Get it on Google Play
Download on the App Store

मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे!

काही लोक भाषेची व्याख्या ही भाषा म्हणजे केवळ एक संवादाचं माध्यम आहे अशी करतात. माझ्या मते ही व्याख्या केवळ तेव्हा लागू पडेल जेव्हा ती भाषा ही मातृभाषा सोडून इतर कोणतीतरी भाषा असेल!

 जेव्हा विषय मातृभाषेचा येतो तेव्हा ती संवादाच्या माध्यमातूनही  खूप अधिक काहीतरी असते की संवादाचे माध्यम एवढ्या तोडक्या व्याख्येत समाविष्ट करता येणार नाही

जसं तुमची आई ती तुमचा पहिला गुरू असते तसेच तुमची मातृभाषा ही तुमचे पहिले गोड बोबडे बोल असते, तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी,आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी, लोकांशी संपर्क साधण्यासाठी, आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी ईश्वराने आईकडून  दिलेली अमूल्य भेट म्हणजेच मातृभाषा असते.


कित्येक शास्त्रज्ञांचे देखील असे मत आहे की स्वतःच्या मातृभाषेत व्यक्तीची आकलनक्षमता इतर भाषांहून अधिक असते आणि याचे जिवंत उदाहरण म्हणजे आज जगातील सर्व देशात जरी इंग्रजी भाषेला अवास्तव महत्त्व दिले जात असलं तरी कित्येक असे देश आहेत की ते स्वतःची भाषा आजही जपतात जसे की जपान,स्पेन,रशिया,चीन...

मग असे असताना आपणच आपल्या भाषेला का कमी लेखतो? आपल्या भाषेतील जर तुम्ही साहित्य पाहिले तर कधीच आपल्या भाषेला महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही ठेवलेले संपूर्ण जगाचा विचार केलेला आहे या मराठीत!

"माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके" असे सांगत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठीला अमृतापेक्षा ही महत्व दिला आहे.संत ज्ञानेश्वरांनी  पसायदानामध्ये विश्व कल्याणाचा विचार मांडलेला आहे, संत नामदेवांनी त्यांच्या अभंगातून "नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी " असा संदेश दिला आहे.

हजारो वर्षांची परंपरा असलेली आपली मायबोली मराठी जी भारतातील मोजक्याच भाषांप्रमाणे प्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यास पात्र असणारी भाषा आहे.

आज कुठेतरी आपल्याच लोकांचा चुकीचा समज तो म्हणजे मराठी अभ्युदयाचे साधन नाही, मराठीचा आग्रह न करणे यामुळे कित्येक सेवा मराठीत मिळत नाही...


मला इतर कुठल्याही भाषेचा द्वेष करायचा नाही कारण जशी माझी मातृभाषा मराठी आहे त्याचप्रकारे त्या इतरही भाषा कोणाच्या ना कोणाच्या तरी मातृभाषा आहेत आणि इतर भाषांचा द्वेष करणे असा संस्कार आमच्या मायबोली मराठीने आमच्यावर कधीच केलेला नाही!  पण जेव्हा त्या भाषा या माझ्या मायबोलीच्या विकासात अडथळा ठरत असतील, मराठी भाषेला  पर्याय बनू पाहत असतील तर अशावेळी त्या भाषांना केलेला विरोध हा त्या दुसऱ्या भाषेचा निश्चितच द्वेष नाही.

जेंंव्हा केंव्हा मराठीमध्ये बोलण्याचा आग्रहाचा विषय येतो किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की  मराठीचा आग्रह हा केवळ अहंकार आहे

पण हा अहंकार नाही

हा आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे तिच्या ऋणांप्रती खारीचा वाटा आहे कृतज्ञता आहे...


