व्यवस्था करण्यात आली. 'ससेमिरा' या नांवाचा जप करणाऱ्या विजयपालला तिच्यासमोर आणून बसविलें. पडद्याच्या आंतून आवाज आला --

सदभावप्रतिपन्नां वंचने का विदग्धता ।

अंकभारुह्य सुप्तानां हंतु: किं नाम पौरुषम ॥

हे युवराजा, तुझ्यावर ज्यांने पूर्ण विश्वास ठेवला त्याचा विश्वासघात करण्यांत कोणते चातुर्य आहे ? आपल्या मांडीवर विश्वासानें मान ठेवलेल्याचा प्राण घेण्यांत कोणता पराक्रम आहे ?

हा श्लोक ऐकतांच राजपुत्र थोडा सांवरुन बसला. त्यांने 'स' हे अक्षर सोडून दिले व तो 'सेमिरा' असें बडबडू लागला. तेवढ्यात आंतून परत आवाज आला --

र्सेंतुं गत्वा समुद्रस्य गंगासागर संगमम ।
ब्रह्मघ्नोऽपि विमुच्येत मित्रद्रोही न मुच्यते ॥

सेतुबंध रामेश्वराला अथवा गंगा आणि सागर यांचा जेथें संगम झाला त्या तिर्थक्षेत्राला गेलं असतां ब्रह्महत्या करणारादेखील त्या पापापासून मुक्त होतो. परंतु मित्रद्रोही मात्र मित्रदोहाच्या पापापासून कोठेंही मुक्त होऊं शकत नाही.

एवढें ऐकल्यावर राजपुत्र बराच शांत झाला. राजाही थोडा आनंदित दिसू लागला. असलेले लोक वाहवा ! वाहवा !! म्हणूं लागले. राजपुत्र आतां 'मिरा' 'मिरा' एवढी दोन अक्षरेच म्हणूं लागला.

परत आतून धीरगंभीर आवाज आला ---

मित्रदोही कृतघ्नश्च तथा विश्वासघातक: ।

त्रयस्ते नरकं यांति यावश्चंद्र दिवाकरी ॥

मित्राचा घात करणरा, उपकार न स्मरणारा, विश्वास्घात करणारा, हे तिघे जोपर्यंत हे चंद्रसूर्य प्रकाशत आहेत तोपर्यंत नरकांत राहतात.

आतां विजयपाल फक्त 'रा' 'रा' असेच म्हणूं लागला. सारेजण पडद्याकडे उत्सुकतेनें बघत होते. सर्वांच्या नजरा आदरामिश्चित कौतुकानें भारल्या होत्या. राजाचे डोळ्यात आनंदाश्रु उभे होते. तेवढ्यात स्वर उमटले ----

राद्वांतः सर्व शास्त्रणामयं न कलुर्ष परम ।

विश्वास्गातात्पुत्यं च न परोपकृतै: परम ॥

सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे की, विश्वासघाताएवढे मोठे पातक नाहीं व परोपकाराएवढें दुसरें कोणातेंच पुण्य नाही.

हा श्लोक ऐकतांच राजपुत्राचे वेड एकदम नाहीसें झालें, त्यांने सर्वांना प्रणाम केला व रानांत घडलेली हकीकत सर्वांसमक्ष वडिलांना सांगितली. राजा मोठ्या आनंदाने पडद्याकडे वळून म्हणाला, 'हे मुली - तू तर गोषा सोडून कुठेही जात नाहीस; मग तुला हे सर्व कसें काय कळाले ते मला मांग़ ! माझी फार इच्छा आहे - मी तुझ्यावर एकदम खुष आहे.'

सिंहासन बत्तिशी

संकलित
Chapters
गुराखी सिंहासन बत्तिशी - आरंभ कथा पहिली कथा दुसरी चित्रलेखा श्लोक १९ वा सिंहासन बत्तिशीची कथा क्र.3 (चंद्रकला) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.4 (कामकंदला) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 5 (लीलावती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 6 (रविभामा) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.7 (कौमुदी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 8 (पुष्पवती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 9 (मधुमालती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 10 (प्रभावती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 11 सिंहासन बत्तिशीची कथा क्र.12 (मोहिनी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 13 सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 14. सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 15 (घोडे व उडणारा रथ) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.16 (पाताल नगरी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.17 (तथास्तु) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.18 (विश्वासघात) सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.19 (मन श्रेष्ठ की ज्ञान?)