Get it on Google Play
Download on the App Store

समाधान - ऑगस्ट ८

प्रपंचात काय किंवा परमार्थात काय , काही पथ्ये पाळायला लागतातच . नेहमी ‘ राम कर्ता ’ ही भावना मनात जागृत ठेवा . शोक , चिंता , भीती , आशा , तृष्णा , ह्या सर्व ‘ राम कर्ता ’ म्हटल्याने नाहीशा होतात . ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत , त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे . तरी आजपासून , ह्या घटकेपासून , नामात रहाण्याचा निश्चय करा , आणि ‘ राम कर्ता ’ ही भावना दृढ करा . कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते ; ते समाधान म्हणता येईल का ? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही , ते समाधान . समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे . ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही . प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच . तेव्हा , तसा तो सोडता येत नाही ; तो एक ‘ राम ’ म्हटल्यानेच सुटू शकेल . कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा . त्यामुळे समाधान मिळून , मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही . जो कोणी स्वतःचा उद्धार करुन घेईल तो खरा ज्ञानी ; काही न करणारा हा खरा अडाणी होय .

वासनेचे परिणत स्वरुप म्हणजे बुद्धी होय . जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय . बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी , ती स्वैराचारी बुद्धी होय . वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय . प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही . त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे . नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे . ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल . खरोखर , थोडा मनापासून निश्चय करा . तो परमात्मा फार दयाळू आहे , तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील . दोष न पाहाताही जो दुसर्‍याला जवळ करतो तो दयाळू खरा . भगवंत अत्यंत दयाळू आहे . त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल , आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम कमी होईल , आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल . प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते . ती ओढ परमेश्वरप्राप्तीनेच पुरी होऊ शकते . ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल , आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल , तर एका नामानेच . ज्याने नाम ह्रदयात अखंड बाळगले , त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल . इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे , नाम हे स्थिर आहे . हे भगवंताचे नाम आवडीने घ्या , श्रद्धेने घ्या , मनापासून घ्या .