Get it on Google Play
Download on the App Store

खर्ड्याचे लढाईचा पोवाडा

दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगात अवतरले ॥ध्रुपद॥

भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥

कलियुगी धर्म ताराया ॥ ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपुनिर्मूळ कराया ॥

सुकिर्ती मागे उराया ॥ सौख्य दिले सर्वास अहारे सवाई माधवराया ॥चाल॥

धन्य धन्य नानाचे शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण ।

गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हाच केला दुर्धट हा पण ।

आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालून कुंपण ।

आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंताना करुनि रवाना ॥

(चाल) दादासाहेब मागे वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ।

अपुल्या राज्यापार पळविले । काही दिवस दुःखात आळविले ।

इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायात खिळविले ।

ठेवून गडावर चणे दळविले । बंदीवान तेथेच खपविले ॥चाल॥

बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ।

जमाव ठायींच ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ।

शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजुर ओढिला ।

लागेल तितके द्र्व्य पुरविले ॥चाल॥ तळेगावावर इंग्रज हरला ।

इष्टुर साहेब रणीच वीरला । उरला इंग्रज घाट उतरला ।

सरमजाम गलबतात भरला । रातोरात मुंबईत शिरला ।

सवेच गाढर पुढेच सरला । शिकस्त खाउन तोही फिरला ।

फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥चाल॥ अशी रिपूची मस्ती जिरविली ।

शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली । कारभार्‍यांनी पाठ पुरविली ।

पुण्यामध्ये अमदानी करविली । पुरंदराहुन स्वारी फिरविली ।

पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली ।

कालूकर्णे वाजंत्री वाजती ॥चाल॥ लग्नचिठ्या देशावर लिहिल्या ।

ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या । पाठविल्या बोलाऊ पहिल्या ।

पठाण मोंगलसहित सहिल्या । छत्रपति रोहिले रोहिल्या ।

भोसल्यांच्या मौजा पाहिल्या । आणिक किती नावनिशा राहिल्या ।

कवीश्वराची नजर पुरेना ॥चाल॥ आरशाचे मंडप सजविले ।

चित्रे काढून चौक उजविले । थयथयांत जन सर्व रिझविले ।

गुलाब आणि अत्तरे भिजविले । शिष्ठ शिष्ट शेवटी पुजविले ।

रुपये होन मोहोरांनी बुजविले । श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ।