 आज महाराष्ट्रात केंद्र सरकार द्वारे राबवले जाणारे त्रिभाषा सूत्र हे केवळ नावाला त्रिभाषा सूत्र आहे तिथे कित्येकदा मराठी भाषेला डावलले जाते! आणि केवळ सरकारी योजना नव्हे तर कित्येक खाजगी सेवा पुरवणाऱ्या लोकांचा असा समज झाला आहे की महाराष्ट्रातील लोकांना हिंदी समजत म्हणजे इथे मराठीत सेवा देण्याची आवश्यकता नाही! आणि यापुढे दोन पावले जाऊन आपलेच मराठी लोक समोरचा व्यक्ती मराठी आहे की मी मराठी आहे हे न जाणून घेता हिंदीत सुरुवात करतो. जरी समोरची व्यक्ती मराठी नसली तरी आपण मराठीतच सुरुवात करायला हवी. हिंदीमध्ये बोलून आपण त्यांची सोय का करतो हेच मला समजत नाही. जर तुम्ही त्यांच्याशी हिंदीत बोलाल तर ते मराठी भाषा का शिकत आणि मग आपली भाषा कशी टिकेल आणि कशी वाढेल? त्यामुळे स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका महाराष्ट्रात मराठीतच बोला!

यासाठी एकच गोष्ट करा...सर्व ठिकाणी मराठीचा आग्रह धरा.


डिस्कव्हरी नॅशनल जॉग्रफि या बाबतीतही तसंच आहे... हिस्टरी टीव्ही 18 ने यापूर्वी मराठी भाषेचा पर्याय दिला होता परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की म्हणावा तितका प्रेक्षक वर्ग न लाभल्याने मराठी डबिंग बंद झाले... कित्येक असे डीटीएच ऑपरेटर आहेत त्यांची सिस्टिम लँग्वेज मध्ये कन्नड तेलुगू हिंदी अशा भाषा आहेत परंतु मराठी भाषा नाहीत याचं कारण आपण मराठीचा न धरलेला आग्रह... यासंदर्भात मी एकदा तक्रार केली असता मला समोरून उत्तर आले होते की हिंदी भाषा आहे ना समोरचा बोलणारा मराठी भाषिक होता! हिंदी आहे पण मराठी नाही ना जोपर्यंत आपण फक्त आणि फक्त मराठीच असा आग्रह धरणार नाही तोपर्यंत ते तो पर्याय उपलब्ध करून देणार नाहीत... म्हणून आपण सर्वच क्षेत्रात मराठीचा आग्रह धरला पाहिजे.


लोकमान्य टिळकांनी या आधीच सांगितलं होतं की जोपर्यंत भाषा आहे व्यवहारात शिक्षणात आणि व्यापारात येणार नाही तोपर्यंत भाषेचा विकास होणार नाही आणि या सर्व क्षेत्रात मराठी भाषा येण्यासाठी भाषेच्या अग्रहा शिवाय दुसरा पर्याय नाही...


विविध बँका संस्था कंपन्या यांची माहिती पत्रक माहिती पुस्तके की आपण मराठीत मागितली पाहिजे...


जर आपण ती मराठीत मागितली नाहीत तर ती मराठीत कशी येतील आज तमिळ, तेलगू , कन्नड भाषा सर्व क्षेत्रात आहेत कारण त्या भाषिकांनी त्या भाषेचा आग्रह धरलेला आहे तसा!  मग आपल्या मातृभाषेसाठी आपण का तसा आग्रह धरू नये... आपण जर इतर पर्यायांमध्ये समाधान मानलं तर आपल्या भाषेचा पर्याय आपल्याला मिळणारच नाही...


म्हणूनच सर्वच क्षेत्रात मराठीचा आग्रह धरा....


संदेश मराठीतच टाईप करा....


फोनवर बोलताना सुरुवात मराठीतून करा हॅलो नाही तर नमस्कार म्हणा...


बँका कंपन्या संस्था यांची माहिती पत्रके व माहिती पुस्तकाची मराठीतूनच मागणी करा....


(तुम्हाला जर मराठीतून माहिती मिळत नसेल अथवा माहितीपत्रक माहिती पुस्तक किंवा मराठीतून सुविधा मिळत नसेल तर थोडा वेळ काढून यांना लेखी तक्रार करा मग ती मेल द्वारे असेल किंवा पत्राद्वारे...)


तुम्ही जा कोणत्याही क्षेत्रात काम करतात त्यावर मराठीमध्ये साहित्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा...


बोलण्याची सुरुवात मराठीतूनच करा...


स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका


महाराष्ट्रात मराठीतच बोला...


आशिष अरुण कर्ले.

३२ शिराळा (सांगली)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६