Get it on Google Play
Download on the App Store

राजकुमारी कौल आणि वाजपेयी

एक सुफळ संपूर्ण प्रेमकहाणी…

राजधानी दिल्लीतल्या वरिष्ठ राजकीय वर्तुळात राजकुमारी कौल यांना सगळे ओळखत होते. त्यांचं निधन चार मे २०१४ रोजी झालं. त्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं पहिल्या पानावर सविस्तर प्रसिद्ध केली. त्यानंतर सर्वसामान्यांना राजकुमारी कौल यांच्याबद्दल कळलं. एका अज्ञात प्रेमकहानीच्या पुस्तकाची काही पानं उलगडली गेली. राजकुमारी कौल यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं, तेव्हा त्यासंदर्भात जी प्रेसनोट काढण्यात आली होती त्यामध्ये, 'वाजपेयी यांच्या कुटुंबातील सदस्य' असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता.

खरोखर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाचा त्या अविभाज्य भाग होत्या. चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांची वाजपेयी यांच्यासोबत मैत्री होती. पती प्रा. बी. एन. कौल हयात असताना वाजपेयी यांनी त्या दोघांसोबत खूप काळ व्यतीत केला. प्रा. कौल यांच्या निधनानंतर वाजपेयी यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्या वाजपेयी यांच्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्ति बनल्या. अशी व्यक्ती सत्तेच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींमध्ये ढवळाढवळ करीत असते आणि त्यामुळे वादग्रस्त ठरते. परंत राजकुमारी कौल यांनी राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवले आणि संबंध केवळ व्यक्तिगत पातळीवरच जपले. त्याला छान कौटुंबिक उबदारपणाचे आवरण दिले.
अटलबिहारी वाजपेयींसाठी येणारे फोन राजकुमारी कौल याच घेत होत्या. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आगत-स्वागतही त्याच करायच्या. त्यांचं निधन झालं तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धामधुमीचा काळ होता. त्यावेळच्या व्यस्ततेतूनही वेळ काढून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वाजपेयींच्या घरी  जाऊन त्यांना आदरांजली वाहिली होती. यावरून राजकुमारी कौल यांचं वाजपेयींच्या कुटुंबातलं स्थान किती महत्त्वाचं आणि सन्मानाचं होतं, हे लक्षात येतं.

राजकुमारी कौल आणि अटलबिहारी वाजपेयी यांची ही कहाणी एखाद्या चित्रपटाची कथा बनावी अशी  तरल होती. त्यातली तरलता आणि त्या कहानीचा खानदानी आब अखेरपर्यंत टिकून राहिला. सोशल मीडियाच्या सवंग कालखंडातही त्याला गॉसिपचे स्वरुप आले नाही, तसे कुणी देण्याचा प्रयत्नही केला नाही. अटलजींचं आदरणीय आणि निर्मळ व्यक्तिमत्त्वच त्याला कारणीभूत होतं.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेमुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी राजकुमारी कौल यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. बाकी भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. 'बहुत ममता से भरी हुयी थी' ही सुषमा स्वराज यांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांचं नेमकं वर्णन करणारी होती.

वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. बाकीच्याही कुणी त्या फंदात पडले नाही. 'मिसेस कौल' म्हणूनच त्या स्वत:ची ओळख करून द्यायच्या आणि आपण वाजपेयींच्या मित्र असल्याचं सांगायच्या. वाजपेयी पंतप्रधान असताना ७, रेसकोर्स येथेही मिसेस कौल म्हणूनच त्या राहिल्या.

ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये (सध्याचे लक्ष्मीबाई कॉलेज) शिकत असल्यापासून अटलबिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची ओळख होती. ग्वाल्हेरच्या मोरार परिसरात कौल यांचे कुटुंबीय राहात होते. नंतर त्यांनी शहर सोडले. कॉलेजमध्ये असताना वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांच्यात अनोखे भावबंध निर्माण झाले होते. परंतु काही कारणांनी ती प्रेमकहाणी अधुरीच राहिली. वाजपेयींनी राजकुमारींना प्रेमपत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या, परंतु त्यांना त्या पत्राचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळं ते मनातून दुखावले होते. पुढं दोघांचे रस्ते वेगळे झाले.
राजकुमारी यांचा विवाह प्रा. बी. एन. कौल यांच्याशी झाला. ते दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि कॉलेजच्या होस्टेलचेही वॉर्डन होते. पतीसोबत राजकुमारी कौल दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर वाजपेयी यांच्याशी त्यांचा पुन्हा संपर्क सुरू झाला.

अलिकडेच दिवंगत झालेले ज्येष्ठ पत्रकार गिरीश निकम यांनी राजकुमारी कौल यांच्या निधनानंतर त्यांच्यासंदर्भातील काही आठवणींना उजाळा दिला होता.
भाजपचे बीट कव्हर करीत असताना निकम यांना वारंवार वाजपेयींच्या निवासस्थानी फोन करावा लागायचा. तो लँडलाइनचा जमाना होता. रात्री कधीही फोन केला तरी एक महिला फोन उचलायची. अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आवाज होता. निकम लिहितात, 'मी त्यांना वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या फोन होल्डवर ठेवायला सांगायच्या आणि नंतर वाजपेयी फोनवर यायचे. हे वारंवार घडायचं. अतिशय सभ्य, सुसंस्कृत आवाजात पलीकडून आपली ओळख करून दिली जायची, 'मी मिसेस कौल बोलते.' असं बऱ्याचवेळा घडलं. म्हणजे फोन मिसेस कौल उचलायच्या आणि थोड्या वेळानं वाजपेयी फोनवर यायचे.'
एके दिवशी निकम यांनी फोन केल्यावर 'मिसेस कौल बोलते', असा नेहमीचा आवाज आला. वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या पुन्हा म्हणाल्या, 'मी मिसेस कौल बोलतेय'. त्यावर कोणतंही कुतूहल न दाखवता निकम म्हणाले, 'होय मॅडम, मला ठाऊक आहे.' हे असं झाल्यावर नेहमीच्या आदबशीरपणे आणि आश्चर्यानं त्यांनी विचारलं, 'तुम्हाला माहीत नसावं मी कोण आहे ते!'
'नाही मॅडम', निकम यांनी थोडं अपराधीपणानं उत्तर दिलं.
'मी मिसेस कौल, राजकुमारी कौल. वाजपेयीजी आणि मी खूप वर्षांपासून म्हणजे चाळीस वर्षांपासून मित्र आहोत. तुम्हाला ठाऊक नाही?' त्यांनी आश्चर्ययुक्त कुतूहलानं विचारलं.
'ओह, सॉरी मॅडम, मला ठाऊक नव्हतं.' निकम यांनी उत्तर दिलं. त्या हसल्या आणि त्यांनी वाजपेयी आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगितलं. त्या आणि त्यांच्या पतीसोबत वाजपेयी राहात असल्याच्या आठवणीही सांगितल्या.

वाजपेयींनी आपल्या कॉलेजच्या काळातील या मैत्रिणीबद्दल कधी सार्वजनिकरित्या काही सांगितलं नाही. एका मुलाखतीमध्ये राजकुमारी कौल म्हणाल्या होत्या की, 'मला आणि अटलजींनाही कधी आपल्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली नाही.'

राजकीय, सामाजिक जीवनात अटलजींच्याबद्दल एवढा आदर होता, की या नात्याबद्दल कधी माध्यमांनी बातम्या रंगवल्या नाहीत किंवा राजकीय वर्तुळात कधी गॉसिपिंग झालं नाही. वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान झाले, त्या तिन्ही वेळेला त्यांचं घर मिसेस कौल आणि वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य याच सांभाळत होत्या. वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांचं हे नातं वाजपेयींच्या कौटुंबिक आणि राजकीय वर्तुळातल्या नेत्यांनी सहज स्वीकारलं होतं.

कोणत्याही प्रेमकहाणीचा शेवट दोन प्रकारे होत असतो. एकतर ताटातूट होते. किंवा दोघं लग्न करतात. वाजपेयी आणि राजकुमारी यांची प्रेमकहाणी वेगळी आहे. दोघांची ताटातूट झाली. पैकी एकाचं लग्न झालं. त्यानंतर दोघं भेटले. अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले. त्याअर्थानं विचार केला, तर ही प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण ठरली, असं म्हणता येईल.

मे २०१४ मध्ये राजकुमारी कौल गेल्या. आज अटलजींनी अखेरचा श्वास घेतला.

विजय चोरमारे