यशस्वी झाली सकल मंडळी ॥चाल॥

सत्राशे सातात बदामी । हल्लयाखाली केली रिकामी ।

एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामी ।

बाजीपंत अण्णा ते कामी हरीपंत तात्याचे लगामी ।

परशुरामपंत त्या मुक्कामी । स्वामी सेवक बहुत जपले ॥चाल॥

गलीमास काही नव्हते भेऊन । पराक्रमाने किल्ला घेऊन ।

अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन ।

श्रीमंतांनी वाड्यामध्ये नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ।

बहुमानाची वस्त्रे देऊन । बोळविले तयाला ॥चाल॥

सत्राशे तेरावे वरीस । अवघड गेले पहिल्या परीस ।

करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ।

तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ।

आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥चाल पहिली ॥

नंतर मागे फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकी धरिले ॥

दैन्य दिवस आज सरले ॥१॥

केवढे भाग्य रायाचे । चहुंकडे सेवक यशस्वी होती हे पुण्य त्या पायांचे ॥

करिता स्मरण जयाचे । काही तरी व्हावा लाभ असे बलवत्तर नाम जयाचे ॥

प्रधानपद मूळ याचे । सत्रशे चवदात मिळाले वजीरपद बाच्छायाचे ॥चाल॥

मुगुटमणी ते पाट्लबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ।

दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसिता फळास यावा ।

हर हमेशा शत्रुसि दावा । माहित सगळा मराठी कावा ।

हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥चाल॥

चवदा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ।

तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ।

देउन फार मर्जीने वागले । भेटीसमयी जंबूर डागले ।

मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झाकले ॥चाल॥

राव जेव्हा नालकीत बसले । कृष्ण तेव्हा ते जनास दिसले ।

अर्जुन पाटिलबावा भासले । पायपोस पदराने पुसले ।

चरणी मिथी माराया घुसले । कर प्रभुनी बगलेत खुपसले ।

इमानी चाकर नाहीत असले । धन्य धनी आणि धन्य दास ते ॥चाल॥

दोन्ही दळे या सुखात दंग । त्यावर जाला अमोल रंग ।

गुलाल आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाही प्रसंग ।

मस्त चालतीपुढे मातंग । कोतवाल घोडे करिती ढंग ।

राज्य प्रभुचे असो अभंग । अहर्निशि कल्याण चिंतिती ॥चाल॥

गुलाम सोदे बुडवुनि पाजी । पंत प्रधान राखुन राजी ।

लष्कर दुनया करून ताजी । शके सत्राशे पंधरामाजी ।

माघ मासी भली मारून बाजी । पाटिलबावा सुरमर्द गाजी ।

अगोदर गेले विष्णुपदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥चाल॥

सवाचार महिन्यांचे अन्तर । हरीपंत तात्या गेले नंतर ।

तेथे न चाले तंतर मंतर । वर्तमान हे एक अधिकोत्तर ।

काही न करिती नाना उत्तर । दिलगीर मर्जी सुकले अंतर ।

हिरे हरपले राहिले फत्तर । तरि तो पुरुष बहुत धिराचा ॥चाल॥

दौलतीचे आज खांबच खचले । लाल्होते ते कोठेच पचले ।

शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाही कचले ।

कडोविकडीचे विकार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ।

मोंगलावर मोर्चे रचले । जिकडे तिकडे झाली तयारी (चाल) पुकार पडला पृथ्वीवरती ।

सैन्य समुद्रा आली भरती । आगाऊ खर्ची मोहरा सुर्ती ।

रात्रंदिवस श्रम नाना करती । कशी ही मोहिम होईल पुरती ।

राव निघाले सुदिनमुहूर्ती । लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥चाल॥

गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ।

उजव्या बाजुस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना ।

देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुब सिलेखाना ।

मध्ये रायाचा तालिमखाना खळ ॥ खळ खळ लेजिमा वाजती ॥चाल॥

वाड्याबाहेर जिन्नसखाना । पदार्थ भरपुर मोदीखाना ।

मागे उतरला उष्टरखाना । डेर्‍यासन्निध नगारखाना ।

तर्‍हतर्‍हेचा शिकारखाना । बाजाराच्या पुढे पिलखाना ।

दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठ्या पल्ल्याच्या जरबा ॥चाल पहिली॥

चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ।

दैन्य दिवस आज सरले० ॥२॥ बहुत शिंदे जमले ।

शिलेपोस पलटणे लाविती पठाण जरीचे समले ॥ रणपंडित ते गमले ।

भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेत येउन रमले ।

ज्यापुढे शत्रु दमले । त्यांणी शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥चाल॥

आधीच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ।

फौज सभोवती जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ।

सर्व लढावया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ।

हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिजे ॥चाल॥

बाळोबास तर काळिज नाही । धीट रणामध्ये उभाच राही ।

धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही ।

सदाशीव मल्हार काही । मागे पुढे तिळमात्र न पाही ।

देवजी गवळी रिपूस बाही । रणांगणाचा समय साघिती ॥चाल॥

निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ।

बंदुकीला कटपट्यास नक्षी । फत्ते होई तो गौंड न भक्षी ।

रायाजी पाटिल महत्त्व रक्षी । नित्य कल्ल्याण धन्याचे लक्षी ।

पिढीजाद शिंद्याचे पक्षी । केवळ अंतरंग जिवाचे ॥चाल॥

मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ।

सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ।

हपिसर पदरी चंगी भंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी ।

दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर झर बुरुज बांधुनी ॥चाल॥

शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजदे थेट इराणी ।

किती काबूल खंदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ।

कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ।

इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमधे ज्वान पलटणी ॥ ( चाल ) ॥

येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ।

तुकोजी बावांना गुरमाई । आधीच बळ स्वार शिपाई ।

वारगळ बरोबर फणशे जावाई । लांब हात बुळे वाघ सवाई ।

वाघमारे कुळ धगनगभाई । खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥चाल॥

शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फासे ।

लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणे करतात तमाशे ।

बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ।

जा जा म्हणती लोक बगासे । जहामर्द तरवारकरांचे ॥चाल॥

हरजी विठूजी आनंदराव । स्वता धनी यशवंतराव ।

संताजीचे प्रसिद्ध नाव । आबाजीचा तिखट स्वभाव ।

दूर नेला साधितात डाव । विचारी मतकर माधवराव ।

भागवतांनी सोडुन गाव । ताबडतोब निघाले ॥चाल॥

महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ।

चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ।

परशुराम रामचंद्र असारे । चहुकडे ज्याचा पूर्ण ठसारे ।

अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कापती ॥चाल॥

रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ।

विंचुरकरांमधि गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुष जवादा ।

चौपट खर्च दुप्पट आदा । पुरंधर्‍यांची कदीम इरादा ।

तत्पर पेठे मोगल वादा । ओढेकरही येऊन भेटले ॥ ( चाल पहिली ) ॥

वामोरकर सावरले । आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले । दैन्य दिवस आज सरले ॥३॥

खास पतक नानाचे । निवडक माणुस त्यात पुरातन सूचक संधानाचे ॥

पद देऊनि मानाचे । खुष करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचे ॥

बळ विशेष यवनांचे । हे ऐकुनी लोकांनी सोडिले पाणी शीरसदनाचे ॥चाल॥

आपा बळवंतराव सुबुद्ध । बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध । पवारात मर्दाने शुद्ध ।

वाढविती भापकर विरुद्ध । केवढ्यांना शुष्कवत युद्ध ।

काढिती हांडे रणी अशुद्ध । धायगुडे निर्बाणी कुबुद्ध ।

शेखमिरा फौजेत मिसळले ॥चाल॥

पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ।

अमीरसिंग जाधव माळेगावकर । सुजाण गोपाळराव तळेगावकर ।

जानराव नाईक नट निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ।

करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥चाल॥

कामरगावकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले ।

हर्ष वाहिले पुढे सरसावले । रण नवरे दरकुच धावले ।

समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले ।

शहर पुणे रक्षणार्थ ठेविले । माधवराव रामचंद्र कानडे ॥चाल॥

सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागे नाही लपले ।

धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धा ते आपापले ।

गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ।

खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ।

जाधव काळे माळशिकारे ॥चाल॥ बाजीराव गोविंद बर्वे ।

लाड शिरोळे धायबर सुर्वे । दाभाड्याचा हात न धरवे ।

भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे ।

खंडाळ्याचे पोषाग हिरवे । नलगे भोयते सुंदर सर्व ।

सखाराम हरी बाबुराव ते ॥चाल॥

कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ।

राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे वरची ।

एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ।

काय कथा त्या भागा नगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥चाल॥

दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलोट ।

मारिती पुढे समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ।

देवकात्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ।

जगतापाचे महतर भोयटे । भले मर्तृजा महात थड्याचे ॥चाल॥

गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ।

आयतुळे मान्य सकळ शूरात । बेहरे मांजरे योग्य बीरात ।

राघो बापुजी रणघोरात । येसोजी हरी सैन्य पुरात ।

दारकोजीबावा निंबाळकरांत । वीरश्रीत तो धुंद सग्याबा ॥चाल॥

कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ।

दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ।

मैराळजी पायघुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे ।

गणेश विठ्ठल वाघमारे । बिडकर खुर्देकर आटीचे ॥चाल॥

गिरजोजी बर्गे फार दमाचे । बहादर बारगिर ते कदमाचे ।

आठवले तर बहु कामाचे । दुर्जनसिंग राठोड श्रमाचे ।

टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ।

श्रीमंतस्मरणे काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥चाल पहिली॥

प्रपंच वैद्य विसरले । चिलखत बखतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥

लष्कर सगळे गुर्के । जरी पटक्याभोताले घालिती गरर मानकरी गर्के ।

सुंदर गोरे भुर्के । घोरपडे पाटणकर महाडिक खानविलकर शिर्के ।

मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥चाल॥

पुढे पसरले रिसालदार । मुसा मुत्रीम नामदार । सय्यद अहमद जमादार ।

अमीर आबास नव्हे नादार । शहामिरखा ते डौलदार ।

इतक्या वर ते हुकूमदार । राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥चाल॥

गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ।

विनायकपंताचा गलोल । आबा काळे गुणीच डोल ।

टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ।

तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणे ॥चाल॥

संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ।

राघोजीबावा नाव विराजे । बाणांचा भडीमार माजे ।

सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ।

अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥चाल॥

दक्षण उत्तर पश्चिम भागी । पसरुन तोफा जागोजागी ।

तमाम गारदी त्याचे मार्गी । स्वार सैन्य त्यामागे झगागी ।

जरी पटका तो दुरुन धगागी । कोणीच नव्हता त्यात अभागी ।

स्वस्ति बक्षिस पावे बिदागी । जासूद सांडणी स्वार धावती ॥चाल॥

काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या झडती ।

शिरकमळे कंदुकवत उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ।

कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ।

वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥चाल॥

पाउल पाउल पुढे सरकती । घाव चुकाउनी शुर थडकती ।

सपुत वाघापरी गुरकती । हत्यार लाउन मागे मुरकती ।

खुणेने शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागे सरकती ।

जिवबादादा मनी चरकती । अररररर शाबास बापांनो ॥चाल॥

सुटती तोफा धुंद दणाणत । गुंगत गोळे येती छणाछण ।

सों सों करिती बाण सणासण । खालेले घोडे उडती टणाटण ।

टापा हाणती दुरुन ठणाठण । वाजति पट्टे खांडे खणाखण ।

नौबती झांझा झडती झणाझण । एकच गर्दी झाली धुराची ॥चाल॥

थोर मांडली रणधुमाळ । अगदीच बसली मग काठाळी ।

फौज पसरली रानोमाळी । लाखो लाख तरवारी झळाळी ।

होळकराची फिरती पाळी ॥ जिवबांची मदुमकी निराळी ।

मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूंचे ॥चाल॥

अठरा घटका लाही फुटली । तोफ हजारो हजार सुटली ।

मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निःसंग तुटली ।

मोंगल सेना मागे हटली । त्या समयी कैकांची उपटली ।

पेंढार्‍यांनी दौलत लुटली । गबर झाले एका दिसात ॥चाल॥

शके सत्राशे सोळा भरता । आनंद संवत्सरही सरता ।

दहा दिवस शिमग्याचे उरता । वद्य पंचमी सुवेळ ठरता ।

ती प्रहरांचा अंमल फिरता । मोंगलाशी प्रसंग करिता ।

पळाले मोंगल धीर न धरता । चंद्रउदयी खर्ड्यात कोंडिले ॥चाल पहिली॥

गढीत खासे शिरले ।

मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोभर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥

बहुत खराबी जहाली ।

मोहोर्‍यावरची फौज सैनिका सहित नाहली ॥

त्यात उन्हाची काहाली ।

रुपयाचे दिड शेर पाणी अशा कठीण वेळा वाहाली ॥

ती सर्व जनांनी पाहिली ।

जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥चाल॥

निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानात मान्य ।

जुनाट पुरुषात राजमान्य । अपार पदरीमण धनधान्य ।

कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचे मुळी प्राधान्य ।

तशात झाले अनुकुळ दैन्य । नाही तर घेते खबर पुण्याची ॥चाल॥

जेव्हा मारिती यवन मुसंडी । तेव्हाच होईती फौज दुखंडी ।

साठ सहस्त्र पठाण बुडी । तिनशे तोफा खंडी ।

असे असुनिया दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥चाल॥

झाला जन्म त्या कुळात माझ्या बाई राजेंद्राचा ।

केवळ माघव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराची ॥

अणीक मंत्री मर्द मराठा बंद्रोबंद्रांचा ।

ऐरावत बांधून आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥

येथे न चाले यत्‍न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा ।

उपाय असता तरी न मरता बापू रामचंद्राचा ॥

चा० हरहर जगन्निवासा, अता काय करू ॥

पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरू ॥

राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा कर शकू ॥

चा० पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवू ॥

हिरकणी कुटुन जाऊ पाण्यामधे कालवू ॥

ती पिउन पौढत्ये नका ग मज हालवू ॥

चा० जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला ।

जिवंत मी असल्यास उद्या मी नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते० ॥१५॥

धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले ।

शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ।

जलचर हैदर नबाब सन्मुख रण करिता थकले ।

ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ।

असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले ।

गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥चाल॥

संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती ।

ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबती ।

कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥चाल॥

महादेव गुणीराज श्रुती गादिचे ।

नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ।

पीळ पेच अर्थ अक्षरात वस्तादिए ॥चालपहिले॥

प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेत गायाला ।

अशा कवीची बुज नाही कोणि करायाला ॥

कमि नव्हते० ॥१६॥