Get it on Google Play
Download on the App Store

जून ८ - परमार्थ

प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात , त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात . उणीव हेच प्रपंचाचे रुप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही . समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे . निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्त्विकता उत्पन्न होईल , आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल . अशा प्रकारे ‘ सर्वस्व ’ अर्पण करणे , याचेच नाव यज्ञ होय . त्याग आणि भगवंताचे स्मरण , हा यज्ञाचा खरा अर्थ होय . परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो . तो काय दुधाचा रतीब लावतो ? छे :; भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो . परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो . खर म्हणजे , परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारणच नाही . पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी ; पण उद्या जर उपास पडला , तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये .

सर्वांत गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे . ज्याला हित करुन घ्यायचे आहे , त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही . पण लग्न करुन सर्व काळ विषयांत घालवू लागलो , आणि प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली , तर मग लग्न करुन काय साधले ? उद्योग करुन पोट भरायचे हे खरे , पण नोकरी करुन मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो , तर नाही उपयोग . देवाला स्मरुन नोकरी करावी . गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल , त्याचे खरे मानू नये . देव भेटेल याची खात्री बाळगावी . आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा . संकट , आनंद , दोन्ही भगवंताला सांगावीत . ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे . अर्पणबुद्धीने सर्व कर्मे करावीत . ज्यात माझे मन मला खात नाही , ते काम चांगले असे समजावे . कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते , तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो . वाईट लोक समाधानात दिसतात , पण खरे ते तसे नसतात . वाईट कृत्ये करणाराला कधी ना कधी तरी पश्चाताप झाल्यावाचून राहत नाही . एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला - प्यायला घालते , पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते , त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो . खरे म्हणजे आपले इथेच चुकते . आपला ओढा जो विषयाकडे आहे , तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला , ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले , म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखा - समाधानाचा लाभ झाला , त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले .