Get it on Google Play
Download on the App Store

दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १

यशस्वी झाले श्रीमंत पहिले सवेलढायाला ।

आताच आले अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥

दादासाहेब पुण्यप्रतापी निस्सीम शिवभक्त ।

स्वारी करुन दरसाल हालविले दिल्लीचे तक्त ।

आनंदीबाई सुशील शिरोमणी सगुणसंयुक्त ।

पतिभजनी सादर घडोघडी अखंड आसक्त ।

बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त ।

जन्मांतरी तप केले निराहारी राहुन एकभुक्त ॥चा०॥

शके सोळाशे शहाण्णवी अति उत्तम जयसंवत्सरी ।

पौषशुद्ध दशमिस भरणी नक्षत्र भौमवासरी ।

ठीक पहिल्या प्रहरात जन्मले रात्रीच्या अवसरी ॥चा०॥

पहा बाईसाहेब धारमुक्कामी राहुनी ।

कंठिला काळ काही दिवस दुःख साहुनी ।

केले तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥चा०॥

गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला ।

कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥

समाधान सर्वास वाटले कोपरगावास ।

स्वारी शिकारीस बरोबर जाती कथा उत्सवास ।

जे करणे ते पुसून करिती अमृतरावास ।

एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावास ।

असे असुन नानांनी मांडिला अति सासुरवास ।

हळुच नेऊन जुन्नरास ठेविले श्रीमंतरावास ॥चाल०॥

इतक्या संधीत सवाई माधवराव मरण पावले ।

तेव्हापासून नानांनी राक्षसी कपट डौल दाविले ।

परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥चा०॥

आले खडकी पुलावर श्रीमंतास घेउनी ।

दर्शनास नाना परिवारे येउनी ।

दाखविली याद रावास एकांती नेऊनी ॥चाल पहिली॥

भय मानून शिंद्यांचे निघाले बाईस जायाला ।

सातार्‍यात राहून लागले भेद करायाला ॥२॥

आपण बाळोबा होउन एक केली खचीत मसलत ।

चिमाप्पास धनी करून राखिलि जुनाट दौलत ।

करारात दोघांच्या झाली काही किंचित गफलत ।

म्हणुनी फिरून नानांनी उलटी मारुनी केली गल्लत ।

सूत्रधारी जो पुरुष ज्याच्या गुणास जग भुलत ।

हातात सगळे दोर पतंगापरी फोजा हालत ॥चाल॥

परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण ।

राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ।

कठीण गाठ नानांशी न चाले तेथे जारण मारण ॥चाल॥

महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ।

बाळोबास शिंद्यांकडून कैद करविले ।

शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥चाल पहिली॥

रास्ते झाले जामीन प्रसंगी अवघड समयाला ॥

असा गुजरला वक्त नेले मांडवगण पाहायाला ॥३॥

घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले ।

द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥

शिंदे भोसले होळकर मुश्रुलमुल्क एकवटले ।

दलबादल डेर्‍यात श्रीमंतासंन्निध संगटले ।

बाजीराव राज्यावर बसता आनंदे जन नटले ।

तोफांचे भडिमार हजारो बार तेव्हा सुटले ॥चाल॥

नंतर नाना एकविसांमधी समाधीस्त झाले ।

महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधि आपले पाहिले ।

यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥चाल॥

शिंद्यांनी करून माळव्यात खातरजमा ।

केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा ।

सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥चाल पहिली॥

कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला ॥

घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥

दिला मार पळणास जातिने पुण्यास येऊनिया ।

शहर सभोते वेढुन बसले चौक्या ठेवुनिया ।

खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनिया ।

सुखात होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनिया ।

इंग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनिया ।

सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनिया ॥चाल॥

अगोदर सोजर तरुक धावले मप्याशी दक्षिणी ।

त्या भयाने होळकर परतले नाही कोणी संरक्षणी ।

भरघोसाने श्रीमंत त्यावर पुण्यास येता क्षणी ॥चाल॥

झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ।

परि घरात शिरला शत्रु सबळ पारखा ।

लाल शरीर टोपी अंगी आठ प्रहर अंगरखा ॥चाल पहिली॥

धर्म कर्म ना जातपात स्थल नाही बसायाला ।

असे असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥

फार दिवस आधि जपत होते या इंग्रज राज्याला ।

अनायासे झाले निमित्त पंढरपुरास कज्जाला ।

संकट पडले काहि सुचेना प्रधानपूज्याला ।

रती फिरली सारांश मिळाले लोक अपूज्याला ।

भय चिंता रोगांनी ग्रासिले काळीज मज्जाला ।

पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥चाल॥

परम कठिण वाटले आठवले त्रिभुवन राव बाजीला ।

थोर थोर मध्यस्थ घातले साहेबांचे समजीला ।

निरुपाय जाणुनी हवाली केले मग त्रिंबकजीला ॥चाल॥

ठेविला बंदोबस्तीने नेउन साष्टीस ।

एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस ॥

केले गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥चाल पहिली॥

स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला ।

शोध लावून साहेबांणी तेथे पाठविले धरायाला ॥६॥

इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची ।

म्हणून साहेब लोकांनी आरंभिली अगळिक दाव्याची ।

वसई प्रांत कल्याण गेली गुजराथ पुराव्याची ।

रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ।

कर्नाटक दिले लिहून ठाणी बैसली पराव्यांची ।

कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥चाल॥

अश्विनमासी वद्य एकादशी दोन प्रहर लोटता ।

श्रीमंत बापुसाहेब एकांती पर्वतीस भेटता ।

हुकूम होताक्षणी रणांगणी मग फौजा लोटता ॥चाल॥

बैसले राव दुर्बिणीत युद्ध लक्षित ।

भले भले उभे सरदारसैन्य रक्षित ।

लागुन गोळी ठार झाले मोर दिक्षित ॥चाल प०॥

तसाच पांडोबांनी उशीर नाही केला उठायाला ।

उडी सरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥

आला त्रास वाटते फार ह्यावरून लक्षुमीस ।

विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुकडून खामीस ।

फसले शके सत्राशे एकुण चाळीसच्या रणभूमीस ।

ईश्वर संवत्सरात कार्तिक शुक्ल अष्टमीस ।

प्रहर दिसा रविवारी सर्व आले आरब गुरमीस ।

खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्वामीस ॥चाल॥

दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्यांशी लढू ।

गर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणात डोंगर चढू ।

शिपाइगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढू ॥चाल॥

लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी ।

दीड प्रहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी ।

गेली स्वारी महाला हिलाला मग लावुनी ॥चाल पहिली॥

जलदी करुनी साहेबांनी लाविले निशाण पुणियाला ।

खेचुन वाड्याबाहेर काढले कदीम शिपायाला ॥८॥

सकळ शहरचे लोक हजारो हजार हळहळती ।

सौख्य स्मरून राज्याचे मीनापरी अखंड तळमळती ।

रात्रंदिवस श्रीमंत न घेता उसंत पुढे पळती ।

यमस्वरूप पलटणे मागे एकदाच खळबळती ।

धडाक्याने तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती ।

त्यात संधी साधून एकाएकी दुरून कोसळती ॥चाल॥

भणाण झाले सैन्य सोडिली कितीकांनी सोबत ।

कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनी चुंबत ।

कितीक मुकामी अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥चाल॥

कोठे डेरे दांडे कोठे उंट तट्टे राहिली ।

कोठे सहज होऊन झटपट रक्ते वाहली ।

कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥चाल पहिली॥

बहुत कोमावली पाहवेना दृष्टीने उभयाला ।

हर हर नारायण असे कसे केले सखयाला ॥९॥

माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणी भिडले ।

जखम करुन जर्नेलास फिरता जन म्हणती पडले ।

गोविंदराव घोरपड्याचे दोन हात भले झडले ।

आनंदराव बाबर ढिगामधी खुप जाऊन गढले ।

मानाजी शिंदे मागे फिरताना डोई देऊन अडले ।

छत्रपती महाराज तळावर समस्त सापडले ॥चाल॥

घाबरले श्रीमंत सुचेना मन गेले वेधुनी ।

बाईसाहेबांना तशिच घोड्यावर पाठीस बांधुनी ।

नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधुनी ॥चाल॥

दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले ।

नाही स्नान शयन नाही स्वस्थपणे जेवले ।

आले आले ऐकता उठपळ राव धावले ॥चाल॥

गर्भगळित जाहले लागले शुष्क दिसायाला ।

बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥

दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन ।

रागरंग नाही आनंद ठाऊक रायालागुन ।

सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन ।

कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ।

धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन ।

कर्म पुढे प्रारब्ध धावते लगबग मागुन ॥चालव

पांढरकवड्यावर रचविल्या धनगारा अद्भुत ।

थंडीने मेले लोक उठविले गारपगार्‍यांनी भुत ।

बेफाम होते लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥चाल॥

ओधवले कसे सर्वांचे समयी संचित ।

कडकडून पडले गगन जसे अवचित ।

दुःखाचे झाले डोंगर नाही सुख किंचित ॥चाल पहिली॥

अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला ।

कोणे ठिकाणी नदीत लागले सैन्य बुडायाला ॥११॥

जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती ।

कळेल तिकडे भरदिसास प्रभु काट्यामधी शिरती ॥

आपला घोडा आपण स्वहस्ते चुचकारुन धरती ।

खाली पसरुन उपवस्त्र दिलगिरीत वर निद्रा करती ॥

अस्तमानी कधी रात्री भात भक्षिती पाटावरती ।

दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥चाल॥

पेशव्यांचे वंशात नाही कोणी असा कट्टर पाहिला ।

हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ।

बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥चाल॥

नर्मदेस शालिवाहन शक संपला ।

त्या ठायी ठेविल शकपंती आपला ।

भरचंद्रराहुग्रहणात जसा लोपला ॥चाल पहिली॥

सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला ।

सिद्ध झाले मालकमास राव राजेंद्र मिळायाला ॥१२॥

समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिवरले ।

सद्गद जाला कंठ नेत्र दोन्ही पाण्याने भरले ।

आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले ।

ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ।

केवळ असा विश्वासघात केल्याने कोण त ले ।

इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥चाल॥

तुमची आमची हीच भेट आता राव सर्वांना सांगती ।

कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ।

ऐसे उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ।

॥चाल॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये ।

दूर ढकलुन शरणागतास लावू नये ।

पहाकसबाचे घर गाईस दावू नये ॥चाल पहिली॥

हिंमत सोडू नये सर्व येईल पुढे उदयाला ।

कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावे ह्रदयाला ॥१३॥

प्राण असुन शरिरात बुडालो वियोग लोटात ।

बरोबर येतो म्हणुन घालिती किती डोयी पोटात ।

निराश जाणुन झाली रडारड मराठी गोटात ।

निर्दयांनी लांबविली पालखी पलटण कोटात ।

मातबर लोकांची ओझी चालतात मोटात ।

गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटात ॥चाल॥

कुंकावाचुन कपाळ मंगळसूत्रावाचुन गळा ।

तया सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ।

धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥चाल॥

कसे प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविले ।

अगदीच पुण्याच्या लोकांना फसविले ।

हुर हुर करीत का उन्हात बसविले ॥चाल पहिली ॥

काही तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला ।

कोणास जावे शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥

विपरित आला काळ मेरुला गिळले मुंग्यांनी ।

पंडीतास जिंकिले सभेमध्ये मदांध भंग्यांनी ।

भीमास आणिले हारीस रणांगणी अशक्त लुंग्यांनी ।

कुबेरास पळविले अकिंचन कसे तेलंग्यांनी ।

जळी राघव माशास अडविले असंख्य झिंग्यांनी ।

जर्जर जाहला विष्णुवाहन बदकांचे दंग्यांनी ॥चाल॥

ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडवीले ।

हरिश्चंद्र आणि रामचंद्र नळ पांडवास रडवीले ।

फितुर करुन सर्वांनी असले राज्य मात्र बुडवीले ॥चाल॥

म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर ।

तर दृष्टीपुढे पडतील राव लवकर ।

महादेव गुणीजन श्रीमंतांचे चाकर ॥चाल पहिली ॥

प्रभाकरची जडण घडण कडकडीत म्हणायाला ।

धुरू नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायाला ॥१५॥