Get it on Google Play
Download on the App Store

समाधान - ऑगस्ट १४

जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडत आहे . किंबहुना , आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही . म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो . मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद , समाधान , का बरे न मिळावे ? याला कारण असे की , हा शाश्वत आनंद एका भगवंतावाचून दुसर्‍या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत . त्या आनंदासाठी , मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे ; आणि त्यासाठीच , आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे . आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे , आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा . कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील ; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल , तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल ; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील . तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात , भगवंताचे नाम घेता , हे मला माहीत आहे . परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते . तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करुन ठरवा , की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे ? तुमची परिस्थिती आड येते का ? इथे मंदिरात राहणार्‍या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही . तुम्ही इथे आनंदाने राहा , मंदिरात जेवा , आणि ‘ राम राम ’ म्हणा असे मी सांगतो , पण या लोकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरुन येणार्‍या लोकांना मी काय सांगू ?

खरोखर , मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते . वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रुप अशाश्वत असते . अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो . खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे . आपण भगवंताजवळ आनंद मागावा . त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे . मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तुरहितच असतो . एका स्टेशनवर पेरु चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला ; तो पेरु घेण्याच्या नादी किती लागेल , तर आपली गाडी न चुकण्याइतका ! हे जसे खरे , त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणार्‍या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही . आनंद जोडणार्‍या गोष्टीचा आपण विचार करु या , आणि नामस्मरणात राहू या . काल जे झाले त्याबद्दल दुःख करु नये ; उद्या काय होणार याची काळजी करु नये ; आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे .