Get it on Google Play
Download on the App Store

जून २१ - परमार्थ

प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो . प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही . परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही . जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल . प्रह्लादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली , तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले . तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच . त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते , पण तिचा नवरा तिला जाऊ देईना . त्यावर तिने सांगितले की , हा देह तुझा आहे , परंतु मनावर तुझा ताबा नाही . असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही ? त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरुर आहे . पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग ? तो सर्वव्यापी आहे , सर्वसाक्षी आहे , असे आपण म्हणतो , पण आपण पापाचरण करायला भितो का ? तो आपल्याला पाहातो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का ? पण आपल्याला तसे वाटतच नाही . आपल्यासारख्या आस्तिकाला देव ‘ हवा ’ असे वाटते खरे , पण ‘ हवाच ’ असे वाटत नाही . आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते . प्रपंच ‘ असावाच ’ असे आपल्याला वाटते , आणि भगवंत मात्र ‘ असला तर बरा ’ असे वाटते . याच्या उलट , ‘ भगवंत असावाच ’ आणि ‘ प्रपंच असला तर बरा ’ असे वाटायला पाहिजे . प्रपंचाची आवड असू नये , पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी . देहाने ते कर्तव्य करावे , आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे . ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल . भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही , अशीच कृती आपण करावी .

ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात , आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात ; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का ? पैसा मिळविणे कठीण , मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही . पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे . सर्वसुखी असा प्रपंचात कोण आहे ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गार्‍हाणे आहेच . प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन . तो कधी पूर्ण सुखी होत नाही , त्याचे गार्‍हाणे कधी संपत नाही ! प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दु : खरुप अशा आहेत . म्हणूनच प्रपंच असत्य आहे , हा अनुभव प्रपंच देतो . त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी ; अनुभव विसरुन जो आसक्त होतो तो दु : खी . सुख हे समजुतीमध्ये आहे , आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे .