Get it on Google Play
Download on the App Store

पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना समर्पित

१७ वर्ष झाली, भाई, तुम्हाला जाऊन.... तरी अजून रोज भेटता.... कधी वर्तमानपत्रातून, कधी पुस्तकातून, कधी ऑडिओ कॅसेट्च्या रूपात, कधी गाण्यात, कधी हार्मोनियमच्या स्वरात,  कधी जाहिरातीतल्या कोट्यांमधून....

अजूनही कधी एसटीच्या प्रवासात म्हैस आडवी जाते, तेव्हा तुम्ही भेटता.

डिजिटायझेशनच्या ह्या बदलत्या काळात रस्त्यानी एखादं साईन-बोर्ड पेंटिंगचं दुकान दिसलं की, तुमची आठवण येते.

पोस्ट खाती आता फक्त नावालाच उरली आहेत. पण, तुम्ही कथांमध्ये रंगवलेली पोस्ट ऑफिसं अजूनही जिवंत आहेत.

गल्लोगल्ली अध्यात्माची दुकानं लागलेली पाहून आजही तुमचं, 'असा मी, असा मी' आठवतं आणि हसू येतं.

"मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं" हे अजूनही कित्येकांच्या बाबतीत घडताना दिसतं... अगदी माझ्याही.

आजूबाजूला पसरत चाललेली अराजकता आणि अस्वच्छता पाहून "इंग्रज गेला तो कंटाळून... शिल्लकच काय होतं, इथं लुटण्यासारखं ?" हे नेहमी आठवतं.

एखाद्या टपरीवर चहा घेत असताना नकळत आधी चहाचा रंग पाहिला जातो आणि 'अंतू बर्वा'चा चहाच्या रंगावर मारलेला शेरा आठवतो.

भारत सरकार कडून मिळणारा द्रोणाचार्य पुरस्कार 'चितळे मास्तरां'ना मिळायला हवा, अशी एक भाबडी आशा मनात घर करून आहे.

नवीन घर बांधणारे लोक आजही हातात विटा घेऊन समोर उभे राहताहेत.

एखादी मुलगी कुत्र्याशी लडिवाळपणे बोलत उभी असेल तर 'पाळीव प्राण्यां'चा संपूर्ण अल्बम डोळ्यापुढून झर्रकन निघून जातो.

लग्नाच्या पद्धती बदलल्या, सर्व सोयी उपलब्ध झाल्या, मोबाईलच्या एका क्लीक वर सुपारी पासून भटजींपर्यंत सर्व गोष्टी मिळत असल्या, तरी प्रत्येक मांडवात नारायणाची उपस्थिती असतेच ! त्याला अजून रिप्लेसमेंट मिळालेली नाही.

चाळी जाऊन सोसायट्या आल्या पण गच्चीचा प्रश्न अजूनही तसाच आहे.

जुन्या आणि मोजक्याच शिल्लक असलेल्या काही इराणी हॉटेलांमधून आजही असंख्य 'नाथा' कामात एकटेच झुरत आहेत आणि त्यांच्या वाक्याची सुरवात अजूनही "बाबा, रे" नेच होत आहे.

आजच्या ह्या कॉम्पिटिशन च्या जमान्यात काही 'रावसाहेब'ही आहेत. टिकून नाही, असं नाही... पण, तुमच्यासारखे कलावंत त्यांच्या वाट्याला येत नाहीत. हे जग चालवण्यासाठी अजूनही कोणाला काही करावं लागत नाही.

तुम्ही अनुभव दिलेल्या प्रत्येक गोष्टी आज अस्तित्वात आहेत. पण, तुम्ही नाहीत.

तुमच्या आठवणी, तुमचे किस्से, तुमच्या कथा, तुमची नाटकं, तुमची गाणी, तुमचं संगीत आजही अजरामर आहे... तुकारामाच्या गाथेसारखं...

भाई, तुमच्याशी इमोशनल अटॅचमेंट असणारी बहुधा आमची ही शेवटची पिढी...!

मागे एकदा एका मित्राकडे गेलो असताना त्याने त्याच्या पुस्तकांचं कपाट माझ्यापुढे उघडलं. कपाट कसलं, खजिनाच तो. विविध विषयांची, विविध लेखकांची असंख्य पुस्तकं त्यात आपलं अस्तित्व पणाला लावून उभी होती. पण, त्यातही तुमची पुस्तकं मला चट्कन ओळखता आली... कारण, तुमच्याच भाषेत सांगायचं तर "कोणत्याच पुस्तकाची पानं एवढी चुरगाळलेली नव्हती !"