Get it on Google Play
Download on the App Store

समाजकार्य

सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. 'दर्पण' हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती.[ संदर्भ हवा ] विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी 'नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी'ची स्थापना केली. यातूनच पुढे 'स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी' या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.

बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले.

त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.